पुणे : यंदाच्या उन्हाळी हंगामात राज्यात सुमारे ४८ हजार हेक्टरवर पेरणी झाली होती. पीक जोमात होते. पण, एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ापासूनच उन्हाचे चटके बसू लागल्यामुळे संपूर्ण उन्हाळी सोयाबीनचा हंगामच अडचणीत आला आहे. उत्पादनात मोठी तूट येत आहे. राज्यात मागील वर्षी खरीप हंगामात परतीच्या पावसामुळे सोयाबीन हातचे गेले होते. त्यामुळे बीजोत्पादनासाठी मागील वर्षी उन्हाळी हंगामात सोयाबीन लागवडीचा प्रयोग करण्यात आला आहे. तो प्रयोग यशस्वी झाल्यामुळे आणि यंदाही खरिपातील सोयाबीन वाया गेल्यामुळे कृषी विभागाने पुढाकार घेऊन उन्हाळी हंगामात सोयाबीन लागवडीला प्रोत्साहन दिले. त्यामुळे सुमारे ४८ हजार हेक्टरवर सोयाबीन लागवड झाली. पीक जोमात होते. चांगले उत्पादन होण्याची अपेक्षा असतानाच एप्रिलच्या पहिल्याच आठवडय़ात पारा ३५ अंश सेल्सिअसवर तर महिनाअखेपर्यंत ४० अंशांवर गेला होता. मराठवाडय़ात लागवडीचे क्षेत्र मोठे असते. विदर्भ, मराठवाडय़ाला उष्णतेच्या लाटांसह वाढत्या तापमानाचा फटका बसला. तापमान वाढीचा फटका म्हणून सोयबीनच्या पिकाची अपेक्षित वाढ झाली नाही. अनेक ठिकाणी शेंगा लागल्या नाहीत किंवा कमी प्रमाणात लागल्या. लागलेल्या शेंगात दाणे भरले नाहीत. अनेक शेंगात लहान आकाराचे दाणे भरल्यामुळे उत्पादनात मोठी तूट येत आहे. एकरी सरासरी ५ ते ८ क्विंटल उत्पादन अपेक्षित असताना केवळ २ ते ३ क्विंटलपर्यंत उत्पादन निघत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नाही, अशी स्थिती आहे. महाबीजकडे बियाणांचा तुटवडा खरीप हंगामात ‘महाबीज’ने सुमारे १३ हजार हेक्टरवर बीजोत्पादनाचा कार्यक्रम हाती घेतला होता. त्यातून सुमारे ५० हजार क्विंटल कच्चे बियाणे मिळण्याची अपेक्षा आहे.