१६६. देवाचिये द्वारी.. खरी भक्ती म्हणजे काय, याचीही जाणीव नसणारे स्वत:ला भक्त समजू लागतात आणि त्या भक्तीचं फळ मागतात, त्यांना भान आणण्यासाठीही तुकाराम महाराजांचा हा अभंग आहे, असं हृदयेंद्र म्हणाला. तेव्हा कुतूहलानं योगेंद्र पुन्हा अभंग वाचू लागला.. योगेंद्र - आमुचा तूं ऋणी ठायींचाची देवा। मागावया ठेवा आलों दारा।। वर्म तुझें आम्हां सांपडलें हातीं। धरियेलें चित्तीं दृढ पाय।। बैसलों धरणें कोंडोनियां द्वारीं। आंतूनि बाहेरी येवों नेदीं।। तुजमज सरी होईल या विचारें। जळो भांडखोरें निलाजरीं।। भांडवल माझें मिरविसी जनीं। सहस्त्र वोवणी नाममाळ।। तुका म्हणें आम्हीं केली जिवें साठी। तुम्हां आम्हां तुटी घालू आता।। हृदू पण तू म्हणतोयस तसा रोख मला तर जाणवत नाही.. हृदयेंद्र - पहा, पहिल्या चरणात देव आमचा ऋणी आहे, असं म्हंटलंय. देव भक्तीनं ऋणी आहे. गीतेतंही भगवंतानं ते कबूल केलंय. आता मग तोडकीमोडकी उपासना करणाऱ्यालाही वाटू लागतं की मी भक्त आहे. आता देवानं मला आत्मानंदाचा ठेवा द्यावा.. शब्द तर तो वापरतो, पण जीवन सुखाचं व्हावं, हीच त्याच्या आत्मानंदाची कल्पना असते. त्याला तुकाराम महाराज खरी भक्ती कशी असते, ते सुनावतात! वर्म तुझें आम्हां सांपडलें हातीं। धरियेलें चित्तीं दृढ पाय।। बैसलों धरणें कोंडोनियां द्वारीं। आंतूनि बाहेरी येवों नेदीं।। भक्तीचं वर्म काय आहे? तर त्या सद्गुरुचे पाय चित्तात दृढ धरायचे! आता पाय म्हणजे वाटचाल! सद्गुरुंच्या बोधानुरूप जगणं, म्हणजेच त्यांचे पाय चित्तात दृढ धरणं.. आपण असे एकचित्त भक्त आहोत का? आपण संसारही चित्तात दृढ धरला आहे आणि त्या जोडीनं सद्गुरुंना धरू पाहात आहोत! ते कसं साधणार? शक्यच नाही.. पुढच्या चरणात तर तुकाराम महाराज आणखी खोलवर नेतात.. तुला मी अंतरंगात कोंडून टाकलं आहे आणि आता ‘द्वारीं’ म्हणजे अनेक दारांशी बरं का! तर या द्वारांशी मी धरणं देऊन बसलो आहे.. आता आतून बाहेर येऊ देणार नाही की बाहेरून आत जाऊ देणार नाही!! योगेंद्र - वा! इंद्रियांची द्वारं!! हृदयेंद्र - (समाधानानं हसतो) ज्या ज्या ज्ञानेंद्रियांद्वारे जग अंतरंगात प्रवेश करतं ती ही दारं.. तिथं खरा भक्त धरणं देऊन बसला आहे! आसनसिद्ध आहे तो.. म्हणजेच त्याची बैठक, त्याचा पाया पक्का आहे. आता तो आतून बाहेर आणि बाहेरून आत कुणाला येऊ-जाऊ देत नाही.. आतल्या सद्गुरुचिंतनाला या दारांवाटे गमावत नाही की जगाच्या चिंतनाला या दारांवाटे अंतरंगात प्रवेश करू देत नाही.. आपण असे खरे भक्त आहोत का, हा प्रश्न हा अभंग विचारतो.. योगेंद्र - हृदू तू मागे देवाचिये द्वारी या अभंगाचा अर्थ सांगितला होतास ना? त्यातही या द्वारांचा उल्लेख असाच अभिनव होता.. हृदयेंद्र - हो.. गुरुजींनीच सांगितला होता तो अर्थ.. हृदयेंद्रच्या डोळ्यासमोर तो प्रसंग उभा राहिला.. उत्तर प्रदेशातील टळटळीत दुपार.. गुरुजींच्या अंगणातील मंदिरात गुरुबंधूंसह हृदयेंद्र विसावला होता. मधेच वारा येत होता तेव्हा बरं वाटत होतं. तोच गुरुजी आले आणि हसून म्हणाले, अरे देवाच्या दारी झोपायचं नसतं, जागं व्हायचं असतं! सगळेच ओशाळून धडपडून उठले. गुरुजींनी हृदयेंद्रकडे हसत पाहिलं आणि विचारलं.. ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आहे ना? देवाचिये द्वारी.. हृदयेंद्रनं मानेनंच होकार भरला आणि सहजच तो म्हणाला.. देवाचिये द्वारी उभा क्षणभरी। तेणे मुक्ती चारी साधियेल्या.. गुरुजींनी विचारलं, याचा अर्थ काय? हृदयेंद्र शब्दांची जुळवाजुळव करीत म्हणाला होता की, देवाच्या द्वारी एक क्षणभर तरी इतक्या एकाग्रचित्तानं उभं राहावं की चारही मुक्ती साधतील. गुरुजींनी हसून मग गंभीर होत विचारलं की, हिमालयात तर कैक र्वष अनेक साधू-मुनी तपश्चर्या करीत आहेत.. त्यांना मुक्ती साधत नाही, ती एका क्षणात साधणार? हृदयेंद्रही गोंधळला होता.. मग गुरुजी जे म्हणाले त्याची आठवण होऊन याक्षणीही तो भारावला आणि म्हणाला.. हृदयेंद्र - मला काही अर्थ सुचेना, मग गुरुजींनीच विचारलं होतं, तुमच्या मराठीत उभा जन्म गेला, उभं पिक गेलं, असं म्हणतात ना? तोच अर्थ लक्षात घ्या! देवाच्या द्वारी एक क्षणभर नव्हे, जीवनातला प्रत्येक क्षण जो उभा राहील त्यालाच चारी मुक्ती साधतील.. ही देवाची द्वारं म्हणजे आपली ज्ञानेंद्रियंच!