केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे हे त्यांच्या भाषण शैलीसाठी विशेष ओळखले जातात. परंतु, याचमुळे ते अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. आता त्यांच्या विरोधात नाभिक समाज आक्रमक झाला आहे. मागील आठवड्यात दानवे यांनी नाभिक समाजाची खिल्ली उडवत अपशब्द वापरले होते. त्यामुळे त्यांना नाभिक समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. रावसाहेब दानवे यांनी लवकरात लवकर माफी मागावी अन्यथा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे केशवपन (हेअर कट) केले जाणार नसल्याचा इशारा पिंपरी-चिंचवडमधील बारा बलुतेदार महासंघ उपाअध्यक्ष प्रताप गुरव यांनी दिला आहे. दानवे यांच्या वक्तव्यानंतर पिंपरीतील बाराबलुतेदार आणि नाभिक समाज आक्रमक झाला होता. त्यांनी रावसाहेब दानवे यांचा अर्धमुंडन आणि अर्धी मिशी असलेल्या फोटो झळकवून निषेध केला आहे. यावेळी त्यांनी रावसाहेब दानवे यांच्या विरोधात घोषणाबाजी देखील केली. बाराबलुतेदार महासंघाचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष प्रताप गुरव म्हणाले की, “गेल्या आठवड्यात रावसाहेब दानवेंकडून नाभिक समाजाबद्दल अपशब्द वापरण्यात आले होते. हे योग्य नाही, नेहमीच अशा प्रकारचे वक्तव्य केले जात आहेत. बाराबलुतेदार हे लोकांची सेवा करतात. उठसुठ आम्हाला बोललं जात आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांनी वापरलेले शब्द अतिशय निंदनीय आहेत. त्यांनी जर माफी मागितली नाही तर नाभिक समाज त्यांच्या घरासमोर मुंडन आंदोलन करेल आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे केशवपन (हेअर कट) केले जाणार नाही. त्यानंतर त्यांना नाभिक समाजाची किंमत कळेल. त्यांनी लवकरात लवकर माफी मागावी अशी मागणी नाभिक समाज आणि बाराबलुतेदार महासंघाने केली आहे.” दानवे यांनी नेमकं वक्तव्य काय केलं होतं? - मागील आठवड्यात केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांनी नाभिक समाजाबद्दल अपशब्द वापरत खिल्ली उडवणारे वक्तव्य केले होते. यामुळं ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. महाविकास आघाडीवर टीका करताना दानवे यांनी नाभिक समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. “महाविकास आघाडीच्या सरकारमधील तिन्ही पक्षांची अवस्था ही तिरुपतीमधील न्हावी (नाभिक) सारखी झाली आहे.” असं वक्तव्य दानवे यांनी केलं होतं. यामुळं नाभिक समाज आक्रमक झाला आहे. राज्यभर दानवे यांच्या विरोधात निदर्शने करत आंदोलन केली जात आहेत.