पुढील आठवडय़ात १४ ते १७ नोव्हेंबर दरम्यान मुंबईत ‘टाटा लिटरेचर लाइव्ह - द फोर्थ मुंबई इंटरनॅशनल लिटररी फेस्टिव्हल’ एनसीपीएमध्ये भरत आहे. हे या महोत्सवाचे चौथे वर्ष आहे. प्रसिद्ध लेखक आणि डेबोनिअर या वादग्रस्त मासिकाचे माजी संपादक अनिल धारकर यांच्या पुढाकाराने हा महोत्सव होतो आहे. जगभरातील जवळपास १२० सर्जनशील लेखक आणि विचारवंत या महोत्सवात सहभागी होणार आहेत. अवघ्या चारच वर्षांत या महोत्सवाने भारतात एक महत्त्वाचे स्थान मिळवले आहे. जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलची चर्चा अलीकडच्या काळातच चवीचवीनं होऊ लागली असली तरी टाटा लिट फेस्टनेही आपली दखल भारतीय साहित्यजगताला घ्यायला लावली आहे. गतवर्षी नोबेल पारितोषिक विजेते व्ही. एस. नायपॉल यांना या महोत्सवात जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले होते, तर यावर्षी प्रसिद्ध लेखक खुशवंतसिंग यांना गौरवले जाणार आहे. वयवर्षे ९८ असलेला हा लेखक अजूनही रोजच्या रोज लिहितो आहे. तेही पूर्वीच्याच खुशालचेंडू वृत्तीने आणि खटय़ाळपणे. या पुरस्काराने उत्साह येऊन त्यांनी शतकाचाही टप्पा ओलांडावा, हीच त्यांच्या चाहत्यांची सदिच्छा असणार.