‘गली बॉय’.. धारावीच्या गल्ल्यांमध्ये लहानाचा मोठा झालेल्या एका रॅपरची कथा. समाजामध्ये दोन वर्ग निर्माण झाले आहेत. एक उच्चभ्रू लोकांचा तर दुसरा गरीबी आणि दारिद्रय यांच्याशी संघर्ष करणारा. दारिद्र्याच्या गर्तते अडकलेल्या प्रत्येक व्यक्तीची कथा, त्याचं दु:ख मुराद अर्थात गली बॉय (रणवीर सिंह) त्याच्या रॅपमधून समाजासमोर मांडतो. या दु:खाला वाचा फोडत असतानाच त्याचं नशीब त्याला यशाच्या शिखरावर पोहोचवतं आणि तो ठरतो देशातला सर्वात प्रसिद्ध असा रॅपर. या प्रसिद्ध रॅपरची कथा समाजापुढे मांडण्यासाठी दिग्दर्शिका झोया अख्तर यांनी केलेला प्रयत्न या चित्रपटातून स्पष्ट दिसत आहे. किंबहुना तो यशस्वीही ठरला आहे.

धारावी १७ च्या चाळीमध्ये मुराद त्याच्या संपूर्ण कुटुंबासोबत राहत असतो. लहानपणापासून धारावीच्या गल्ल्यांमध्ये फिरणाऱ्या मुरादवर समाजातील घडणाऱ्या प्रत्येक गोष्टींचा परिणाम होत असतो. ही परिस्थिती केवळ घराबाहेरच नाही तर घरामध्येही असल्याचं मुरादला जाणवतं. मुरादचे वडील अचानकपणे दुसरं लग्न करुन येतात आणि मुरादच्या कुटुंबामध्ये एका नव्या सदस्याचा प्रवेश होतो. मात्र वडीलांच्या विरोधात जाऊन बोलण्याचं धाडस नसल्याने मुराद त्याचं हे दु:ख आपल्या कवितांमधून व्यक्त करत असतो. या कविता रचत असतानाच तो समाजातील न पटणाऱ्या गोष्टींवरही  भाष्य करत असतो. विशेष म्हणजे तो त्याच्या कवितांना रॅप या म्युझिक प्रकारात रेकॉर्ड करत असतो. त्यामुळे त्याने रचलेल्या प्रत्येक रॅपमध्ये समाजात घडणाऱ्या घटनांचा समावेश असल्याचं पाहायला मिळतं.

घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे आपला मुलाने एका उच्च पदावर काम करावं ही इच्छा मुरादच्या आईची (पल्लवी सुभाष) असते. त्याला शिकविण्यासाठी ती सतत धडपड करत असते. तर वडीलांना (विजय राज) मात्र आपल्या मुलानेही आपल्याप्रमाणेच ड्रायव्हर होऊन उदरनिर्वाह करावा असं वाटत असतं. परंतु या साऱ्या बंधनांना छेद देऊन काहीतरी वेगळं आणि स्वत:ला सिद्ध करण्याचं स्वप्न मुरादने उराशी बाळगलं असतं. त्याचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सफिना (आलिया भट्ट) त्याच्या पाठिशी खंबीरपणे उभी असते.

स्वत: ला सिद्ध करण्यासाठी धडपड करणाऱ्या मुरादच्या आयुष्यात एक वळण येतं जिथून त्याच्या आयुष्याला विशेष म्हणजे त्याच्या करिअरला कलाटणी मिळते. वडील आजारी पडल्यानंतर मुराद काही काळ त्यांच्या जागी ड्रायव्हर म्हणून नोकरी करतो. कॉलेजचं शिक्षण, कविता रचण्याचं वेड आणि घरची जबाबदारी या साऱ्यांची सांगड घालत मुराद सतत स्वत:ला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो. यादरम्यानच मुरादची भेट श्रीकांत उर्फ रॅपर एम.सी. शेर (सिद्धार्थ चतुर्वेदी) याच्याशी होते आणि मुरादचा ‘गली बॉय’ होण्याचा प्रवास सुरु होतो.

कॉलेजमध्ये एम.सी.शेरचं गाणं ऐकल्यानंतर मुराद त्याची भेट घेतो आणि त्याने रचलेल्या काही कविता शेरला ऐकवून दाखवतो. या कविता ऐकल्यानंतर मुराद काही तरी वेगळं करु शकतो हे जाणून शेर त्याला रॅपच्या जगाशी ओळख करुन देतो. अनेक कार्यक्रमांमध्ये त्याला रॅप गाण्याची संधी देतो. शेरने केलेल्या मदतीमुळे आणि मनात असलेल्या समाजातील विषमतेची खदखद तो रॅपमधून मांडू लागतो. हा प्रवास करत असतानाच मुरादची रॅपच्या जगातील अनेक व्यक्तींची भेट होते. या भेटीतच त्याला स्कायही  (कल्की कोचलीन) भेटते. या भेटीतून त्याला पहिलं रॅप रेकॉर्डींग करण्याची संधी मिळते. ‘दुरी’ हे त्याचं पहिलं रेकॉर्डींग केलेलं गाणं ठरतं आणि याच गाण्यामुळे त्याला ‘गली बॉय’ हे नवं नाव मिळतं. पुढे हे नाव देशातील गल्ल्यागल्यांपर्यंत पोहोचतं आणि मुराद ‘गली बॉय’ या नावाने ओळखला जातो. पुढे ‘रॅपस्टार’ या शोमध्ये केलेल्या परफॉर्मन्समुळे ‘गली बॉय’ देशसह आंतरराष्ट्रीय स्तरावरही सुपरहिट ठरतो.

‘गली बॉय’चा हा प्रवास झोया अख्तर यांनी अत्यंत सुंदररित्या रेखाटला असून या चित्रपटातील प्रत्येक कलाकाराने त्यांच्या परीने भूमिकेला न्याय दिला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने रणवीर खऱ्या अर्थाने एका रॅपरचं आयुष्य जगला आहे. त्यामुळे त्याच्या अभिनयातून एका रॅपरचं त्याच्या गाण्याप्रती असलेलं प्रेम आणि आपलं दु:ख व्यक्त करण्याचं सामर्थ्य तो योग्य पद्धतीने मांडू शकला आहे.  विशेष म्हणजे या चित्रपटाच्या माध्यमातून आलियाच्या अभिनयाची एक नवी बाजू प्रेक्षकांसमोर आली आहे. ‘स्टुडंड ऑफ द इअर’, ‘राझी’ या चित्रपटांमध्ये काम केलेली आलिया ‘गली बॉय’ या चित्रपटात एका वेगळ्याच रुपात भासते. स्वभावातील बिंधास्तपणा आणि एखाद्या चुकीच्या गोष्टीविरोधात जाऊन थेट भिडण्याची ताकद तिने सुंदररित्या पडद्यावर साकारली आहे. त्यामुळे रणवीरसोबतच आलियाचा अभिनयही वाखाणण्याजोगा आहे.

या चित्रपटाची निर्मिती करण्यात निर्मात्यांना यश आलं असून यात उत्तम संवादकौशल्य, नेपथ्य आणि संगीत यांची सांगड घालण्यात आली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात तीन मराठी कलाकारही झळकले आहेत. त्यामुळे बॉलिवूड दिग्दर्शक मराठी कलाकारांची दखल घेत असल्याचं दिसून येत आहे. या चित्रपटात कलाकारांच्या अभिनयासोबत उत्तम संवादकौशल्य, नेपथ्य आणि संगीत यांची उत्तम सांगड घालण्यात आली आहे. त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर चांगली कमाई करू शकेल अशी अपेक्षा आहे.

शर्वरी जोशी

joshi.sharvari1993@gmail.com