पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बाद यांनी रविवारी आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्लाबोल केला. पंजाबमध्ये हिंसाचार घडवण्याचा केजरीवाल प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. राज्यातील जनतेने आप आणि काँग्रेसच्या प्रभावाखाली येऊ नये, असे अपीलही केले. आप आणि काँग्रेस हे पक्ष पंजाबविरोधात आहेत. त्यामुळे पंजाबमधील जनतेने त्यांना मतदान करू नये, असे आवाहन त्यांनी केले.

ते म्हणाले, भाजप-अकाली दलाचे युती सरकार जनतेच्या अपेक्षेला उतरलेले आहे. ही युती राज्याच्या हितासाठी सत्तेवर येणे आवश्यक असून या शिवाय इतर कोणत्याही पक्षावर विश्वास ठेवणे योग्य राहणार नाही. हे युती सरकार पुन्हा एकदा सत्तेवर आल्यास २० लाख युवकांना रोजगार देण्याबरोबर राज्यात २५०० कौशल्य प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात येतील, असेही त्यांनी या वेळी म्हटले. गत दहा वर्षांत पंजाब सरकारने सुमारे अडीच लाख बेरोजगार युवकांना नोकरी दिल्याचा दावा त्यांनी या वेळी केला. येत्या पाच वर्षांत आणखी दीड लाख नोकरी देणार असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
काँग्रेस सत्तेवर आली तर राज्यात जनहितासाठी सुरू असलेल्या योजना बंद करण्यात येतील, असे अरविंद केजरीवाल आपल्या प्रचारात सांगत आहेत. सुखबीरसिंग बादल यांनीही हाच मुद्दा प्रचारात आणला आहे.
दरम्यान, निवडणुकीच्या तोंडावर भाजपचा राजीनामा दिलेले माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांनी अमृतसर पूर्वमधून उमेदवारी अर्ज भरला असून ते सातत्याने शिरोमणी अकाली दलावर व बादल कुटुंबीयांवर टीका करत आहेत. सिद्धू यांना उपमुख्यमंत्री पदाचे दावेदार मानले जाते. परंतु, पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष कॅप्टन अमरिंदर सिंग व त्यांच्यात मतभेद असल्याची ही चर्चा आहे. त्यातच आपच्या वतीने अरविंद केजरीवाल यांनीही प्रचारात आघाडी घेतल्याने यंदाची पंजाब विधानसभेची निवडणूक चांगलीच रंगणार असल्याचे दिसते. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत.