पुणे : राज्यातील जलसंपदा विभागाच्या महामंडळांना स्वायत्त करण्यात येणार असून, निधी उभारणीसाठी महामंडळांना अधिकार देण्यात येणार आहेत. त्यासाठी विशेष समितीची स्थापना करण्यात आली आहे. जलसंपदा विभागाच्या नियामक मंडळाच्या बैठकीत हा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सिंचन भवन येथे नियामक मंडळाची बैठक गुरुवारी झाली. त्यामध्ये झालेल्या निर्णयांची माहिती विखे-पाटील यांनी पत्रकारांना दिली. जलसंपदा विभागाचे अप्पर मुख्य सचिव दीपक कपूर, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता हणमंत कुणाले, प्रकल्प विभागाचे मुख्य अभियंता हणुमंत धुमाळ यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

‘जलसंपदा विभागाची कार्यरत असलेली महामंडळे निधीसाठी राज्य सरकारवर अवलंबून आहेत. महामंडळांचा विकास करण्यासाठी निधीची कमतरता जाणवत आहे. ही महामंडळे स्वायत्त केल्यास त्यांच्याकडील उपलब्ध साधनांचा वापर करून निधी वाढविण्यासाठी प्रयत्न करणे शक्य होणार आहे. सरकारी अनुदानावरही अवलंबून राहणे योग्य ठरणार नाही. महामंडळाच्या क्षेत्रात पर्यटन विकास वाढीवरही भर देण्यात येणार असून, त्यासाठी निधी उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील,’ असे विखे-पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘महामंडळे स्वायत्त झाल्यानंतर अधिकारी आणि कर्मचारी यांचे वेतन स्वत: महामंडळांकडून दिले जाईल. महामंडाळासाठी वित्तीय सल्लागार समितीही स्थापन करण्यात येणार आहे. तर, बारामती पंचायत समितीला महामंडळाची जागा देण्यासंदर्भातही निर्णय या बैठकीत घेण्यात आला असून, यापुढे अशा संस्थांना जागा देताना रेडिरेकनरच्या दरानुसार रक्कम आकारण्यात येणार आहे.

धरणांच्या हद्दीतील अतिक्रमणांवर कारवाई

धरणांच्या हद्दीतील अतिक्रमणांची संख्या वाढली आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठाही दूषित होत आहे. त्यामुळे यापुढे ही अतिक्रमणे काढण्यात येणार असून, तशी सूचना राधाकृष्ण विखे-पाटील यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना या बैठकीत दिली.

थकीत पाणीपट्टी वसुलीसाठी स्वतंत्र यंत्रणा

‘महापालिका, नगपालिका, नगरपंचायत, औद्योगिक वसाहती यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर थकीत पाणीपट्टी आहे. ही रक्कम २ हजार २०० कोटींच्या आसपास असून, ती वसूल करण्यात येण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात येईल,’ असेही राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्थांना ८० टक्के पाण्यावर पुर्नप्रक्रिया करणे आवश्यक आहे.

पवार एकत्र येण्याबाबतही भाष्य

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तर आनंद आहे. त्यासंदर्भात कोणताही आक्षेप नाही, असे विखे पाटील यांनी सांगितले. तर, दोन्ही पक्ष एकत्र आले तर कार्यकर्त्यांची होरपळ होणार नाही आणि सर्वांना न्याय मिळेल, असे जानकर यांनी सांगितले.