महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी शिवतीर्थावर केलेल्या भाषणात बोलताना जाहीर केलेल्या मशिदींवरील भोंग्यांविरोधातील भूमिकेचा विरोध करणे हे पुण्याचे मनसे शहराध्यक्ष वसंत मोरेंना महागात पडल्याचे दिसत आहे कारण, आज मनसेकडून वसंत मोरे यांची शहाराध्यक्ष पदावरून उचलबांगडी करण्यात आली असून, नगरसेवक व पालिकेतील मनसे गटनेते साईनाथ बाबर यांना पुणे शहराध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. मुंबईमध्ये राज ठाकरे यांच्या हस्ते साईनाथ बाबर यांना नियुक्ती पत्र देखील प्रदान करण्यात आले. विशेष म्हणजे यासाठी पुण्यातून काही निवडक पदाधिकाऱ्यांना मुंबईला बोलावले गेले होते, परंतु वसंत मोरे यांना मुंबईला येण्याबाबतचा कुठलाही निरोप नव्हता. त्यामुळे राज ठाकरे यांची नाराजी उघडपणे दिसून आल्याचे बोलले जात आहे. तर, साईनाथ बाबर यांची शहराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली असून, वसंत मोरे यांच्याबाबत देखील भूमिका स्पष्ट केली आहे. शिवाय, मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पुणे दौऱ्यावर येणार असल्याची देखील त्यांनी माहिती दिली आहे. “माझी वसंत मोरे यांच्याशी चर्चा झाली आहे, आम्ही दोघे मिळून आजवर जसे काम केले. तसेच पुढे काम करणार आहोत, त्याचबरोबर मनसे अध्यक्ष राज ठाकरे १५ तारखेला पुणे दौर्यावर येत आहे .” असे मनसेचे पुणे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर यांनी सांगितले आहे. मनसेनं साईनाथ बाबर यांच्याबाबत केली घोषणा - मनसेनं अधिकृत फेसबुक अकाऊंटवरून यासंदर्भातली घोषणा केली आहे. “महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने आज नगरसेवक साईनाथ संभाजी बाबर यांची पक्षाच्या पुणे शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नव्या जबाबदारीसाठी साईनाथ बाबर यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि भावी राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा!” अशी पोस्ट फेसबुकवर करण्यात आली आहे. या पोस्टसोबत राज ठाकरे साईनाथ बाबर यांना जबाबदारीसंदर्भातलं पत्र सोपवत असल्याचा फोटो देखील पोस्ट करण्यात आला आहे. “… म्हणून, शहाराध्यक्ष पदाचा राजीनामा देणार असल्याचं मी मागील महिन्यातच राज ठाकरेंना सांगितलं होतं”; वसंत मोरेंचं विधान! मनसेच्या पुणे शहाराध्यक्ष पदावरून उचलबांगडी करण्यात आल्यानंतर वसंत मोरे यांनी आज खळबळजनक माहिती दिली. शिवाय, मी शहराध्यक्ष पदाचा मे महिन्यात राजीनामा देणार आहे, हे मी राज ठाकरे यांना मागील महिन्यातच ते जेव्हा पुणे दौऱ्यावर आले होते तेव्हाच सांगितलं होतं. अशी माहिती देत वसंत मोरे यांनी त्यामागील कारण देखील सांगितलं आहे.