उत्तरेकडे उष्णतेची लाट

पुणे : देशाच्या सर्वच भागांमध्ये सध्या हवामानाची विचित्र स्थिती निर्माण झाली आहे. पश्चिाम-उत्तरेकडील राज्यांमध्ये सध्या ऐन पावसाळ्याच्या हंगामात उष्णतेची लाट आली असताना उत्तर-पूर्व भागांतील राज्यांत मात्र मुसळधार पाऊस ते अतिवृष्टी होत आहे. महाराष्ट्रात पावसाची क्षीण अवस्था कायम असून, दिवसाच्या तापमानात काही प्रमाणात वाढ नोंदविली जात आहे. पुढील चार-पाच दिवसांत राज्यात तुरळक ठिकाणीच पावसाच्या हलक्या सरींचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

राज्यात गेल्या आठवड्यापासून पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. बुधवारीही कोकणात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडला. इतर मध्य महाराष्ट्रात महाबळेश्वर आणि विदर्भात चंद्रूपर येथे केवळ हलक्या सरींची नोंद झाली. पुढील चार ते पाच दिवस कोकणात पाऊस होणार असला, तरी त्याचा जोर कमी असणार आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही मोठ्या पावसाची शक्यता नाही. विदर्भ ते दक्षिण तामिळनाडूपर्यंत सध्या कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्याचा परिणाम म्हणून एक -दोन दिवस विदर्भात काही ठिकाणी पाऊस होईल. तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

देशाच्या पश्चिाम-उत्तर भागातील दिल्ली, पंजाब, हरियाणा, चंडीगड, राजस्थान आणि उत्तर प्रदेशातील उत्तर भागामध्ये सध्या उष्णतेची लाट आली आहे. दोन दिवस ही लाट कायम राहण्याची शक्यता आहे. या विभागाच्या दुसऱ्या बाजूला मात्र जोरदार पाऊस होत आहे.