रोजच्या आहारातील पदार्थामध्ये वातावरणानुसार बनवण्याच्या पद्धतींमध्ये बदल केला पाहिजे. गैरसमजुतींमुळे बरेचसे पदार्थ हिवाळ्यात टाळले जातात. तसे न करता काही बदल करून ते आहारात वापरले तर योग्य ठरेल. त्यातील काही पदार्थ खालीलप्रमाणे - * दूध घेताना सुंठ, हळद टाकून उकळवून घ्यावे म्हणजे त्यामुळे कफ होणार नाही. * दही घेण्याऐवजी ताक घ्यावे व ते मिरपूड टाकून घ्यावे तसेच ते ताजे असावे. * सर्व जेवण शक्यतो गरम असतानाच खावे, परत परत अन्नपदार्थ गरम करू नयेत. * भाज्यांचे सूप गरम असताना जिरेपूड, मिरपूड, दालचिनी टाकून घ्यावे. (प्रमाणात) * आवळ्याचे विविध पदार्थ आहारात असावेत. उदाहरणार्थ च्यवनप्राश, आवळा, सरबत, आवळा कॅण्डी, मोरावळा इत्यादी. आवळा ‘क’ जीवनसत्त्वाचा उत्तम स्रोत आहे. नियमित सेवनाने रोग प्रतिकारशक्ती वाढते. * तीळ, शेंगदाणे, जवस इत्यादी पदार्थाच्या चटण्या आहारामध्ये वापराव्यात. त्याद्वारे हिवाळ्यात आवश्यक असणारी स्निग्धता व उष्णता आपल्या शरीराला मिळते. * चहा बनवताना आले, तुळस, गवती चहा, वेलची इत्यादी पदार्थ टाकून बनवावा. * पिण्याचे पाणी कोमट असावे. * आहारात गाईचे तूप (शक्यतो घरी बनवलेले), ताजे लोणी घ्यावे. * हिवाळ्यात स्वयंपाकामध्ये मोहरीचे तेल, तीळतेल वापरू शकतो. * बदाम, आक्रोड, पिस्ता, काजू इत्यादी सुकामेवा रोज प्रमाणात खाण्यास हरकत नाही. * लसूण, आले, रोजच्या भाजीमध्ये वापरावे. * बाजरी, नाचणी रोजच्या आहारामध्ये जरूर वापरावी. * कच्चे सॅलड, जिरेपूड, लिंबू, मिरपूड टाकून रोज खावे. डॉ. सारिका सातव आहारतज्ञ dr.sarikasatav@rediffmail.com