पुणे : कौटुंबिक संपत्तीवरून भांडणे, टोळीयुद्ध आणि आर्थिक वर्चस्ववादातूनच राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी नगरसेवक वनराज आंदेकरचा खून करण्यात आला, असा युक्तिवाद सरकार पक्षातर्फे पुण्याच्या विशेष न्यायालयात करण्यात आला.

वनराज आंदेकर खून प्रकरणात त्याची बहीण संजीवनी, जावई जयंत, गणेश व प्रकाश कोमकर आणि टोळीप्रमुख सोम्या उर्फ सोमनाथ गायकवाड याच्यासह २१ आरोपींविरोधात विशेष न्यायालयात आरोप निश्चितीला सुरुवात झाली. या वेळी विशेष सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी गुन्ह्याचे स्वरूप, आरोपींविरोधातील आरोप आणि पुराव्यांची मांडणी केली. घटनेचे आणि आरोपी फरार असतानाचे सीसीटीव्ही चित्रीकरण आणि चित्रफिती, घटनास्थळाचा पंचनामा, ३९ साक्षीदारांचे जबाब, आरोपींचे मोबाइल कॉल डिटेल्स अहवाल, त्यांच्या आवाजाच्या नमुन्याचा तपासणी अहवाल, वैद्यकीय अहवाल असे पुरावे त्यांनी सादर केले.

आरोपी सोमनाथ गायकवाडच्या टोळीचा सदस्य निखिल आखाडेचा ऑक्टोबर २०२३ मध्ये खून झाला होता. या प्रकरणात ‘मकोका’ कायद्यान्वये अटक झालेले आरोपी सूर्यकांत उर्फ बंडू राणोजी आंदेकर, कृष्णा आंदेकरसह अन्य आरोपींना न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. वनराज आंदेकर नगरसेवक असल्यानेच आरोपींना जामीन मंजूर झाल्याचा राग सोमनाथ गायकवाड याला होता. वनराज आणि त्याची बहीण संजीवनी व जावई कोमकरांमध्ये कौटुंबिक संपत्तीवरून भांडणे होती. पुणे महापालिकेने आरोपी संजीवनी कोमकर हिच्या नाना पेठेतील जनरल स्टोअर्सवर अतिक्रमणविरोधी केलेली कारवाई ही वनराजच्या सांगण्यावरून झाल्याच्या संशयातून आरोपी संतापले होते. त्यातून गायकवाड आणि कोमकर एकत्र आले. त्यांनी वनराजचा खून करण्याचा कट रचला. त्याच्यावर पाळत ठेवून दोन वेळा खून करण्याचा प्रयत्नही केला. प्रत्यक्ष घटनेच्या दिवशी नाना पेठेतील वीज बंद करून आरोपींनी वनराजवर पिस्तुलातून गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून त्याचा खून केला.

पुणे पोलिसांनी या गुन्ह्याचा सविस्तर तपास करून पुरावे संकलित केले आहेत. त्यामुळे आरोपींविरोधात आरोप निश्चित करावेत, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी केला. दरम्यान, या प्रकरणाचे तपास अधिकारी व बचाव पक्षाचे वकील उपस्थित नसल्याने पुढील तारखेला ही आरोप निश्चितीची प्रक्रिया सुरू राहणार आहे. त्यानंतर खटल्याच्या सुनावणीला प्रारंभ होणार आहे.