पिंपरी : महाराष्ट्राला मदत करायची नाहीच, हे केंद्र सरकारचे धोरण स्पष्ट आहे. राज्य आर्थिक अडचणीत आणण्याचा आणि काहीही करून राज्यातील सरकार पाडण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा खुलेआम गैरवापर सुरू आहे. तरीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार पाच वर्षे पूर्ण करेल आणि यानंतरही राज्यात महाविकास आघाडीचीच सत्ता येईल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी व्यक्त केला. पक्षकार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. पवार म्हणाले की, केंद्र सरकारने राज्यांना शक्ती द्यायची असते, मदत करायची असते. मात्र, भाजपकडून राज्याला मदत होत नाही, सातत्याने अडचणी निर्माण करण्याचे काम सुरू आहे.