श्रीविजयकृष्ण गोस्वामी यांच्या चरित्रातला योगेंद्रनं सांगितलेला प्रसंग सर्वाच्याच मनाला भिडला. अचलदादा यांनी त्यावर केलेल्या भाष्यानं तर अनेकानेक चरित्रातील अनेक प्रसंगही हृदयेंद्र, योगेंद्र आणि ज्ञानेंद्रच्या डोळ्यासमोर उभे राहिले.. अचलदादा - आता मला सांगा, तुम्ही मनात अनेक प्रसंग आठवण्यात गुंग झाला आहात, त्यातही मनाला किती शांती आहे! आपल्या आयुष्यात घडून गेलेल्या गोष्टी अनेकवार आठवत बसून काय लाभ? फार तर कुणाकडून काही महत्त्वाची गोष्ट, एखादी प्रेरणा लाभली असेल तर त्याची आठवण प्रेरक ठरू शकते.. पण बाकी असतं काय? भांडणं, हेवेदावे, मानापमान.. आणि बरं दुसऱ्यासाठी काही केलं असलं तर कर्तृत्वाचा अभिमान.. हेच तर सगळं उगाळलं जातं.. अनेकदा त्या आठवणींनी मन अधिक परिपक्व, अधिक संस्कारी, अधिक संवेदनशील होण्यापेक्षा अधिकच हळवं, अधिकच ‘मी’केंद्रित आणि अनेकदा तर भयस्पर्शितही होतं! जगताना पदोपदी सद्गुरू बोधाचंच स्मरण झालं, सद्गुरू चरित्राचंच चिंतन झालं, सद्गुरू प्रेमाचंच मनन झालं तर मन अधिक शांत होईल, अधिक उदात्त होईल.. आणि कर्मेद्रजी तुमच्या चेहऱ्यावरच तुमची शंका कळत्ये.. तरी सांगतो, असा माणूस व्यावहारिक जीवनही नीट जगेल, उलट अधिक चांगलं जगेल! (सगळेच हसतात) तर ‘रुप पाहता लोचनी। सुख झाले वो साजणी।। तो हा विठ्ठल बरवा। तो हा माधव बरवा।।’चा हा अर्थ झाला!हृदयेंद्र - आता, ‘बहुत सकृताची जोडी। म्हणुनी विठ्ठलीं आवडी।। सर्व सुखाचे आगर। बाप रखुमादेवीवर।।’ हे अभंगाचे अखेरचे दोन चरण..अचलदादा - पण हृदयेंद्र तूही याचा अर्थ सांगू शकतोस.. (हृदयेंद्रचा चेहरा मात्र गोंधळलेला) बरं, आता हा विठ्ठल कोण आहे? सद्गुरूच ना?हृदयेंद्र - हो.. कारण तो हा विठ्ठल बरवा, म्हटलं आहेच आधी.. तो हा म्हणजे तोच परमात्मा हा सद्गुरू झाला आहे!अचलदादा - बरोबर आणि म्हणूनच मगाशी तुमच्या मनात जो प्रश्न आला ना की तिन्ही पातळ्यांवर सद्गुरूंना पाहणं कसं शक्य आहे? त्याचं उत्तर या तिसऱ्या चरणात स्पष्ट सांगितलं आहे! तुम्हाला जगाचंच सदोदित दर्शन का होतं? कारण जग आवडतं म्हणून.. तशी या विठ्ठलाची, या सद्गुरूंची आवड मनात निर्माण झाली तरच मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यांचं खरं दर्शन सदोदित साधेल.. ती आवड कशानं निर्माण होईल? या प्रश्नाचं उत्तर आहे.. ‘बहुत सकृताची जोडी’! योगेंद्र - दादा ‘पैल तो गे काउ’पेक्षा हा अभंग सोपा आहे, असं वाटत होतं पण या सोप्या शब्दांचेही नेमके अर्थ कळेनासे झाले आहेत! या प्रत्येक शब्दाचा अर्थ माहीत आहे, तो सोपाही आहे.. पण त्यांचा रोख उकलत नाहीये..अचलदादा - अहो तुम्ही थोडा खोलवर विचार करीत गेलात ना, तर प्रत्येक अभंग म्हणजे एका व्यापक विराट अर्थाची छोटीशी किल्लीच आहे, असं जाणवेल.. थोडं आपल्या जगण्याकडेच पहा बरं.. आपण नेहमीच चांगलं वागतो का? कर्मेद्र - नाही आणि ते शक्यही नाही.. अचलदादा - अहो व्यवहारासाठी वाईट वागावं लागतं, ते सोडा एकवेळ, पण जिथे भावनेचा संबंध आहे अशा प्रसंगात तरी आपण सदोदित एकसारखं वागतो का?हृदयेंद्र - नाही..अचलदादा - आपण कधी चांगलं वागतो, कधी वाईट वागतो.. म्हणजेच कधी आपणं सत्कृत्य करतो तर कधी दुष्कृत्य करतो.. कधी दुष्कृत्यच करतो आणि नंतरही दुष्कृत्यच करतो.. तेव्हा आपली जोडी ही सुकृत आणि दुष्कृत किंवा दुष्कृत आणि दुष्कृत अशीच असते.. सकृत आणि सकृत अशी जोडी नसतेच.. इथे तर ‘बहुत सकृतांची जोडी’ म्हटलंय! सकृतांपाठोपाठ इतकी सकृत्यं होत गेली की त्यानंच सद्गुरूंची आवड मनात निर्माण झाली.. आता आपण व्रतवैकल्य करतो.. चांगलं कृत्यच आहेत ती.. पण नंतर दुसऱ्याशी किती विपरीत वागतो! मग त्या जपाचा, व्रताचा, उपवासाचा, पारायणाचा काय उपयोग? म्हणून तर आपल्याकडे व्रतानंतर उद्यापन करतात ना? ते खरं तर ‘उद्या पण’च मानलं पाहिजे. आज व्रत केलं ना आता उद्या पण त्या व्रताला साजेसं वागा!