गुरांच्या बाजारापासून ते चकचकीत अशा मॉल्सपर्यंत, स्थलांतरित मजुरांपासून पंढरीच्या वारीपर्यंत, नैसर्गिक अशा अस्मानीपासून ते सत्तेपासून येणाऱ्या सुलतानीपर्यंत अशा अनेक विषयांना ‘धूळपेर’च्या निमित्ताने स्पर्श करता आला..यात आपली जबाबदारी काय? फार यातायात करण्याची गरज नाही.  वेदनेची भाषा समजून घेतली आणि एखाद्याच्या दुखाची गाज ऐकण्यासाठी मनाची, आपल्या अर्थपूर्ण हस्तक्षेपाची तयारी ठेवली तरीही खूप झाले.

दररोज असंख्य नवनव्या उत्पादनांच्या जाहिराती येऊन आदळत आहेत. कधी वर्तमानपत्रांच्या रंगीबेरंगी पानावर तर कधी छोटय़ा पडद्यावर. त्यात कल्पकता आहे आणि ग्राहक म्हणून आपल्यावर गारुड करण्याचे सामथ्र्यही. वजन घटविण्याचे जसे उपाय आहेत तसेच वजन वाढविण्याचेही. चांगली झोप लागावी म्हणून आणि तरतरी यावी म्हणून घ्यायची औषधी आणि एखाद्या गादीवर झोपल्यानंतर तुमचे सर्व आजार दूर होतील असे सांगणाऱ्या, दाखविणाऱ्या जाहिराती. थोडक्यात प्रकृतीला मानवणारे खूप काही उपलब्ध आहे. तणावमुक्त कसे जगायचे हे सांगणारे लोकही गल्लोगल्ली दिसू लागले आहेत. ‘स्वास्थ्यकारक’ जगण्यासाठी वाट्टेल तो पसा मोजण्यासाठी लोक तयार आहेत. अशा सगळ्या सुखासीन, आत्ममग्न जगात झोप उडविणारे, स्वास्थ्य हरवून टाकणारे काही ‘स्वास्थ्यहारक’ पुढय़ात आले तर कसे वाटेल? ‘धूळपेर’ करताना असा काही विचार नव्हता. सगळीकडून स्वास्थ्यकारक, सुखकारक उत्पादने आपल्या जगात शिरकाव करत असताना आपली प्रसन्न सकाळ ‘स्वास्थ्यहारक’ करून टाकावी असे काही प्रयोजन नव्हते. मात्र क्षणभर अंतर्मुख करणारे, कधी आतल्या आत स्वतलाच तपासायला लावणारे, साचलेपणाला जरा खरवडून काढणारे, गोठलेल्या स्निग्धतेला वितळविणारे असे काही तरी पेरावे हा या लेखनामागचा उद्देश मात्र होता.. अर्थात काही चांगले उगवून येण्यासाठीच.

.. एका अर्थाने हे वंचितांचे वर्तमान आहे. समाजातल्या सर्वच वंचित घटकांची बखर आहे. ‘धूळपेर’ करताना माती कोरडी असते आणि या कोरडय़ा मातीतच बियाणे पेरले जाते. पाऊस नक्कीच येईल हा आशावाद पेरणी करताना असतो. बियाणे जसे कोरडय़ा मातीत स्वतला गाडून घेते आणि कधी तरी पडणाऱ्या पावसाच्या पाण्याने जी ओल निर्माण होईल त्यावर अंकुरण्याची उमेद बाळगते अगदी तशीच भावना सगळ्या वंचितांच्या जगण्याच्या बुडाशी असते. त्यामुळे केवळ विषण्ण करणारे, अस्वस्थ करणारे, सुन्न करणारे जग या लेखनाच्या माध्यमातून साकारावे एवढीच अपेक्षा नव्हती. वंचितांच्या जगण्याचे अनुभव आपल्यापुढे मांडतानाच या जगातले नवे रंगही उकलावेत अशीही भावना होती. आपल्या सुरक्षित, सुविहित अशा जगण्यापलीकडे एक जग आहे. त्या जगाचे नानाविध कंगोरे ‘धूळपेर’च्या रूपाने उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आला. एखाद्या घटनाप्रसंगावर बेतलेले, किश्शांवर आधारलेले किंवा बंद मूठ ठेवून ‘ओळखा पाहू’ असा उखाणा घालणारे लेखन सोपे असते, पण त्याचा काही परिणाम साधला जात नाही. त्यामुळे जुजबीपणाच्या पल्याडचे काही तरी सांगावे अशी कल्पना मात्र सदैव मनात होती. प्रासंगिकता टाळून समकालीन जगण्याला भिडण्याचा प्रयत्न यानिमित्ताने करण्यात आला. तो कितपत साधला गेला ते वाचकांनी ठरवायचे.
आपल्याकडे गाव आणि शहर यांच्यात अजूनही एक िभत घातली जाते. दोन्ही जगांची सरमिसळ सध्या मोठय़ा प्रमाणावर झालेली असली तरीही.. याला शहरी वाचक जसा जबाबदार असतो तसा तथाकथित ग्रामीण जीवनाबद्दल लिहिणाराही तेवढाच जबाबदार असतो. ‘गडय़ा आपुला गाव बरा’ असे म्हणत आपल्या अंगणाबाहेर न पडणाऱ्या भूमिकेतून होणारे लेखन हे शहरांना खलनायक ठरवते आणि ‘हे खेडय़ांबद्दलचे काही तरी आहे याच्याशी आपला काय संबंध’ असे म्हणून शहरी वाचकाने त्याच्याकडे साफ दुर्लक्ष करायचे असा हा प्रकार दोन्ही बाजूंनी चाललेला असतो. गावाकडच्या माणसांबरोबरच शहरी माणसांनीही हे जग पाहायला हवे. केवळ चित्रपटांतून, गीतांमधून, वाहिन्यांवरील मालिकांमधून दिसणारा गाव आणि प्रत्यक्षातला गाव यातले अंतर तरी त्यानिमित्ताने कळून येईल. गावात किंवा महानगरात तुम्ही कुठेही असा पण संवेदना नावाची गोष्ट सगळीकडे असते. ही संवेदना मात्र गाव आणि शहर असा भेद करत नाही. एखाद्या वंचिताच्या वेदनेची गोष्ट वाचून पार सातासामुद्रापलीकडचा एखादा माणूस कळवळतो ते उगाच नाही. अगदी माण-खटावपासून मेलबर्नपर्यंत आणि सांगली-साताऱ्यापासून ते सॅनफ्रान्सिस्कोपर्यंत आलेल्या प्रतिक्रियांनी हेच सांगितले की संवेदनेच्या अदृश्य धाग्यांनी आपण एकमेकांशी जोडलेलो आहोत. त्यामुळेच आपल्या परिघाबाहेरचेही आपल्या मनाला भिडते आणि आपल्यापर्यंत पोहोचते.

‘धूळपेर’च्या निमित्ताने अनेक विषयांना स्पर्श करता आला. अगदी गुरांच्या बाजारापासून ते चकचकीत अशा मॉल्सपर्यंत, स्थलांतरित मजुरांपासून पंढरीच्या वारीपर्यंत, नसíगक अशा अस्मानीपासून ते सत्तेपासून येणाऱ्या सुलतानीपर्यंत, तहानलेल्या गावांपासून ते पाणीदार नेतृत्वापर्यंत, ढोरकष्टात पिचलेल्या ग्रामीण स्त्रीपासून ते चुलीतून झेपावणाऱ्या ठिणग्यांपर्यंत, सत्ताकांक्षी राजकारणापासून ते धुमसणाऱ्या चळवळीपर्यंत, भाषेच्या व्याकरणापासून ते अंतकरणाजवळ पोहोचणाऱ्या तिच्या सामर्थ्यांपर्यंत असे किती तरी विषय.. फक्त अनागर जगण्यातले प्रश्नच नाहीत तर या जगण्यातले ताणेबाणे, नव्या आशा-आकांक्षा, साहित्य, कला, समाजजीवन अशा अनेक बाबी यानिमित्ताने जशा जमतील तशा सांगता आल्या. फक्त शहरी लोकांना आजचा गाव कळावा असे नाही तर जे गावातून कधी काळी शहरात आले त्यांनाही सजग असे भान यावे हीसुद्धा एक अपेक्षा होती.

..जगणे हे कमालीचे गुंतागुंतीचे असते. ते प्रत्येक वेळी प्रश्नांनी वेढलेलेच असते असे नाही. उत्तरे शोधण्याची जिज्ञासाही या जगण्यात असते. राबणारा माणूस केवळ जगतो म्हणजे कष्ट करतो आणि आपली गुजराण करतो असे नाही. या वाटेवर एखादा विचार चमकून येतो तो विचारही त्याच्यासोबत असतो, एखादे गाणे त्याच्यासोबत असते, त्याने आयुष्यात जपलेली एखादी कला त्याचे जगणे सुसह्य़ करीत असते. या सगळ्या गोष्टी वगळून माणसाचा विचार नाही करता येत. त्याचबरोबर हेही विसरता येत नाही की या जगातली सर्वात मौल्यवान बाब काय असेल तर माणसाचे माणूसपण टिकविणे. सगळ्या प्रकारच्या वंचना वाटय़ाला आलेले जिणे नष्ट होऊन माणसाला सुखाने जगता आले पाहिजे.

..यात आपली जबाबदारी काय? त्यासाठी फार यातायात करण्याची गरज नाही. अध्र्या रात्री जंगलात हरवलेली सुई हुडकायला बाहेर पडायची नाही की आकाशातून चांदण्या खुडून आणायच्या नाहीत. सगळ्या गोष्टी आपल्या हातातल्याच आहेत. जरा डोळे उघडे ठेवले, वेदनेची भाषा समजून घेतली आणि जरा एखाद्याच्या दुखाची गाज ऐकण्यासाठी मनाची, आपल्या अर्थपूर्ण हस्तक्षेपाची तयारी ठेवली तरीही खूप झाले. संवेदनेच्या वाटेवरचे आपण सहप्रवासी आहोत कारण आपल्याला बांधणारा काळ एक आहे म्हणून आपण कुठेही असलो तरी सोबतच आहोत. त्यासाठी नियमित भेटण्याची औपचारिकता कशाला?
(समाप्त)