पुणे : ‘चित्रपट ही एक अद्भुत जादू आहे. त्याद्वारे प्रेक्षकांना दोन-तीन तास भुलवत ठेवायचे आहे. तंत्रज्ञानाच्या प्रगतीबरोबरच गेल्या तीन दशकांत समाज बदलला आहे. शिक्षण आणि जगण्याचे प्राधान्यक्रम बदलले आहेत. आता कोणीही मोबाइलवर चित्रपट, लघुपटाची निर्मिती करू शकतो. त्यामध्ये आपला मराठी किंवा प्रादेशिक चित्रपट कसा टिकणार, हा प्रश्न आहे. त्यासाठी नव्या पिढीच्या दिग्दर्शकांनी चित्रपट करण्याआधी आपली दृष्टी स्वच्छ करून घेणे आवश्यक आहे,’ असे मत ज्येष्ठ दिग्दर्शक डाॅ. जब्बार पटेल यांनी शनिवारी व्यक्त केले.
साधना प्रकाशनच्या वतीने मीना कर्णिक यांच्या ‘आजचे मास्टर्स : जागतिक कीर्तीच्या आठ दिग्दर्शकांची ओळख’ या पुस्तकाचे प्रकाशन डाॅ. जब्बार पटेल यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. प्रसिद्ध चित्रपट समीक्षक गणेश मतकरी, दिग्दर्शक निखिल महाजन आणि साधना प्रकाशनाचे संपादक विनोद शिरसाठ या वेळी उपस्थित होते.
पटेल म्हणाले, ‘चित्रपट हा धंदा आहे. त्यामुळे पैसे देणाऱ्याला शेवटचा रुपया मिळेल, याची दक्षता दिग्दर्शकाला घ्यावी लागते. या पुस्तकामध्ये दिग्दर्शकांचा प्रवास उलगडताना वेगळ्या पद्धतीने चित्रपटाची मांडणी आणि स्त्री संवेदनांचा सुंदर गोफ आहे. रुळलेल्या वाटा सोडून नवी वाट धुंडाळणारे दिग्दर्शक या पुस्तकात आहेत. गेल्या सात-आठ वर्षांत वेगळे वळण आले आहे. हातामध्ये मोबाइल असलेल्या ग्रामीण भागातील युवकांमध्येही चित्रपट, लघुपट निर्मितीचे धाडस आले आहे.’
‘आपल्याकडे समीक्षा एक तर पुस्तकी पद्धतीने केली जाते किंवा आपल्याला जे वाटते त्यापलीकडे असू शकत नाही, अशी काहींची धारणा झाली आहे. त्याला हे लेखन छेद देते. वैश्विक पद्धतीचा आशय असलेल्या चित्रपटाला जागतिक चित्रपट म्हटले जाते. केवळ पडद्यावरचे काम यापेक्षाही दिग्दर्शकाची जीवनदृष्टी, जगण्यातील संघर्षाचे पडसाद जे अशा दिग्दर्शकांच्या चित्रपटात दिसतात, तेच कर्णिक यांच्या लेखनातही उमटले आहेत,’ असे मतकरी म्हणाले.
‘वैश्विक पातळीवरही चित्रपटाचे व्याकरण एकच असते. दिग्दर्शकाचे काम गोष्ट सांगणे इतके मर्यादित नाही, तर त्याला प्रेक्षकांना काळाच्या प्रवासाबरोबर न्यायचे असते. हे पुस्तक चित्रपटांकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन देणारे आहे,’ असे महाजन यांनी नमूद केले. कर्णिक म्हणाल्या, ‘मी समीक्षक नाही. तर, मूळची पत्रकार असल्याने विषय आणि वाचक यांच्यातील पूल आहे याच भूमिकेतून हे लेखन केले आहे.’
‘सिंहासन’ चित्रपटाचा दुसरा भाग (रिमेक) करावा, असे अनेकांनी मला सुचविले होते. पण, ‘सिंहासन’ हा एका पक्षातील राजकीय नेत्यांमधील घडामोडींचा चित्रपट आहे. आता किती पक्ष झाले आहेत. त्यामुळे असा चित्रपट कसा करणार? आणि त्यासाठी कॅमेरे किती लागतील – डाॅ. जब्बार पटेल, ज्येष्ठ दिग्दर्शक