सद्गुरूंचं पाहणं हे माझं जीवन कसं आनंदाचं करतं, हे अनेक प्रसंगांच्या माध्यमातून ऐकताना मन भारावलं होतं. अचलदादा म्हणाले..अचलदादा - ज्ञानेश्वरीत म्हटलं आहे, ‘‘जें दिठीहि न पविजे। तें दिठीवीण देखिजे। जरी अतींद्रिंय लाहिजे। ज्ञानबळ।।’’ म्हणजे दृष्टीच्या आवाक्यात जे नाही असं दृष्टीशिवायही पाहाता येतं! ती आहे ही ज्ञानदृष्टी.. या स्थूल इंद्रियांना ती दृष्टी नाही.. त्यासाठी या इंद्रियांपलीकडे जाता आलं पाहिजे.. या डोळ्यांनी मी त्या परमतत्त्वाला पाहू शकत नाही, या कानांनी त्याचा बोध ऐकू शकत नाही, या हातानं त्याला स्पर्शू शकत नाही.. म्हणून तो अतींद्रिय असा परमात्माच सद्गुरू बनून माझ्या जीवनात येतो. त्याच्या ज्ञानबळानंच मला ‘जे दिठीहि न पविजे। ते दिठीवीण’ पाहता येईल! ही नजर कशी आहे? मीराबाई म्हणतात, ‘‘आली सांवरो की दृष्टि। मानूं प्रेम री कटारी हैं। लगन बेहाल भई तन की। सुधि बुधि गई।।’’ परमात्म्याच्या दृष्टी म्हणजे प्रेमाची कटय़ारच जणू.. कर्मेद्र - एक उर्दू शेरच आहे.. ‘‘उफ़ वो नज़्ार कि सब के लिए दिलनवाज़्ा थी। मेरी तरफ़ उठी तो तलवार हो गई।।’’ म्हणजे या प्रेमिकेची नजर सर्व दुनियेसाठी प्रेमळ आहे, पण माझ्यासाठी तलवार आहे..हृदयेंद्र - आता तुला कुठे काय आठवेल! ते मीरेचं सांगणं कुठे आणि तुझी ते शेरेबाजी कुठे..कर्मेद्र - अरे पण तिथे कटय़ार तर इथे तलवारच आहे ना?अचलदादा - (हसत) दोन्ही एकच, पण ऐका.. ही कान्हाची दृष्टी म्हणजे कटय़ार का आहे? तर देहबुद्धीची जी लगन आहे ना ती बेहाल झाली.. तिचं भानच उरलं नाही आणि ‘मी’ कोण आहे, याची शुद्धच गेली! बुद्धीच गेली!! आता तुमच्या शेरातल्या प्रियकराचीही हीच स्थिती होते नाही का? फरक इतकाच की हे प्रेम आणि ही भावस्थिती भौतिकातच उरते आणि ओसरतेही.. सद्गुरुंच्या दृष्टीनं जे साधतं ते कशानंही साधत नाही..हृदयेंद्र - दादा, मला पूर्वी अक्कलकोट महाराजांची तसबीर पाहाताना त्यांच्या डोळ्यांकडे पाहाता यायचं नाही. किती आरपार, भेदक आणि उग्र दृष्टी भासायची.. मी एकदा भाऊंना सांगितलं तसं. त्यावर ते उसळून म्हणाले, ‘‘तुमच्या मनात पाप आहे म्हणून पाहाता येत नाही! ते पाप जसजसं कमी होईल तसतसं तुम्ही पाहू शकाल..’’कर्मेद्र - आता पाप कमी करणं काय आपल्या हातात असतं का?हृदयेंद्र - भाऊच म्हणाले की, अक्कलकोट महाराजांची दृष्टीच ते पाप त्याक्षणी जाळून टाकत असते म्हणून त्यांची ती दृष्टी फार भेदक असते! अचलदादा - पण मी पापी आहे की पुण्यवान.. कोणताही विचार न करता मी त्यांच्या नजरेसमोरच राहीलं पाहिजे. तरच काहीतरी आशा आहे..योगेंद्र - म्हणजे मी त्यांना पाहिलं पाहिजे आणि त्यांनी मला पाहिलं पाहिजे! अचलदादा - बरोबर!योगेंद्र - पण दादा, तुम्ही म्हणालात की तीन पातळ्यांवर त्यांनाच पाहिलं की खरं सुख होईल.. ते साधणं काय सोपं आहे? ते कसं साधावं?कर्मेद्र - ए परत त्या तीन पातळ्या थोडक्यात सांगा म्हणजे थोडं तरी कळेल..हृदयेंद्र - पहिली पातळी जी तू मला आणि मी तुला कसं पाहात आहोत? ती..कर्मेद्र - म्हणजे रेग्यूलर.. साधं पाहणं..हृदयेंद्र - बरोबर.. दुसरी पातळी आहे डोळे मिटल्यावरही जगालाच पाहत न बसता त्यांना पाहता येणं आणि तिसरी पातळी म्हणजे डोळे उघडे ठेवून जगात वावरत असतानाही त्यांनाच पाहता येणं! हो ना दादा?अचलदादा - अगदी बरोबर!ज्ञानेंद्र - पण हे असं पाहता येणं काय सोपं आहे?अचलदादा - सोपं तर नाहीच! पण अशक्यही नाही.. कारण तुम्हीच पाहिलंत की या तिन्ही पातळ्यांनी जगाला सदोदित पाहाताना आम्हाला अडचण येत नाही. ते इतक्या सवयीचं आहे की असं तीन पातळ्यांवरून आपण जगात कायमचे गुंतलो आहोत, हेच आपल्याला उमगत नाही. मग जर असं तीन पातळ्यांवरून पाहणं आपल्या नित्यसरावाचं असेल तर त्या पातळ्यांवरून जगाऐवजी सद्गुरूंना पाहणं कठीण असलं तरी अशक्य का असावं? ते अशक्य नाहीच!चैतन्य प्रेम