पुणे : राज्यातील मान्यताप्राप्त माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या शिक्षकांचे मानधन दुपटीने वाढवण्यात आले आहे. मानधनाचा सुधारित दर १ मे २०२५ पासून अंमलात येणार असून, शिक्षण विभागाने मानधनात वाढ करण्याचा निर्णय बऱ्याच वर्षांनी घेतल्यामुळे तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
शालेय शिक्षण विभागाने या बाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला. राज्यातील मान्यताप्राप्त प्राथमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातून एखाद्या विषयासाठी अर्धवेळ शिक्षकांसाठी आवश्यक असलेला कार्यभार उपलब्ध होऊ शकत नसल्यास संबंधित विषयाच्या अध्यापनासाठी पात्रताधारक व्यक्तीची तासिका तत्वावर नियुक्ती करण्यात येते. त्यांना घड्याळी तासिकेनुसार मानधन देण्यात येते. मात्र, तासिका तत्त्वावरील शिक्षकांना मिळणारी रक्कम तुटपुंजी असल्याने या शिक्षकांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यामुळे मानधनात वाढ करण्याची मागणी शिक्षक संघटनांकडून करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर, शिक्षण विभागाने उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालयातील तासिका तत्त्वावरील शिक्षकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार उच्च माध्यमिकसाठी १५० रुपये प्रति तास असलेला मानधनाची दर सुधारित करून आता तो ३०० रुपये प्रति तास करण्यात आला आहे. तर माध्यमिकच्या शिक्षकांसाठी १२० रुपये प्रति तास असलेला दर आता २५० रुपये प्रति तास करण्यात आल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.
घड्याळी तासिका तत्त्वावर नियुक्त करण्यात येणारे शिक्षक पूर्णवेळ शिक्षकांप्रमाणे पात्रताधारक असावेत. पात्रता पूर्ण करत नसलेल्या शिक्षकांची घड्याळी तासिका तत्त्वावर नियुक्ती करण्यात येऊ नये. घड्याळी तासिका तत्त्वावरील शिक्षकांचे मानधन नियमितपणे देण्यात येईल, याची दक्षता माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालकांनी घेण्याची सूचना शासन निर्णयाद्वारे देण्यात आली आहे.