बारामती हा पवार कुटुंबीयांचा बालेकिल्ला असला तरी आमचाही किल्ला आहे. दलित आणि धनगर समाजाची चांगली मते आहेत. महादेव जानकर यांच्या विरोधात सुप्रिया सुळे कमी मताधिक्याने निवडून आल्या. त्यामुळे बारामतीही आम्ही जिंकू शकतो. असा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. लोकसभेच्या ४५ जागा जिंकण्याचे लक्ष्य असून त्यामध्ये बारामतीच्या जागेचा समावेश आहे, असे त्यांनी सांगितले. हेही वाचा >>> पुणे : सिंहगड रस्ता भागातून दुचाकी चोरणारा अटकेत ; तीन गुन्हे उघड मॉरिशस मराठी मंडळी संस्थेतर्फे मंगळवारी (२७ सप्टेंबर) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण मॉरिशसचे राष्ट्रपती पृथ्वीराज सिंग यांच्या हस्ते होणार आहे. त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. भोर येथील फुले शाहू आंबेडकर विचार प्रसारक मंडळाने हा पुतळा तयार केला आहे. पुतळ्याचे अनावरण होणे ही आंबेडकरी समाजासाठी अभिमानाची गोष्ट आहे. असे आठवले यांनी या वेळी सांगितले. आठवले म्हणाले, आरपीआयचा ६५ वा वर्धापनदिन ३ ऑक्टोबर रोजी भुसावळ येथे होणार असून या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, गुलाबराव पाटील उपस्थित राहणार आहेत. पक्ष व्यापक करण्यासाठीचा संकल्प या कार्यक्रमात करणार आहे. ११ डिसेंबर रोजी निलंगा येथे ओबीसी मेळावा होणार आहे. ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थेत राजकीय आरक्षण मिळाले पाहिजे, ओबीसींची जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे, अशी भूमिका आहे. जातीनिहाय जनगणनेमुळे जातिवाद वाढेल, ही भूमिका चुकीची आहे. हेही वाचा >>> शाळकरी मुलीवर तरुणाकडून बलात्कार; आरोपीस अटक भारत नव्हे कॉंग्रेस जोडण्याची गरजराहुल गांधी यांनी सुरू केलेली भारत जोडो यात्रा ही काँग्रेस कमकुवत करणारी असून त्याचा कॉंग्रेस पक्षाला फायदा होणार नाही, अशी टीका रामदास आठवले यांनी केली. सत्तेत असताना त्यांच्याकडे देश जोडण्याची कोणतीही भूमिका नव्हती. भारताला जोडण्याची गरज नसून त्यांनी काँग्रेस पक्षाला जोडावे. राहुल यांना केरळमधूनही हरवणार आहोत. कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्षपद राहुल गांधी स्वीकारत नाहीत. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सामना म्हणजे बच्चों का खेल नहीं. असा टोला आठवले यांनी लावला. रामदास आठवले म्हणाले…. भारतात राहून पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देण्याचा हक्क कोणाला नाही. अशांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. या प्रकरणी पोलिसांनी तपास करून सत्य माहिती समोर मांडावी. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार उत्तम काम करत आहे. मंत्रिमंडळात रिपब्लिकन पक्षाला एक मंत्रीपद आणि विधानपरिषदेची आमदारकी मिळावी, अशी आमची मागणी पूर्ण होईल. पण, वेळ कमी असल्याने लवकर निर्णय घेतला जावा, एवढीच अपेक्षा आहे.