जिल्हा प्रशासनाकडून बुधवारी स्पष्ट पुणे : जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या आगामी निवडणुकांसाठी नव्याने निश्चित केलेली जिल्हा परिषद गट तसेच पंचायत समित्यांच्या गणांची रचना राज्य सरकारने रद्द केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील गट आणि गणांची रचना पुन्हा एकदा निश्चित केली जाणार आहे, असे जिल्हा प्रशासनाकडून बुधवारी स्पष्ट करण्यात आले. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारे जिल्हाधिकारी कार्यालयाने जिल्हा परिषदेसाठी ८२ तर, पंचायत समित्यांसाठी एकूण १६४ गण निश्चित केले होते. त्यामुळे जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे नवीन सात गट आणि पंचायत समित्यांचे नवीन १४ गण वाढले होते. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील इतर मागास वर्गाचे (ओबीसी) आरक्षण रद्द करण्यात आले आहे. हे आरक्षण कायम ठेवण्यासाठी राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. त्यानुसार राज्य विधिमंडळाने ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक पद्धतीत बदल करण्याबाबतचा कायदा केला आहे. या कायद्यातील तरतुदीनुसार राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार निश्चित करण्यात आलेली ग्रामपंचायत प्रभाग रचना, जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांची रचना रद्द केली आहे. याबाबतचे राजपत्र प्रसृत करण्यात आले असून ते जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठविण्यात आले आहे. गट व गणांची पुनर्रचना राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार करण्यात आली होती. मात्र, राज्य सरकारने नव्याने कायदा करत हे अधिकार स्वत:कडे घेतले आहेत. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने केलेली पुनर्रचना रद्द झाली आहे. तालुकानिहाय विद्यमान गट, गण जुन्नर नऊ-१८, आंबेगाव पाच-दहा, शिरूर आठ-१६, खेड नऊ-१८, मावळ सहा-१२, मुळशी चार-आठ, हवेली सहा-१२, दौंड आठ-१६, पुरंदर पाच-दहा, वेल्हे दोन-चार, भोर चार-आठ, बारामती सात-१४, इंदापूर नऊ-१८ एकूण गट ८२ आणि गण १६४