निसर्गाचे विज्ञान निसर्गाच्याच भाषेत अभ्यासले पाहिजे. त्यासाठी ज्ञानशाखांचे तुकडे पुरेसे उपयोगी पडणार नाहीत.. शंका आणि संशय ही आवश्यक हत्यारे विज्ञानाने दिली आहेत. परंतु ती न वापरणाऱ्या आणि निसर्गासोबतच राहणाऱ्या परिजनांना एखाद्या ‘स्पेशालिस्ट’ तज्ज्ञापेक्षा जास्त कळू शकते.. या परिजनांचे ज्ञान, आजच्या विज्ञानावर संशयाची बोटे ठेवण्यासाठी पुरेसे पक्व आहे..

बहात्तर वर्षांपूर्वी सलीम अलींनी भारतीय पक्ष्यांवरचे पहिले रंगीत चित्रमय पुस्तक लिहिले आणि एका नव्या पर्वाची सुरुवात करून दिली. बाबांना पक्षिनिरीक्षणाचा छंद होता. लहानपणापासून मी त्यांच्याकडून या पुस्तकातली चित्रे पाहात पक्षी ओळखायला शिकलो. मला खास गंमत वाटायची घरासमोरच्या तारेवर बसून झोकात भराऱ्या मारत किडे पकडणाऱ्या वेडय़ा राघूंची. सडपातळ बांधा, पोपटी रंग, त्यावर राजवर्खी झाक आणि शेपटीतून डोकावणारे एकुलते एक लांब पीस. एक दिवस मला भुंडय़ा शेपटीचे वेडे राघू दिसले. ही काय भानगड म्हणून मी पक्ष्यांवरची सगळी पुस्तके धुंडाळली, पण काही कळेना. बाबा म्हणाले, विचार सलीम अलींना. एका आठवडय़ातच पत्राचे उत्तर आले : दरवर्षी पक्षी जुनी पिसे टाकून नवी पिसे घालतात. या स्थित्यंतरात शेपटीतले लांब पीस उगवायला वेळ लागतो आणि काही आठवडे वेडे राघू भुंडी शेपटी मिरवतात. सलीम अलींनी माझ्यासारख्या शाळकरी पोराला तातडीने उत्तर दिले म्हणून बेहद्द खूश झालो.

Mentally healthy Psychotherapy Mental health problems
ताणाची उलगड: मानसिकदृष्ट्या निरोगी आहोत का?
Loksatta kutuhal Application of computer vision
कुतूहल: संगणकीय दृष्टीचे उपयोजन
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips
यूपीएससीची तयारी :  भूगोल (भाग २)
Did you know that polyvalent astaxanthin is a natural colorant
Health Special : नैसर्गिक रंग देणारे बहुगुणी ॲस्टाझॅनथीन तुम्हाला माहीत आहे का?

या छंदातून ठरवले परिसरशास्त्रज्ञ बनायचे, पण केवळ निसर्गनिरीक्षक नाही. म्हणून मुद्दाम परिसरशास्त्रातलेच गणितीय काम करून संशोधन-पदवी कमावली. पुनश्च सलीम अलींबरोबर पक्ष्यांवर काम सुरू केले. ते पक्ष्यांच्या पायात वाळे घालून त्यांच्या भटकंतीचा अभ्यास करायचे. या कामाचे खास आकर्षक स्थळ होते भरतपूरचे जगप्रसिद्ध सरोवर. सायंकाळी जोडीने िहडायला जायचो. परतताना गावाकडे निघालेला म्हशींचा लोंढा भेटायचा. त्यांच्याकडे काठी दाखवत सलीम अली म्हणायचे : एकदा या दळभद्री म्हशींना हाकलले की हे अभयारण्य पूर्णपणे सुरक्षित बनेल. आता कित्येक शतके म्हशी चरत असताना सहस्रावधी पक्षी तळ्यात पोहत होते, प्रचंड प्रमाणावर पिल्ले वाढवत होते. तेव्हा असे का म्हणताहेत याचे मला कोडे पडायचे. पण यावर चर्चा करायला सलीम अली तयार नव्हते.
सलीम अलींना इंदिरा गांधी मानायच्या. त्यांच्या सल्ल्यावरून १९८२ साली भरतपूर राष्ट्रीय उद्यान घोषित केले गेले, काहीही पर्याय न देता गुरांना बंदी घातली. लोकांचा विरोध दडपून, गोळीबारात सात लोकांची हत्या घडवून हे बंधन कार्यान्वित केल्यावर दिसून आले की, म्हशींच्या चरण्यामु़ळे साव्यासारखे एक गवत काबूत राहात होते. चरणे थांबल्यावर ते अर्निबध वाढून तळे उथळ झाले आणि बदकांच्या दृष्टीने निकामी व्हायला लागले. म्हणजे ज्या पाणपक्ष्यांसाठी ही बंदी आणली होती, त्यांचाच मोठा तोटा झाला.
हे का झाले? गुंतागुंतीच्या नसíगक प्रणालींत एकमेकांशी निरनिराळ्या पद्धतीने जोडलेले वेगवेगळे घटक असतात. अशा जटिल प्रणालींत कोणतीही ढवळाढवळ केली तर नक्की काय परिणाम होईल हे सांगवत नाही. उलट भौतिकशास्त्रात, रसायनशास्त्रात सरल, कमी घटक असलेल्या प्रणालींचा अभ्यास होतो. सर्व घटकांबद्दल बारकाव्याने माहिती उपलब्ध असू शकते, नेटके प्रयोग करता येतात, सर्वत्र लागू असलेले नियम मांडता येतात. त्यांच्या आधारे इतके जबरदस्त तंत्रज्ञान विकसित करता येते की नेमके चंद्रावर आपले यान उतरवता येते. साहजिकच या प्रचंड प्रगती झालेल्या शास्त्रांवर प्रभुत्व असलेली राष्ट्रे बलवान झाली आहेत. विज्ञानाची प्रतिष्ठा वापरत ही राष्ट्रे आपण सर्वच बाबतीत शहाणे आहोत असा दावा करू लागली आहेत. इंग्रजांचे तोफखाने नक्कीच सरस होते, पण म्हणून ‘भारतीयांचे पारंपरिक निसर्गव्यवस्थापनही कुचकामी होते’ असे बिलकूलच नाही.  पण इंग्रजांनी असे प्रतिपादन जोरात केले, आणि आपला वनविभाग आजही त्याची री ओढतो आहे. ही सर्वथा असमर्थनीय ज्ञानदांडगाई आहे. परिसंस्थांसारख्या जटिल प्रणालींचे विज्ञान अजून अप्रगत आहे. सलीम अलींसारख्या मुरब्बी वैज्ञानिकांचाही या बाबतीतला समज अपुरा ठरला, त्यातूनच भरतपूरची घोडचूक घडली. अर्थातच अशा नसíगक प्रणालींच्या अभ्यासासाठीही वैज्ञानिक कार्यपद्धती वापरायलाच हवी. या कार्यपद्धतीचा गाभा आहे सगळे तावून-सुलाखून बघणे. विज्ञान ही एक शंकेखोरपणाची सुसंघटित मोहीम आहे! भारतीय परंपरा सांगते : संशयात्मा विनश्यति. उलट विज्ञान बजावते ‘संशयमेव जयते!’ कोणाचीही- सलीम अलींची, शासकीय अधिकाऱ्यांची- अधिकारवाणी मानू नका. सगळी विधाने, अनुमाने पडताळायला सर्वाना, केवळ पदवीधर शास्त्रज्ञांना पुरी मोकळीक द्या.  विज्ञान एकच प्रमाण मानते, वास्तवाचे आणि एकच शिस्त मानते, तर्कशुद्धतेची.
विज्ञानाची कास धरत पर्यावरणाचे व्यवस्थापन करायचे म्हणजे काय करायचे? भरतपूरचेच उदाहरण घ्या. म्हशींच्या चरण्याने पाणपक्ष्यांचे व त्यांच्या आवासस्थानांचे नुकसान होते असे सबळ पुरावा नसतानाही ठरवून चरणे बंद केले. लवकरच कळले की, वास्तवात म्हशींच्या चरण्याने बदकांचा आणि तळ्याचा फायदाच होत होता. तरीही चरण्यावरची बंदी उठवली नाही. उलट विज्ञान सुचवते की परिसराचे नियोजन सतत निरीक्षण करत राहून अनुभवाच्या आधारावर- लवचिकपणे, जरूर पडेल तसे बदलत राहूनच- करायला पाहिजे. याला अनुरूप व्यवस्थापन – अडॅप्टिव्ह मॅनेजमेंट- अशी संज्ञा दिली गेली आहे. या पद्धतीनुसार भरतपुरात सगळीकडे एकदम म्हशी थांबवल्या नसत्या. काही भागांत चराई बंद करून त्याच्या परिणामाचा अभ्यास केला असता. या अभ्यासात जर चरण्याची बंदी उचित आहे, त्याचे सुपरिणाम होतात असे दिसले असते, तर जास्त क्षेत्रात चराई थांबवली असती. उलट चरण्याच्या बंदीचे दुष्परिणाम होताहेत असे दिसले असते, तर बंदीचे क्षेत्र आकुंचित करून त्याच्या परिणामांचा आणखी अभ्यास केला असता. असे अनुरूप व्यवस्थापन करायचे असेल तर पर्यावरणाबद्दल तपशिलात सर्वत्र माहिती गोळा करणे आणि एकदाच नाही, तर सतत गोळा करत राहणे आवश्यक आहे. इतक्या मोठय़ा प्रमाणावर स्थलकालसापेक्ष माहिती गोळा करायची असेल तर लोकांच्या सहभागाशिवाय शक्यच नाही. तेव्हा विज्ञान सुचवते की लोकांना पर्यावरणाच्या अभ्यासात, व्यवस्थापनात सहभागी करून घेणे श्रेयस्कर आहे.
जमिनीत ज्यांची पाळेमुळे घट्ट आहेत अशा भारतवासीयांपाशी निसर्गाची यंत्रणा कशी चालते याचे भरपूर ज्ञान आहे. बिळि-गिरि-रंगन-बेट्टा या म्हैसूर जिल्ह्य़ातील पर्वतावरच्या शोलिगा आदिवासींचेच उदाहरण घ्या. या पर्वतराजीची मूळ वनराजी आज एकाच स्थळी टिकून आहे: शोलिगांच्या उत्तुंग चंपकाच्या देवराईत. पूर्वी शोलिगा फिरती शेती, शिकार करायचे. दोन्ही बंद झाल्यावर ते पूर्णपणे आवळ्यासारखे वनोपज गोळा करण्यावर अवलंबून आहेत. दिवसेंदिवस आवळ्याच्या बिया रुजून रोपे वाढणे कमी झाले आहे. बंगळुरूचे परिसरशास्त्रज्ञ याचा अभ्यास करीत होते. त्यांचा तर्क होता की फार मोठय़ा प्रमाणावर आवळा गोळा केल्यामुळे हे घटते आहे. याचा पडताळा घेण्यासाठी त्यांनी प्रयोग सुरू केले. काही भागांतील आवळा अजिबात गोळा करायचा नाही, दुसरीकडे उत्पादनाच्या पाव हिस्सा, तिसरीकडे अर्धा, चौथीकडे पाऊण व पाचवीकडे संपूर्ण. आणि मग आवळ्याची रोपे किती प्रमाणात वाढतात हे पाहायचे. शोलिगा म्हणाले, यातून काही निष्पन्न होणार नाही. कारण आवळ्याची रोपे जिथे वणवा लागतो तिथेच चांगली फोफावतात. या वणव्यांवर नियंत्रण आणल्याने आवळ्याचे पुनरुज्जीवन घटले आहे. प्रयोगान्ती शास्त्रज्ञांनीही हाच निष्कर्ष काढला. ही शोलिगांची जाण त्यांच्या दैनंदिन जीवनात, आपोआप लाभलेल्या अनुभवावर अवलंबून होती.
शोलिगांपाशी आणि भारतातल्या इतर अनेक परिसरांशी अजूनही नाळ शाबूत असलेल्या समाजांपाशी परिसराचे असे वैज्ञानिकदृष्टय़ा महत्त्वाचे ज्ञान आहे, निसर्ग जोपासनेच्या परंपरा आहेत, जमिनीवर काय चालले आहे याच्याशी सतत संपर्क आहे. आसमंत सुस्थितीत राहण्यावर त्यांचा जीवनानंद, त्यांची उपजीविका, त्यांचे आरोग्य अवलंबून आहे. या परिजनांना पर्यावरणाची देखभाल करण्यात बिनीची भूमिका दिलीच पाहिजे. यासाठी जैवविविधता कायद्यासारखी प्रागतिक चौकट उपलब्ध आहे. या कायद्याची सुव्यवस्थित अंमलबजावणी करावी ही पश्चिम घाट परिसर तज्ज्ञ गटाची एक महत्त्वाची शिफारस आहे. याातून आपली लोकशाही अधिक बळकट होईलच, शिवाय आपल्या निसर्गसंपत्तीचा वापर विज्ञानाची कास धरून टिकाऊपणे करण्याच्या दिशेने भक्कम प्रगती होईल. हाच असेल खराखुरा विकास.