महेश परब यांचे पत्र (लोकमानस, २८ नोव्हें.) वाचले.  त्यांनी माझ्या २७ नोव्हेंबरच्या पत्राच्या उल्लेख केला होता; पण मी कुठेही आनंदला कमी लेखलेले नाही. त्याच्याबद्दल आदरच व्यक्त केला आहे. प्रत्येक सामान्य व्यक्तीला, प्रसार माध्यमांना आपल्या ‘आयकॉन्स’बद्दल टीका, प्रेम, विश्लेषण व्यक्त करण्याचा अधिकार आहे. महेश परब यांना माझ्या पत्राचा मूळ उद्देशच समजला नाही याचे वाईट वाटते. मी देहबोलीचे विश्लेषण व्हावे ही अपेक्षा व्यक्त केली होती आणि ती सयुक्तिक आहे. जेव्हा खेळाडू राष्ट्रीय वा आंतरराष्ट्रीय सहभाग नोंदवतो तेव्हा तो जनतेच्या टीकेस आणि प्रेमास पात्र असणारच. बदलत्या काळात प्रत्येक बाबींचे विश्लेषण अनेक आधारांवर केले जावे ही अपेक्षा बाळगून, देहबोलीचे महत्त्व इतर उदाहरणांसह देण्याचा प्रयत्न मी केला.
आनंद हा बचावात्मक पवित्रा वापरून खेळत होता आणि तो तसाच खेळला यात अनेक विश्लेषकांचे एकमत आहे, (संदर्भासाठी तेव्हा प्रकाशित झालेल्या वृत्तपत्रीय विश्लेषणांचे वाचन करावे) त्याबद्दल मी माझे मत साधार मांडले.
विजेते आणि पराजित यात फक्त काहीच गुणांचे फरक असतात आणि त्यात जर देहबोलीचा वाटा असेल तर त्याचा अभ्यास व्हावा ही अपेक्षा बाळगणे यात काय चूक आहे? देहबोली-विश्लेषणाचे शास्त्र हे आज  विकसित झाले आहे आणि त्याचा योग्य वापर केल्यास ते आपल्या अंगभूत गुणात भरच घालते हे दाखवून देणे मला आवश्यक वाटले.
आपल्या देशात काही लोकांचा छंदच आहे की क्रिकेट व्यतिरिक्त इतर खेळांना योग्य ते स्थान मिळत नाही; पण त्यांनी हे लक्षात घ्यावे की लोकसत्ताने दररोज याची बातमी अनेक नामवंत विश्लेषकांच्या मतांसह दिली..  ज्या काळात एका अतिव्यावसायिक आणि धनवान मंडळाने क्रिकेटचा खेळ चालवला होता, तेव्हा बुद्धिबळाला महत्त्व मिळाले.
कुणाची मते कुणावर बंधनकारक नसतात.  आवडती आणि नावडती मते आपण ठरवू शकतो, नावडत्या मताबद्दल मतप्रदर्शन पण, तेही संयतपणे, हा एक सामान्य नियम आहे.
केतनकुमार पाटील, पुणे

देहबोलीचे दूर-दर्शन
आनंदच्या देहबोलीसंबंधातले महेश परब यांचे विश्लेषण (लोकमानस, २७ नोव्हें.) वाचले. आनंद हा नेहमी थोडा दबलेला दिसतो, असे ते म्हणतात. तसे असेलही; परंतु या सामन्यात पाचव्या डावानंतर त्याच्या चेहऱ्यावरील नैराश्य डाव खेळताना आणि पत्रकारांसमोरील वार्तालापात लपून राहात नव्हते. तसा तो नेहमी वावरत असेल असे नाही. वास्तविक डीडी स्पोर्ट्सवरून पूर्ण सामन्याचे थेट प्रक्षेपण सादर झाले, ही बुद्धिबळ जिज्ञासूंना पर्वणी होती. ती बुद्धिबळाचे डाव पाहण्यात, अभ्यासण्यात तर होतीच; पण या उच्च कोटीच्या मानसिक द्वंद्वात गुंतलेल्या दोघांची देहबोली न्याहाळण्यातही होतीच होती, हे नाकारण्यात अर्थ नाही. परब आक्षेप घेतात तो आपल्यातील पराकोटीच्या सामाजिक अनास्थेचा मुद्दा चोख असला आणि प्रस्तुत विषयाच्या संदर्भात अगदीच गैरलागू नसला, तरीही तो एक वेगळा विषय आहे. थेट प्रक्षेपणात या बुद्धिबळपटूंच्या चेहऱ्यांवरचे भावदर्शन, त्यांची देहबोली अनुभवणे हा एक आगळा अनुभव होता. ‘डीडी स्पोर्ट्स’चे हे थेट प्रक्षेपण तितके प्रेक्षकस्नेही नव्हते; परंतु त्यांनी जे केले त्याबद्दल रसिक त्यांचे ऋ णी राहतील.
नरेंद्र कुळकर्णी, वडाळा (मुंबई)

समाजमाध्यमांचे खेळ
स्क्वॉशपटू जोश्ना चिनप्पा हिचे कोणत्याही समाजमाध्यमांत- सोशल नेटवìकग साइटवर-  खाते नसल्याचे वाचले. (लोकसत्ता, २७ नोव्हेंबर) यासाठी वेळ फुकट घालवण्यापेक्षा सरावाला ती प्राधान्य देते. मात्र तिला स्क्वॉशचा प्रचार करायचा आहे, असेही ती म्हणते. कोणत्याही चांगल्या गोष्टींच्या प्रचारासाठी फेसबुकसारखी माध्यमे ही अतिशय उपयुक्त ठरू शकतात. या माध्यमांचा योग्य वापर तुम्ही कशासाठी, कसा करणार आणि त्यासाठी किती वेळ देणार यावर अवलंबून आहे. आपल्या मुख्य कामाकडे जास्तीतजास्त लक्ष देऊन फावल्या वेळात तारतम्य बाळगून युवा क्रीडापटूंनी समाजमाध्यमांवर सक्रिय राहायला कुणीही हरकत घेणार नाही.
दीपक चव्हाण, रत्नागिरी.

कैवार घेणे, सुपाऱ्या देणे, पोलिसांना धमकावणे..
कणकवली येथे पोलिसांनी सुपारी घेऊन शिवसनिकांवर हल्ला केला असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. शिवसनिकांवर हल्ला करणाऱ्या पोलिसांची काळी यादी करण्यात आली असून राज्यात युतीची सत्ता आल्यावर त्यांना प्रत्युत्तर देण्यात येईल, असा इशारादेखील त्यांनी दिला आहे. (लोकसत्ता दि. २७ नोव्हेंबर अंकातील वृत्त) .
सर्वसामान्य नागरिकांना पोलिसांकडून जी अन्यायकारक वागणूक मिळते याबाबतही उद्धव ठाकरे यांनी आता लक्ष घालावे. ठाणे या सुसंस्कृत शहरात दहीहंडी उत्सव काळामध्ये होत असलेल्या ध्वनिप्रदूषणाबाबत पोलीस ठाण्यामध्ये शांततेच्या मार्गाने तक्रार करणारे कार्यकत्रे प्रदीप इंदुलकर यांना पोलीस ठाण्यात मारहाण झाली. तेव्हा ठाकरे अथवा अन्य कोणीही नेते सर्वसामान्य नागरिकांची आणि कार्यकर्त्यांची बाजू ऐकून घेण्यासाठी पुढे सरसावले नव्हते.
उलट, राजकीय नेत्यांनी सार्वजनिक रस्त्यांवर विविध उत्सवांद्वारे निर्माण केलेल्या ध्वनी प्रदूषणाविरुद्ध कायदेशीर शांततामय मार्गाने लढा देणाऱ्या कार्यकर्त्यांची संभावना शिवसेनेच्या ज्येष्ठ आमदारांकडून ‘फकीर’ अशी करण्यात आली व दहीहंडीपासून सुरवात झालेला हा आवाजी कल्लोळ नवरात्रातदेखील तसाच सुरू राहिला.
मुंबईच्या िहदुजा महाविद्यालयात सांस्कृतिक संमेलनाबाबत प्राचार्याना शिवसेनेच्या युवा सेनेने कसे धमकावले हे ताजे उदाहरण आहे. सर्वसामान्य नागरिक- त्यात पोलीसदेखील आलेच- यांना कोण धमकावते, कोण कोणाचा कैवार घेते, सुपाऱ्या देते हे न समजण्याइतका सर्वसामान्य भाबडा नाही.
रजनी अशोक देवधर, ठाणे

सदसद्विवेकबुद्धीचे महत्त्व
‘दास डोंगरी राहतो..’ हा अग्रलेख (२७ नोव्हेंबर) आजकाल बोकाळलेल्या व्यक्तिस्तोमावर परखड भाष्य करणारा आहे. तत्त्वनिष्ठ व्यक्तींपकी एक असलेल्या गोिवदराव तळवलकर यांनी त्यांच्या सत्काराला दिलेल्या उत्तराचं निमित्त यथोचित आहेच. मुळात सामाजिक संस्था या एका किंवा एकापेक्षा जास्त व्यक्तींच्या प्रयत्नातून आकाराला येतात. जी व्यक्ती त्यात पुढाकार घेते तिच्या राजकीय वर्तुळातल्या प्रभुत्वाचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्यांचे कोंडाळे वाढू लागते तेव्हा ती संस्था आणि ती व्यक्ती यांच्यातल्या सीमारेषा पुसट केल्या जाऊ लागतात. उद्योगपती, राजकारणात घुसू पाहणारे होतकरू नेते, शिक्षणव्यापार करू पाहणारे लोक आपल्या स्वार्थासाठी त्या व्यक्तीचे अनुयायी होऊन बसतात. त्या व्यक्तीलाही आपल्या जीवनाची इतिश्री यातच आहे असं वाटू लागतं. इथेच त्या सामाजिक संस्थेच्या कार्याचा खरा हेतू लांब पडू लागतो. अनुयायी आणि आपण दोन्ही भरकटणार नाहीत याची काळजी संस्था चालवणाऱ्या व्यक्तीला नेहमीच घ्यावी लागते. असं ऐकलं आहे की गौतम बुद्धही आपल्या अनुयायांना सांगत, ‘मी म्हणतो म्हणून नाही तर तुमच्या सदसद्विवेकबुद्धीला पटेल तेच करा.’ आजच्या जमान्यातही डॉ. नरेंद्र दाभोलकरांसारखे नेते अंनिसच्या अनुयायांनी आपापल्या श्रद्धा जोपासण्याच्या आड आले नाहीत. फक्त संस्थेच्या मूळ उद्देशाला हरताळ फासला जात नाही ना हे पाहण्याचं त्यांचं नम्र आवाहन असायचं.
श्रीपाद पु. कुलकर्णी, बिबवेवाडी पुणे</strong>

व्यापिले जल-भूमी-आकाश
‘जे देखे रवी’ या रविन थत्ते यांच्या सदरातील ‘ज्ञानेश्वरीचे शब्दभांडार’ हा लेख  (२५ नोव्हें.) वाचला. त्यात दिलेला, ‘काय चंचलु मासा। कामिनी कटाक्षु काईसा। लवलाहो तसा। वीजु नाही?’ या ओवीचा अर्थ- कसला घेऊन बसला आहेस कामिनीचा कटाक्ष, विजेला मागे टाकेल अशी माशाची वळवळ असते. ही ओवी सांगताना अविद्य्ोच्या क्षणभंगुरपणावर त्यांचे लक्ष आहे- असा दिला आहे तो पटण्यासारखा नाही.
 गीतेतील- ‘रजो रागात्मकं विद्धि तृष्णासंगसमुद्भवम्। तान् निबध्नाति कौंतेय कर्मसंगेन देहिनम्’.(गीता : १४.७) या श्लोकाच्या विवेचनार्थ ज्ञानेश्वरीत अ. ७ : क्र. १६० ते १७३ अशा चौदा ओव्या आहेत. त्या सलग वाचल्या तर प्रस्तुत ओवीचा अर्थ कळू शकतो. ऐहिक लाभाची हाव धरणारा रजोगुणी माणूस हे कर, ते कर अशी अनेक कामे करीत असतो. श्रीकृष्ण म्हणतात : ( [‘‘अर्जुना, या रजोगुणी माणसाचा झपाटा (लवलाहो) इतका वेगवान असतो की] माशाची चंचलता काय, युवतीच्या कटाक्षाची अस्थिरता काय किंवा विजेची चपलता काय यांची गतीसुद्धा इतकी नसते.) असा समर्पक अर्थ लागतो.
यात मासा सागरातील, कामिनी जमिनीवरील तर वीज आकाशातील आहे. याप्रमाणे एका प्रतिमेत ज्ञानेश्वरांनी जल-भूमी-आकाश व्यापली आहेत.
– यशवंत ना. वालावलकर, पुणे