स्त्रिया आणि मुलींना त्यांच्या विकासासाठी असलेल्या विविध शासकीय योजनांची माहिती देणे, त्यांच्यासाठी असलेल्या रोजगार संधीची जाणीव करून देणे आणि त्यासाठी आवश्यक असलेली कौशल्ये विकसित करून त्यांना आत्मनिर्भरतेची वाट चोखाळायला मदत करणे यासाठी शासनाने संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमासमवेत (यूएनडीपी) ‘दिशा’ प्रकल्प राबविण्यासाठी सामंजस्य करार करून स्त्री सक्षमीकरण, कौशल्य विकास, दारिद्रय़निर्मूलन, स्वयंरोजगाराचा विकास अशा अनेक महत्त्वाकांक्षी उद्दिष्टपूर्तीसाठी काम सुरू केले आहे. दिशा प्रकल्प हा आयकिया फाऊंडेशन, यूएनडीपी आणि इंडिया डेव्हलपमेंट फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र, हरयाणा, दिल्ली, कर्नाटक आणि तेलंगणा राज्यांत राबविला जात आहे. यूएनडीपीने महाराष्ट्रामध्ये महिला व बाल विकास विभागांतर्गत माविम अर्थात महिला आर्थिक विकास महामंडळासोबत, ग्रामविकास विभागात उमेद अर्थात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानासोबत तसेच कौशल्य विकास विभागासोबत सामंजस्य करार करून स्त्रियांच्या आणि मुलींच्या प्रगतीची पावले अधिक गतिमान केली आहेत. स्त्रिया आणि मुलींच्या पंखात बळ देताना त्यांच्या करिअरला नवी ‘दिशा’ देण्याचे काम माध्यमातून होत आहे. माहितीची दरी सांधणे स्त्रियांना त्यांच्या विकासासाठी असलेल्या अनेक योजनांची माहिती नसते, आपल्यासाठी कोणत्या रोजगार संधी आहेत, आपल्यासाठी कोणती नोकरी योग्य आहे, याचीदेखील त्यांना माहिती नसते, त्यामुळे अनेक योजनांचा लाभ स्त्रियांना घेता येत नाही. ही गोष्ट लक्षात घेऊन माहितीची ही दरी सांधण्याचा पहिला प्रयत्न यामध्ये प्राधान्याने करण्यात आला. ‘प्रमोद महाजन कौशल्य विकास योजना’ असो की ‘प्रधानमंत्री कौशल्य विकास कार्यक्रम.’ कौशल्यांचा विकास करून त्यांना रोजगाराचे साधन मिळवून देणाऱ्या योजनांची माहिती अधिकाधिक स्त्रियांपर्यंत, मुलींपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध मॉडेल्स राबविण्यात आली. मॉडेल्स पहिली सुरुवात पालिकांच्या शाळांमधील ९ वी व १० वीच्या विद्यार्थ्यांपासून करण्यात आली. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील मुलींची शैक्षणिक गळती थांबवण्यासाठी तसेच त्यांना त्यांच्या भविष्यातील करिअर संधी समजून देण्यासाठी ‘करिअर दिशा’ नावाचा कार्यक्रम राबविला गेला. १६३ महापालिकेच्या शाळांमधून करिअर दिशा कार्यक्रमातून शाळेतील विद्यार्थ्यांशी विशेषत: मुलींशी संवाद साधला गेला. विद्यार्थ्यांची विशेषत: विद्याìथनीची शैक्षणिक गळती थांबविण्यासाठी मुलींचे समुपदेशन कसे करायचे याचे प्रशिक्षण शिक्षकांना देण्यात आले. प्रत्येक शाळेत अशा पद्धतीने दोन शिक्षकांना प्रशिक्षित करण्यात आले. या १६३ शाळांमधील जवळपास २९ हजार विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यात आले ज्यामध्ये मुलींची संख्या ही ११४०० इतकी होती. याचा फायदा हा झाला की, दहावीत प्रवेश घेणाऱ्या मुलींची संख्या वाढली, अशी माहिती यूएनडीपीच्या महाराष्ट्रातील प्रमुख अफ्रिन सिद्दिकी व यूएनडीपीचे भारतीय कौशल्य विकास राष्ट्रीय प्रमुख, क्लेमेंट चॉव्हेट यांनी दिली. या कामासाठी १५० समुपदेशकांची विशेषत: स्त्रिया असलेली टीम तयार करून विद्यार्थ्यांची कल चाचणी घेण्यात आली व त्यानुसार विद्यार्थ्यांसोबत २० ते २५ मिनिटांचे समुपदेशन करण्यात आलं. हे करताना मुख्याध्यापक, वर्ग शिक्षक/शिक्षिका यांना विश्वासात घेण्यात आलं. याचा परिणाम म्हणजे समुपदेशनाच्या आधीची मुलं आणि नंतरची मुलं यात खूप सकारात्मक फरक दिसून आला. पालिका शाळेनंतर दुसरा प्रयोग एसएनडीटी महिला विद्यापीठामध्ये करण्यात आला. यूएनडीपीने त्यांच्यासोबत सामंजस्य करार करत एका वर्षांत १५ हजार मुलींना रोजगार मिळेल या दृष्टीने प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. आतापर्यंत ६०० मुलींना नोकरी मिळाली आहे. दिवसेंदिवस ही संख्या वाढते आहे. नोकरीसाठी आवश्यक असणारे कौशल्य विकासाचे, प्रशिक्षणाचे काम यात करण्यात येत आहे. यातदेखील एसएनडीटीच्या ८५ प्रोफेसर्सना अलिबाग येथे दोन दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले. शिक्षक विद्यार्थ्यांचे भविष्य घडवू शकतात या अर्थाने ते शिल्पकार आहेत हे लक्षात घेऊन हे काम कसं करायचं हे त्यांना सांगण्यात आलं. आता हे प्रशिक्षित मनुष्यबळ यूएनडीपीसोबत स्त्रिया आणि मुलींच्या समुपदेशनाचे काम करत आहे. यूएनडीपीचं स्त्री सक्षमीकरणातलं तिसरं मॉडेल आहे ‘स्किल सखीचं’ अर्थात कौशल्य सखीचं. महाराष्ट्रातलं हे सर्वात लोकप्रिय मॉडेल आहे. नीती आयोगानेही याचे कौतुक केले आहे. नागपूर आणि औरंगाबाद येथे करिअर गायडन्स सेंटरच्या माध्यमातून याचे काम सुरू करण्यात आले आहे. शासनाच्या पायाभूत सुविधांचा उपयोग करत या मॉडेलची अंमलबजावणी सुरू आहे. नागपूर आणि औरंगाबादमध्ये ११०० स्किल सखी, (कौशल्यप्राप्त) तयार करण्यात आल्या आहेत. कोणत्याही मानधनाशिवाय अतिशय नि:स्वार्थपणे स्त्रिया हे काम करतात. या दोन जिल्ह्य़ांच्या अनुभवातून उणिवांना दूर करत संपूर्ण राज्यासाठी एक एसओपी (स्टॅण्डर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर) तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर हा कार्यक्रम राज्याच्या प्रत्येक जिल्ह्य़ात राबविला जाईल. यात स्किल सखीला एक यंत्र देण्यात आले आहे जे घरातील टीव्हीला जोडलं की तो स्मार्ट टीव्ही होतो. त्यावर कौशल्य विकासाच्या योजनांचे प्रशिक्षण दिले जाते, त्याच्या यशकथांची माहिती उपस्थितांना दाखवली जाते. ‘स्किल सखी’साठी जी स्त्री निवडली जाते ती तिच्या आसपासच्या स्त्रियांना तिच्या घरच्या टीव्हीवर ही माहिती दाखवते. यात ब्युटीपार्लरसह एकूण महत्त्वाच्या १८ अभ्यासक्रमांची माहिती दिली जाते. या अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण कुठे मिळते, ते कसे घ्यायचे याची माहिती दिली जाते. हे अगदी प्राथमिक समुपदेशन आहे. औरंगाबाद आणि नागपूरच्या मॉडेलमध्ये ‘स्किल सखी’च्या माध्यमातून आतापर्यंत १६ हजार २९५ स्त्रियांपर्यंत पोहोचण्यात यश मिळाले आहे. यात ‘प्रथम’ या स्वयंसेवी संस्थेची खूप मदत झाली आहे. याशिवाय आयटीआय गर्ल्स दादर आणि आयटीआय गर्ल्स पुणे (औंध) येथे एक प्रकल्प यूएनडीपी आणि शासनाच्या सहकार्यातून राबविला जात आहे. यात मुलींची कल चाचणी घेऊन त्याप्रमाणे त्यांना ४० तासांचे सॉफ्ट कौशल्य प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यांच्यातील संवाद कौशल्य वाढवणे, व्यक्तिमत्त्वं विकास करताना नोकरीकरिता त्यांना पूर्णत: तयार करण्याचा प्रयत्न यातून होत आहे. त्यानंतर रोजगार देणाऱ्यांचा एक मेळावा आयटीआयमध्ये भरवला जाईल व रोजगार संधी आणि प्रशिक्षित मुली यांची थेट सांगड घातली जाणार आहे. यूएनडीपी, कौशल्य विकास विभाग आणि ताज यांच्यात सामंजस्य करार झाला असून ताजमार्फत मुला/मुलींना प्रशिक्षण दिले जात आहे. त्यांना एफअँडडीच्या क्षेत्रात योग्य माणूस मिळवून देण्याचा प्रयत्न यातून करण्यात येत आहे. लोणावळा आयटीआय आणि ताजमध्ये ३० मुलींच्या दोन गटांचे प्रशिक्षण पार पडले आहे. या माध्यमातून स्त्रियांना आणि मुलींना कामच नाही तर आर्थिक स्थर्यदेखील मिळाले आहे. ‘दिशा’ प्रकल्पअंतर्गत मुंबई स्टॉक एक्स्चेंजच्या मदतीने सर्व कॉर्पोरेट क्षेत्राला एकत्र आणून रोजगार संधी शोधण्याचं/ निर्माण करण्याचं काम वेगाने करण्यात येणार आहे. यातून आजच्या घडीला रोजगाराच्या किती संधी उपलब्ध आहेत, त्यासाठी कोणत्या प्रकारचे कुशल मनुष्यबळ हवे आहे हेदेखील कळून येईल व योग्य व्यक्तीला योग्य नोकरी मिळवून देणे शक्य होईल. ‘दिशा’ प्रकल्पाअंतर्गत माविमसोबत ‘मार्केट लिंकेज’साठी एक वैशिष्टय़पूर्ण सामंजस्य करार करण्यात आला. यात माविमचा आणि ‘फ्युचर ग्रुप’ चा यात सहभाग आहे. या समूहाने आश्वस्त केले आहे की, प्रशिक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांनी उत्पादन केलेला कच्चा माल ते विकत घेतील. यात बचतगटातील स्त्री शेतकऱ्याला प्राधान्य देण्यात आले. अकोला, अमरावती, यवतमाळ येथे माविम बचतगटाचे ३० महासंघ आहेत, त्यातील स्त्रियांना प्रशिक्षक म्हणून प्रशिक्षित करण्यात आले. त्यांनी जवळपास ५३०० स्त्रियांना प्रशिक्षित करून ‘मार्केट लिंकड्’ वा ‘बाजार जोडणी’ शेती उत्पादन घेतले. उदाहरणार्थ तूर, काबुली चणे, हरभरा आदी जे शेतकरी या ‘फ्युचर ग्रुप’शी जोडले गेले त्यांना त्यांच्या नेहमीच्या दरापेक्षा २० टक्के अधिक दर मिळाला. अशा ५३१६ स्त्रियांची माहिती आज या बचतगटाच्या महासंघाकडे तयार आहे. त्यांना बुक कीपिंग, एमआयएस तयार करण्याचे प्रशिक्षणही देण्यात आले आहे. काही स्त्रिया या असंघटित क्षेत्रात घरी बसून वेगवेगळ्या प्रकारचे काम करतात त्यांच्यासाठी ‘नारी उत्कर्ष समिती’च्या माध्यमातून एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले गेले. एक यशस्वी महिला उद्योजक कसं व्हायचं याचे प्रशिक्षण दिले गेले. प्रशिक्षणानंतर परीक्षाही घेतली गेली. ११८ स्त्रियांपैकी १०७ स्त्रियांनी उत्तीर्ण होऊन प्रमाणपत्रे मिळवली. त्यांना विविध प्रकारच्या सेवा देणाऱ्या संस्थांशी जोडण्यात आलं. उदाहरणच सांगायचं झालं तर व्हॅनिटी क्युब, अर्बन कॅप आदी. जी स्त्री एकटीने व्यवसाय करताना १० हजार रुपये कमवत होती ती आता २० ते २५ हजार रुपये आठवडय़ाला कमवू लागली आहे. यूएनडीपी शासनाच्या विविध विभागांसोबत हे काम करत असताना पैसे पुरवठाही करत आहे. महाराष्ट्रात ६० हजार स्त्रियांपर्यंत पोहोचण्यात ‘दिशा’ प्रकल्प यशस्वी झाला असून जवळपास पस्तीस ते चार हजार स्त्रियांना रोजगार मिळवून देण्यातही यश मिळाले आहे. कौशल्य विकास आणि रोजगार संधीच्या अनुषंगाने माहिती मिळवायची असल्यास यूएनडीपीच्या महाराष्ट्र प्रमुख अफ्रीन सिद्दिकी यांच्याशी aafreen.siddiqui@undp.org ईमेलवर संपर्क साधता येईल. डॉ. सुरेखा मुळे drsurekha.mulay@gmail.com