पुणे : शिवसेनेने शब्द पाळला नाही; तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी धोका दिल्याने संभाजीराजे छत्रपती यांना राज्यसभेच्या निवडणुकीतून माघार घ्यावी लागली, असा दावा टीका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला. पुणे दौऱ्यावर पत्रकारांशी बोलताना केंद्रीय मंत्री आठवले म्हणाले, ‘शिवसेनेने संभाजीराजे छत्रपती यांच्यावर अन्याय केला आहे. त्यांनी भाजपशी चर्चा केली असती, तर ते निवडून आले असते. शिवसेनेने शब्द पाळला नाही आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी धोका दिल्याने त्यांना निवडणुकीतून माघार घ्यावी लागली. अशा परिस्थितीत राज्यसभेच्या सहाव्या जागेवर भाजपचा उमेदवार यशस्वी होईल.’ महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत वाद सुरू आहेत. आघाडीतील काँग्रेस पक्ष पाठिंबा कायम ठेवायचा की नाही, याबाबत विचार करत आहे. काँग्रेसने धाडस दाखवून पाठिंबा काढल्यास राज्यात आम्ही सरकार तयार करू शकतो. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भोंग्यांबाबतची भूमिका अयोग्य आहे. निवडणुका आल्यावर होणारे जातीय राजकारण थांबले पाहिजे, असे आठवले यांनी सांगितले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी प्रत्येक मशिदीत शिविलग शोधू नये, असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे मंदिर आणि मशीद यावरून वाद घालू नये. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न साकार होण्यासाठी रिपब्लिकन ऐक्य होणे आवश्यक आहे. त्यासाठी माझा गट तयार आहे. मात्र, प्रकाश आंबेडकर हे तयार नाहीत, असेही आठवले यांनी या वेळी सांगितले. महापालिका निवडणुकांमध्ये भाजपबरोबर युती आगामी महापालिका निवडणुकांमध्ये भाजप आणि रिपाइं युती होणार आहे. पुण्यात झालेल्या आरक्षण सोडतीमध्ये अनुसूचित जातीसाठी २३ जागा आरक्षित आहेत. त्या जागांची रिपाइंकडून मागणी केली जाणार आहे, असेही आठवले यांनी स्पष्ट केले.