विनोदाला हसणे हासुद्धा गुन्हा ठरण्याच्या काळातच दोन बडे राजकीय व्यंगचित्रकार आपल्यातून निघून जाणे हा योगायोग विचित्रच. पहिल्यांदा गेले ते आर. के. लक्ष्मण आणि आता आपण गमावले राजिंदर पुरी. लक्ष्मण आणि पुरी हे दोघेही प्रामुख्याने राजकीय टीकाकारच होते. त्यांच्या रेषा वेगळ्या होत्या. विषयांची हाताळणी वेगळी होती. कॉमन मॅन हा लक्ष्मण यांचा मानसपुत्र. तो त्यांच्या व्यंगचित्रांत असायचाच. पुरी यांच्या व्यंगचित्रांत असाच सामान्य नेता होता. हा त्यांच्या दृष्टिकोनातील फरक. बाकी मग चित्रांना, टीकेला धार तशीच. पुरी यांचा जन्म कराचीतला. फाळणी झाली तेव्हा ते १३ वर्षांचे होते, पण ती वेदना नेहमीच त्यांच्या मनात घर करून होती. त्यांच्या उमेदीच्या कालखंडावर छाप होती ती नेहरूवादाची. पण बहुधा फाळणीच्या वेदनांमुळे असेल ते कधी नेहरूवादी बनले नाहीत. ते बव्हंशी लोहियावादी होते. लोकशाहीवादी १०० टक्के होते. त्यांची अनेक व्यंगचित्रे आजही इंटरनेटवर पाहायला मिळतात. त्यातून त्यांची लोकशाहीबद्दलची आस्थाच प्रकट होते. साधारणत: १९५६ मध्ये त्यांच्या राजकीय व्यंगचित्र-पत्रकारितेस सुरुवात झाली. स्टेट्समन हे त्यांचे पहिले दैनिक. तेथे साधारणत: वर्षभर काम केल्यावर त्यांनी काही काळ लंडनमधील गार्डियन आणि ग्लास्गो हेरल्डसाठीही चित्रे काढली. ५९मध्ये भारतात परतल्यानंतर त्यांनी हिंदुस्थान टाइम्सची नोकरी स्वीकारली, पण त्यांचे आणखी एक वेगळेपण म्हणजे त्यांचे चित्रांप्रमाणेच शब्दांवरही प्रेम होते. १९६७ नंतर ते शब्दांच्या दुनियेत आले ते पुढची दहा वर्षे तेथेच रमले. या काळात त्यांनी एक साप्ताहिकही सुरू केले. इंदिरा गांधींनी आणीबाणी आणली आणि या शब्दचित्रखेळीयाची दुनियाच बदलली. आणीबाणीत टीकेचे शब्द आणि व्यंगात्मक चित्र यांना स्थान नसते हे जाणूनच त्यांनी कुंचला, लेखणी टाकली आणि राजकारणात उडी घेतली. जनता पक्षाच्या अनेक संस्थापकांपैकी तेही एक. पण पुढे जनता पक्षाचा प्रयोग फसला. राजकीय व्यंगचित्रकारास त्या प्रयोगातील व्यंग जाणवलेच नसेल असे नाही, पण तरीही ते त्यात रमले. कालांतराने मात्र ते राजकारणापासून असे दूर गेले की जणू त्यात ते नव्हतेच. त्यांच्या एका पुस्तकाचे नाव क्रायसिस ऑफ कॉन्शन्स (१९७१) असे होते. हाच संघर्ष पुस्तक प्रसिद्ध झाल्यानंतरच्या- आणीबाणीनंतरच्या काळात त्यांच्या वाटय़ाला आला असावा. यातून अशा अनेकांची तोंडे कडू झाली. राजिंदर पुरी मात्र अखेपर्यंत मस्त होते. कालसुसंगत होते. परवा ते गेले. राजकीय व्यंगचित्रेच नव्हे, तर एकूणच विनोदावर आणीबाणी लागण्याचा काळ उगवत असताना अशा माणसांचे जाणे हे चटका लावणारेच आहे.