पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस कायम राहिल्याने खडकवासला धरणातूून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

यंदाच्या हंगामात आतापर्यंत ३.१९ अब्ज घनफूट (टीएमसी) पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.दरम्यान, पावसाच्या प्रमाणावर विसर्गाचे प्रमाण कमी अधिक करण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.

खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून पाऊस कायम राहिला आहे. त्यामुळे धरणांच्या पाणीसाठ्यातही वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. या चारही धरणांमध्ये मिळून १६.४१ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा चारपट जास्त असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या २४ तासांत टेमघर धरणाच्या परिसरात ९८ मिलिमीटर, वरसगाव येथे ७० मिलिमीटर तर पानशेत आणि खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अनुक्रमे ६४ आणि २३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पानशेत धरणात ५.७७ टीएमसी, वरसगावमध्ये ७.७० टीएमसी, टेमघरमध्ये १.६४ टीएमसी आणि खडकवासला धरणात १.३३ टीएमसी एवढा पाणीसाठा आहे.