पुणे : राज्यात यंदा अकरावीचे प्रवेश ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार आहेत. मात्र, नवीन तुकड्या, शाखांना मान्यता दिल्यानंतर प्राधान्यक्रम भरण्याची प्रक्रिया सुरू करण्याची, तसेच प्रवेश प्रक्रिया लवकर पार पडण्यासाठी शिक्षण विभागाने तुकडीवाढ आणि शाखांच्या प्रस्तावांना लवकर मान्यता देण्याची मागणी ‘असोसिएशन ऑफ मॅनेजमेंट ऑफ नॉन एडेड इन्स्टिट्यूट्स इन रुरल एरिया’ या संघटनेने केली आहे.

शिक्षण विभागाने प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकानुसार १९ मेपासून विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करून, प्रवेशाचा अर्ज आणि महाविद्यालयाचे प्राधान्यक्रम भरायचे आहेत. मात्र, शिक्षण विभागाने अकरावीच्या नवीन तुकड्या शाळांना परवानगी देण्याची प्रक्रिया ऑनलाइन केली आहे. त्यामुळे शिक्षण संस्थांच्या प्रस्तावांना मान्यता मिळण्यास काही कालावधी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर, असोसिएशन ऑफ मॅनेजमेंट ऑफ नॉन एडेड इन्स्टिट्यूट्स इन रुरल एरियाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांनी या प्रक्रियेबाबत काही मुद्दे उपस्थित केले आहेत.

‘राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांनी अकरावीच्या नवीन तुकड्या आणि अतिरिक्त शाखांसाठी प्रस्ताव सादर केले आहेत. मात्र, त्यास आजपर्यंत मान्यता देण्यात आलेली नाही. नव्या तुकड्या, नव्या शाखांना मान्यता मिळाल्याशिवाय विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांचे प्राधान्यक्रम भरल्यास त्यांना नव्या तुकड्या, नव्या शाखांतील जागांसाठी अर्ज करता येणार नाही. त्यामुळे शिक्षण विभागाने सुरुवातीला केवळ विद्यार्थ्यांची नोंदणी करून घेऊन शिक्षण संस्थांच्या तुकड्या, शाखांच्या प्रस्तावांना मान्यता मिळाल्यानंतरच प्राधान्यक्रम भरण्यास सुरुवात करावी, असे प्रा. झोळ यांनी सांगितले.