पुणे : शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) पेपर फुटल्याचा प्रकार भिवंडी येथे उघडकीस आल्यानंतर समाजमाध्यमांत परीक्षेच्या सुधारित दिनांकाबाबत बनावट परिपत्रक फिरत असल्याचे निदर्शनास आले आहे. या अनुषंगाने, समाजमाध्यमांतील कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने केले आहे. तसेच परीक्षेचा दिनांक यथावकाश जाहीर करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्य परीक्षा परिषदेतर्फे राज्यभरातील परीक्षा केंद्रांवर टीईटी परीक्षा रविवारी (२८ जून) आयोजित करण्यात आली होती. मात्र, भिवंडी येथे पेपरफुटीचा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत परीक्षा पारदर्शकपणेच होणे, पेपरफुटी प्रकरणाची सखोल चौकशी होण्यासाठी नियोजित परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे परीक्षा परिषदेने प्रसिद्धिपत्रकाद्वारे जाहीर केले. तसेच ‘टीईटी’ परीक्षेबाबतची अद्ययावत माहिती परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, असेही नमूद करण्यात आले. या पार्श्वभूमीवर, आता नव्याने परीक्षा कधी घेतली जाणार असा प्रश्न निर्माण झाला. त्यानंतर एका तारखेचा उल्लेख असलेले एक पत्र समाजमाध्यमांत फिरत असल्याचे निदर्शनास आले. या परिपत्रकामुळे संभ्रमाची स्थिती निर्माण झाली. मात्र, हे पत्र बनावट असल्याचे स्पष्ट झाले.

या पार्श्वभूमीवर राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त महेश चोथे यांनी अधिकृत परिपत्रक प्रसिद्ध करून संभ्रम दूर केला. ‘२८ जून रोजी होणारी शिक्षक पात्रता परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. तथापि, शिक्षक पात्रता परीक्षेची अद्ययावत तारीख परीक्षा परिषदेकडून अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे समाजमाध्यमांतील कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवण्यात येऊ नये. या परीक्षेचा दिनांक यथावकाश परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल,’ असे स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, या पूर्वी २०१८, २०१९, २०२५मध्ये झालेल्या टीईटी परीक्षेमध्ये गैरप्रकार झाल्याचे प्रकार उघडकीस आले होते. या प्रकरणी परीक्षा परिषदेने एकूण ९ हजारांहून अधिक उमेदवारांवर कारवाई करत त्यांची परीक्षेतील संपादणूक रद्द केली आहे. आता रविवारी होणारी होणारी परीक्षा पेपरफुटीमुळे पुढे ढकलण्यात आल्याने शिक्षण, राजकीय क्षेत्रातून संताप व्यक्त करण्यात आला आहे.