पुणे : रत्नागिरी हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असून मे महिना अखेरीपर्यंत हापूसची चव सामान्यांना चाखता येणार आहे. हापूसचे दरही आवाक्यात आले असून किरकोळ बाजारात प्रतिडझनाचे दर ३०० ते ६०० रुपये आहेत. हापूसच्या दरात गेल्या आठवडय़ाच्या तुलनेत घट झाली असून बाजारात होणारी आवकही कमी होत चालली आहे. पुढील पंधरा दिवस हापूसची आवक सुरू राहील. हवामान बदलामुळे यंदा हापूस आंब्याच्या लागवडीवर मोठा परिणाम झाला. अवकाळी पाऊस, धुक्यामुळे आंबा लागवडीवर परिणाम झाला. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरच्या आठवडय़ात हापूसची बाजारात आवक सुरू झाली. त्यानंतर मार्च महिन्यात हापूसची आवक नियमित झाली. हंगामाच्या पहिल्या टप्प्यात हापूसचे दर चढे होते. आवकही अपेक्षेएवढी होत नव्हती. यंदाच्या हंगामात आंब्यांची आवक टप्प्याटप्प्याने होत गेली. आवक नियमित होत नसल्याने आंब्याचे दर चढे होते, असे श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील आंबा व्यापारी करण जाधव यांनी सांगितले. यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच अक्षय तृतीयेला आंब्यांची मोठी आवक झाली. त्यानंतर आंब्यांचे दर सामान्यांच्या आवाक्यात आले. मार्केट यार्डातील घाऊक बाजारात सध्या चार ते सात डझनाच्या कच्च्या आंब्याच्या पेटीचे दर १३०० ते १८०० रुपये आहेत. तयार आंब्याच्या चार ते सात डझनाच्या पेटीचे दर २००० ते २५०० रुपये आहेत. गेल्या आठवडय़ाच्या तुलनेत बाजारात आंब्यांची आवक कमी झाली असून पुढील आठवडय़ात हापूसच्या साधारणपणे तीन ते साडेतीन हजार पेटय़ांची आवक होईल. त्यानंतर आंब्यांची आवक कमी होईल. आंब्यांचे दर सामान्यांच्या आवाक्यात रत्नागिरी हापूसची आवक कमी होत चालली आहे. चवीला गोड, नैसर्गिकरीत्या पिकवलेला आंबा बाजारात उपलब्ध असून दरही आवाक्यात आले असल्याचे मार्केट यार्डातील आंबा व्यापारी अरिवद मोरे यांनी नमूद केले. यंदा पावसाळा लवकर सुरू होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मे महिन्याच्या अखेरीपर्यंत आंबा बाजारात उपलब्ध राहील. आठवडभरात कोकणात पाऊस झाल्यास त्याचा फटका आंब्यांना बसेल आणि हंगामही लवकर संपेल. - करण जाधव, आंबा व्यापारी, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड