राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शेतकरी आंदोलनाबाबत केंद्र सरकारच्या भूमिकेवर भाष्य करताना मोदी सरकारला इशारा दिलाय. पंजाबमधील शेतकरी अस्वस्थ होऊ देऊ नका. एकदा देशानं अस्वस्थ पंजाबची किंमत दिलीय. ही किंमत इंदिरा गांधी यांच्या हत्येपर्यंत दिलीय, असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलंय. तसेच पंजाबमधील शेतकऱ्यांनी देशाच्या अन्न पुरवठ्यात सतत प्रचंड योगदान दिलंय आणि देशाच्या संरक्षणातही ते पुढे असल्याचं नमूद केलंय. ते पिंपरी चिंचवडमध्ये माध्यमांशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शरद पवार म्हणाले, “शेतकरी आंदोलनात सहभागी घटकांविषयी केंद्र सरकारची भूमिका समंजस असल्याचं दिसत नाही. आंदोलनात पंजाब, हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश आणि राजस्थानचा काही भाग येथील जास्तीत जास्त लोक सहभागी आहेत. त्यातल्या त्यात पंजाबमधील शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे आमचं केंद्र सरकारला सांगणं आहे की पंजाबमधील शेतकरी अस्वस्थ होऊ देऊ नका.”

“पंजाबमधील शेतकरी अस्वस्थ होऊ देऊ नका, एकदा देशानं इंदिरा गांधींच्या हत्येपर्यंत किंमत दिलीय”

“पंजाब हे सीमेवरील राज्य आहे. सीमेवरील राज्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांना अस्वस्थ केलं की त्याचे दुष्परिणाम होतात. एकदा या देशाने अस्वस्थ पंजाबची किंमत दिलीय. इंदिरा गांधी यांच्या हत्येपर्यंत किंमत दिलीय,” असं शरद पवार यांनी सांगितलं.

हेही वाचा : इंधन दर वाढीसह विविध मुद्द्य्यांवरून पवारांचा मोदी सरकारवर निशाणा, म्हणाले…

शरद पवार म्हणाले, “दुसरीकडे पंजाबमधील शेतकऱ्यांनी मग ते शिख असो की हिंदू, त्यांनी या देशाच्या अन्न पुरवठ्यात सतत प्रचंड योगदान दिलंय. या देशाच्या संरक्षणाचा प्रश्न जेव्हा येतो तेव्हा तुम्ही मी महाराष्ट्रात भाषणं करतो, मात्र पंजाबचे लोक स्वतः लढायला असतात.”

“शेतकरी आंदोलनाकडे राज्यकर्त्यांनी लक्ष द्या, ही राष्ट्रीय गरज आहे”

“पंजाबची सीमा ही पाकिस्तानला जोडून आहे. त्यामुळे देशासाठी असा त्याग करणारा, अन्नधान्यात स्वयंपूर्णता करणारा हा घटक काही प्रश्नांवर आग्रहाने आंदोलनाला बसला असेल तर त्याकडे राज्यकर्त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. ही राष्ट्रीय गरज आहे,” असंही शरद पवार यांनी नमूद केलं.

More Stories onपंजाब
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar warn modi government over unrest in panjab and its sequences pbs
First published on: 16-10-2021 at 17:13 IST