‘केंद्र शासनाने आखलेला ‘मेक इन इंडिया’ हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आपल्या देशातील तरुणाईची सकाळी दहा ते सायंकाळी पाच अशी नोकरी करण्याची मानसिकता बदलण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांमधील उद्यमशीलता वाढीस लागावी यासाठी प्रोत्साहन देणे गरजेचे आहे,’ असे मत राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी रविवारी व्यक्त केले.
स्पायसर मेमोरिअल कॉलेजच्या शताब्दी वर्षांनिमित्त आयोजित समारंभात राज्यपाल बोलत होते. यावेळी राज्यपाल राव यांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन आणि नव्या इमारतीचे उद्घाटनही करण्यात आले. यावेळी सेव्हंथ डे अॅडव्हेंटीस्ट वर्ल्ड चर्चचे अध्यक्ष टेड एन. सी. विल्सन, सिम्बॉयसिस विद्यापीठाचे कुलपती शां. ब. मुजुमदार, बिशप थॉमस डाबरे, स्पायसरचे कुलगुरू जस्टीस देवदास आदी उपस्थित होते.
यावेळी राज्यपाल म्हणाले, ‘आपल्या देशातील लोकसंख्येत तरुणांचा मोठा वाटा आहे. या तरूणाईत कौशल्य विकसित करण्यासाठी केंद्र सरकारने व्यापक कार्यक्रम आखला आहे. सरकार करत असलेल्या प्रयत्नांना काही मर्यादाही आहेतच त्यामुळे खासगी शिक्षण संस्थांनीही कौशल्य विकासासाठी प्रयत्न केले पाहिजेत. समाजातील दुर्बल, अपंग, महिला अशा विविध घटकांना कौशल्यपूर्ण शिक्षण देण्याचे आव्हान शिक्षण संस्थांनी स्वीकारावे. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी शिक्षण न देता त्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळण्यासाठी अॅप्रेंटिसशिपची योजना राबवायला हवी. त्यासाठी विद्यापीठे आणि औद्योगिक संस्था यांनी एकत्र येऊन योजना आखाव्यात.’