महाराष्ट्रातील मल्लांच्या अनेक मागण्या आहेत. त्याची मी यादीच केली आहे. स्पर्धेच्या समारोपाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री येणार आहेत. तेव्हाच ते या मागण्या पूर्ण झाल्याचे जाहीर करतील असे, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन आज चंद्रकांत पाटील आणि भाजप प्रदेश अध्यक्ष बावनकुळे यांच्या हस्ते झाले. यावेळी खासदार रामदास तडस, अभिनेत्री दिपाली सय्यद, अभिनेते प्रवीण तरडे उपस्थित होते. हेही वाचा- ‘मी वसंतराव’ चित्रपट ऑस्करच्या रिमाइंडर लिस्टमध्ये या प्रसंगी बोलताना पाटील यांनी आघाडी सरकारला टोमणे मारले. मागण्या करण्यासाठी अर्थ मंत्रालयाची वाट पाहणारे गेले. आमचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री याची वाट पाहत नाहीत. ते थेट घोषणा करतात. मल्लांच्या मागण्या मी लिहून घेतल्या आहेत. समारोपाला त्या मान्य झाल्याची ते घोषणाच करतील, असे पाटील म्हणाले. मल्लांच्या सर्वांगीण विकासाची आवश्यकता आहे. त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असेही ते म्हणाले. बावनकुळे यांनी मल्लांचे मानधन वाढवण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले. अशा स्पर्धांच्या आयोजनाने ऑनलाईनमध्येच अडकलेल्या मुलांना मैदानावर येण्याची प्रेरणा मिळेल, असेही ते म्हणाले.