पुणे : राज्य मंडळाने जाहीर केलेल्या बारावीच्या निकालात यंदा घट झालेली असतानाच एकाही विद्यार्थ्याला पैकीच्या पैकी गुण मिळालेले नाहीत. तसेच, ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही यंदा कमी झाली आहे. ४४.५१ टक्के विद्यार्थ्यांना ४५ ते ६० टक्क्यांदरम्यान गुण मिळाले आहेत.गेली काही वर्षे दहावी-बारावीच्या परीक्षेत गुणांचा फुगवटा वर्षागणिक वाढत आहे.

गेल्या वर्षी राज्यभरातील ८ हजार ७८२ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले होते. तसेच, एका विद्यार्थिनीने शंभर टक्के गुण मिळवण्याची कामगिरी केली होती. मात्र, यंदा एकूण निकाल घटलेला असताना गुणवंतांचाही टक्का कमी झाला आहे. या वर्षी ८ हजार ३५२ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. तसेच, गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा ७० ते १०० टक्क्यांतील विद्यार्थ्यांची संख्याही कमी झाल्याचे दिसून येत आहे.

राज्य मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, २२ हजार ३१७ विद्यार्थ्यांनी ८५ ते ९० टक्के, ४६ हजार ३३६ विद्यार्थ्यांनी ८० ते ८५ टक्के, ७४ हजार १७२ विद्यार्थ्यांनी ७५ ते ८० टक्के, १ लाख ३ हजार ७० विद्यार्थ्यांनी ७० ते ७५ टक्के गुण मिळवले आहेत. त्याशिवाय १ लाख ३१ हजार ८१२ विद्यार्थ्यांनी ६५ ते ७० टक्के, १ लाख ८१ हजार ७५५ विद्यार्थ्यांनी ६० ते ६५ टक्के, ६ लाख २२७ विद्यार्थ्यांनी ४५ ते ६० टक्के, १ लाख ८० हजार ५४७ विद्यार्थ्यांना ४५ टक्क्यांहून कमी गुण मिळाल्याचे दिसून येत आहे.