पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेतर्फे दहावीत ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण असलेल्या विद्यार्थ्यांसाठीची अर्थसाहाय्य योजना होण्याआधीच बंद झाली का, असा प्रश्न विचारण्यात येत आहे. गेल्या वर्षी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना अद्याप रक्कम मिळालेली नाही आणि यंदा दहावीच्या निकालानंतर अर्ज प्रक्रियाही राबवण्यात आली नाही. त्यामुळे या योजनेच्या अंमलबजावणीबाबत प्रश्नचिन्ह आहे समाज कल्याण विभागाचे तत्कालीन मंत्री धनंजय मुंडे यांनी दहावीच्या परीक्षेत ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी अर्थसाहाय्य योजना सुरू करण्याची घोषणा २०२१मध्ये केली होती. या योजनेची अंमलबजावणी बार्टी मार्फत करण्याचेही नियोजन करण्यात आले होते. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना जेईई, नीट, सीईटी अशा परीक्षांसाठी अकरावी आणि बारावी अशा दोन वर्षांत मिळून दोन लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाणार होते. त्यानुसार अर्ज मागवण्यात आले, ४ हजार ५०० विद्यार्थी पात्रही ठरले होते. मात्र संबंधित विद्यार्थ्यांना रक्कम अद्याप मिळालेली नाही. यंदा दहावीच्या निकालानंतर या योजनेबाबत समाजकल्याण विभाग आणि बार्टीकडून काहीच माहिती देण्यात आली नाही, तसेच अर्ज प्रक्रियाही राबवण्यात आली नाही, अशी माहिती स्टुडंट हेिल्पग हँडच्या कुलदीप आंबेकर यांनी दिली. योजना जाहीर करायची आणि त्याची अंमलबजावणीच करायची नाही ही विद्यार्थ्यांची चेष्टा आहे. हा प्रकार संतापजनक आहे. विद्यार्थ्यांना अर्थसाहाय्य मिळण्यात आडकाठी कशासाठी असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. योजनेच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने आढावा घेऊन अंतिम धोरण तयार करण्याचे काम सुरू आहे. विद्यार्थ्यांना नामांकित संस्थांच्या माध्यमातून जेईई, नीट, सीईटीचे मार्गदर्शन करण्याचाही प्रयत्न आहे. या योजनेबाबत सकारात्मक निर्णय होईल. धम्मज्योती गजभिये, महासंचालक, बार्टी