श्रीकृष्णासोबत भारतीय समाजमनाने आपल्या भावविश्वात जपलेल्या राधेचे चरित्र सांगणाऱ्या संस्कृत भाषेतील ‘श्रीमतीचरित्रम् ’ या ग्रंथलेखनासाठी युवा संशोधक आणि संस्कृत अभ्यासक श्रुती कानिटकर यांना या वर्षीचा साहित्य अकादमीचा युवा लेखक पुरस्कार जाहीर झाला आहे. ५० हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. श्रुती सध्या मुंबई येथील आयआयटी पवईमधून संशोधन करत आहेत. ‘श्रीमतीचरित्रम् ’ हे पाच हजार ५५० श्लोकांचा समावेश असलेले राधादेवी यांचे चरित्र आहे. हे चरित्र सात प्रकरणांत विभागले आहे. श्रीकृष्णाची व्यक्तिरेखा, चरित्र आपल्या सगळ्यांच्या परिचयाचे आहे, मात्र, राधादेवीं यांच्याविषयी फारशी माहिती नसते. महाविद्यालयाच्या दुसऱ्या वर्षाला असताना, मला राधेविषयीची काही माहिती इतर अभ्यास करताना मिळाली. मला ती वेगळी वाटली. त्यामुळे तो मुद्दा लक्षात राहिला होता. नव्याने संदर्भ शोधायला सुरवात केली. व्रज भाषेतील संदर्भही शोधले. सर्व पुराणांचा अभ्यास केला. प्रेमशास्त्र, भक्तिशास्त्र, शक्तीसाधना, नारदभक्तीसूत्र, तत्त्वज्ञानपर ग्रंथ तसेच व्रज भाषेतील जुने साहित्य अभ्यासले. तज्ज्ञांशी चर्चा केली. जुन्या भजनावली अभ्यासल्या. वर्षभराच्या अभ्यासानंतर प्रत्यक्ष लेखनाला सुरवात झाली.. त्यातून ‘श्रीमतीचरित्रम्’ हा ग्रंथ आकाराला आला, असे श्रुती कानिटकर यांनी सांगितले.