पुणे : अनैतिक संबंधातून महिलेचा दोरीने गळा आवळून खून करण्यात आल्याची घटना मुंबई-बंगळुरु बाह्यवळण मार्गावरील नवीन कात्रज बोगदा परिसरात घडली. महिलेचा खून करुन पसार झालेल्या आरोपी तरुणाला आंबेगाव पोलिसांनी अटक केली.
मनीषा खम्म दमाई (वय २५, सध्या रा. आयुषी काॅम्प्लेक्स, पारी कंपनी चौक, नऱ्हे) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी प्रकाश अर्जुन तिखात्री (वय ३०, सध्या रा. हिंजवडी, मूळ रा. ढकारी, जि. आछम, नेपाळ) याला अटक करण्यात आली. याबाबत किशन भरत परिहार (वय ३५, सध्या रा. ओमशांती बिल्डिंग, मानाजीनगर, नऱ्हे, मूळ रा. जि. वाडा, नेपाळ ) याने आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी किशन परिहार याची मनीषा दमाई बहीण आहे. मनीषा हिचे आरोपी प्रकाश याच्याशी अनैतिक संबँध होते. किशन, मनीषा आणि आरोपी प्रकाश हे मूळचे नेपाळचे आहेत. ते रखवालदार म्हणून काम करतात. मनीषा आणि प्रकाश हे विवाहित आहेत. त्यांना मुले आहेत. प्रकाशने अनैतिक संबंध सुरू ठेवण्यास नकार दिला होता. तेव्हापासून मनीषा आणि प्रकाश यांच्यात वाद सुरू झाले.
मनीषाने त्याला अनैतिक संबंध ठेवण्यास सांगितले. मात्र, प्रकाशने तिला नकार दिला. तिच्या त्रासामुळे प्रकाश चिडला होता. १८ मार्च रोजी प्रकाश हा मनीषाला नऱ्हे परिसरात भेटायला आला. त्याने गोड बोलून मनीषाला मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील नवीन कात्रज बोगद्याजवळ नेले. तेथील एका हाॅटेलच्या परिसरात मागील बाजूस दाट झाडी आहे. दाट झाडीत त्याने मनीषाला नेले. तेथे त्याने तिच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. दोरीने गळा आवळून तिचा खून करून तो पसार झाला. प्रकाश तेथून पसार झाला.
दरम्यान, मनीषा बेपत्ता झाल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी पोलिसांकडे तक्रार दिली. दाट झाडीत एका महिलेचा मृतदेह सापडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक आयुक्त राहुल आवारे यांनी घटनास्थळी भेट दिली. आंबेगाव पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन चोरमले, सहायक पोलीस निरीक्षक मुलाणी यांनी तातडीने तपास सुरू केला. मनीषाची ओळख पटविण्यात आली. तपासात मिळालेल्या माहितीनंतर आरोपी प्रकाशला ताब्यात घेण्यात आले.
प्रेमसंबध तोडल्याने मनीषाचा दोरीने गळा आवळून खून केल्याची कबुली आरोपी प्रकाशने पोलिसांना दिली. सहायक पोलीस निरीक्षक मुलाणी तपास करत आहेत. प्रेमसंबध तोडल्याने खून, खूनाचा प्रयत्न अशा प्रकारच्या घटना शहरात यापूर्वी घडल्या आहेत.
वर्षभरापूर्वी प्रेमसंबंध तोडल्याने ओैंध परिसरात एका तरुणीवर पिस्तुलातून गोळीबार करण्यात आला होता. सुदैवाने या घटनेत तरुणी बचावली होती. या प्रकरणी चिंचवडमध्ये राहणाऱ्या सराइताला पोलिसांनी अटक केली होती.
