गिडवाणी यांच्या निधनाने ‘आदर्श’ तपास डळमळण्याची  शक्यता २९ नोव्हेंबरच्या लोकसत्तातील बातमीत व्यक्त केली आहे. ‘आदर्श’ इमारतीमुळे राष्ट्राच्या सुरक्षिततेला धोका असल्याचे मत नौदलाने दिल्यानंतर वरचे मजले, खालचे मजले यांचा घोळ न घालता वटहुकूम काढून सरकारने ‘आदर्श’ इमारत पायापर्यंत जमीनदोस्त करण्याचा आदेश देऊन एक महिन्याच्या आत त्याची अंमलबजावणी करायला हवी होती. परंतु सरकारमध्ये असलेल्या आणि बाहेर असलेल्या सोनेरी टोळीने महानगर दंडाधिकाऱ्यांपुढे प्रकरण नेले. तेव्हाच राष्ट्राच्या हिताला भ्रष्टांजली देऊन जमीन लष्कराची की सरकारची, आयुक्त जबाबदार की सचिव, विलासराव की अशोकराव हा घोळ चालू झाला आणि जनतेच्या डोळ्यात धूळफेक चालू झाली. या चौकशीचे नाटक प्रथम ‘आदर्श’ ताबडतोब जमीनदोस्त करून अनेक दशके चालू ठेवता आले असते, पण भ्रष्टाचाऱ्यांनी आम्ही पोपट मारला आहे असे सांगायचे नाही असा निर्णय घेतल्यावर कोण काय करणार? पालघरला दोन तरुणींना पोलिसांनी पकडल्यावर देशभर गदारोळ माजला. सर्वोच्च न्यायालय संतप्त झाले, पण ‘आदर्श’साठी? स्वातंत्र्यपूर्व काळात राष्ट्रासाठी आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेवणारे, निखारे ठेवणारे, फासांत आपली मान वंदेमातरमचा घोष करीत देणारे होऊन गेले. आता स्वत:च्या कल्याणासाठी राष्ट्रहितावर तुळशीपत्र-निखारे ठेवणारे जन्माला आले आहेत असे वाटते.
-प्रभाकर पानट, मुलुंड (पूर्व).

‘नैतिकतेला बाधा आणणारी शिक्षण पद्धती’
‘अस्मितांच्या राजकारणात शैक्षणिक प्रश्नांची घुमसट’ या डॉ. मिलिंद वाघ व छाया देव यांच्या लेखामुळे शिक्षणाच्या अस्मितेचा झेंडा मिरविणाऱ्यांनी निर्माण केलेले बाजारीकरण जनतेपुढे आले. (३० नोव्हें.) अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या तीन मूलभूत गरजा आहेत. या गरजांची पूर्तता झाली नाही तर मानवी जीवनात कोणताही अर्थ उरत नाही. मात्र अलीकडील जगाचे चित्र पाहता या मूलभूत गरजांमध्ये शिक्षण हे अतिशय गरजेचे वाटत आहे. शिक्षणामुळे त्याच्यातील बदल व घडविलेले परिवर्तन हे समाजाला, राष्ट्राला दिशा देणारी पायवाट ठरते. आज जगातील सर्वच राष्ट्रांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून शिक्षणावर लक्ष केंद्रित केले आहे. शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी विविध योजना, उपक्रम राबवून पाश्चिमात्य देश जगावर प्रभुत्व गाजवत आहेत. परंतु भारत देशातील शिक्षण क्षेत्रावर नजर फिरविल्यास भ्रष्टाचाराचे बाजारीकरण झाल्याचे पाहावयास मिळत आहे. शिक्षणासारखे पवित्र क्षेत्र यामुळे बदनाम होत आहे. प्राथमिक शिक्षणाची ढासळणारी गुणवत्ता व दुरवस्था हा शिक्षण क्षेत्रातील चिंतेचा विषय बनला आहे. गुणवत्ता ढासळण्याची कारणे, वास्तव स्थिती व करावे लागणारे उपाय यांचा कुठलाही वास्तवदर्शी विचार शिक्षण विभाग करीत नाही. मंत्रालयातील बदलून आलेले सनदी नोकरशहा आपल्याला हवे तसे शिक्षण व्हावे म्हणून कल्पकतेच्या नावाखाली आदेष काढतात. तर शिक्षणमंत्री बदलला की शिक्षणविषयक धोरण बदलते. अशी परंपरा चालू राहिली तर शिक्षणाची गुणवत्ता कशी वाढेल?
इंग्रजांनी सुरू केलेली शिक्षण पद्धती म्हणजे गुलाम निर्माण करून श्रमसंस्कृतीला पायदळी तुडविणारी अशी होती. याच शिक्षणपद्धतीचा स्वातंत्र्यानंतर स्वीकार केला गेला. त्यामुळे विषमतेला खतपाणी घातले गेले. नोकरदार मोठय़ा प्रमाणात तयार झाले.चंगळवादी संस्कृतीचे, बाजारू संस्कृतीचे समर्थन करणारा अधिकारीवर्ग तयार झाला. शिक्षणाने नागरिक साक्षर झाले, परंतु सुशिक्षित झाले नाहीत. उत्तम शेतकरी, उद्योजक कोणी होत नाहीत. म्हणजेच शिक्षणपद्धती ही श्रमसंस्कृतीला व नैतिकतेला मारक अशी आहे. अशातच कोत्या अस्मितेचे राजकारण करणारे शिक्षणाला बाजारू स्वरूप आणताना कॅपिटेशन फी, डोनेशनचा वापर करून पालकांना वेठीस धरत आहेत. शासनातर्फे समाजातील काही मागासवर्गीयांना मिळणारी शिष्यवृत्ती स्वत:ला शिक्षणसम्राट म्हणवणारे राजकारणी गिळंकृत करीत आहेत. म्हणूनच सरकारने शिक्षणाला महत्त्व देण्यासाठी समाजवादी अध्यापक, पुरोगामी विचारांचा व्यापक विचार करणारे अध्यापक यांना प्रोत्साहन देऊन शिक्षणाची गुणवत्ता वाढवली पाहिजे. तेव्हाच भारत महासत्तेकडे     वाटचाल करीत असल्याचे स्वप्न सत्यात उतरेल.
– शिवदास पुं. शिरोडकर, लालबाग

‘एकटय़ा स्त्रिया व वयोवृद्धांवर होणाऱ्या हल्ल्यांपासून बचावासाठी’
नुकताच एका स्पॅनिश तरुणीवर, एका नराधमाने हल्ला करून, तिच्यावर अत्याचार केला. आपल्याकडे असे घृणास्पद हल्ले वारंवार होत आहेत व दिवसागणिक वाढतच आहेत. गेल्या काही दिवसांत मुंबईतही असे प्रकार घडल्याचे लक्षात आले आहे. बरेच वेळा मदतीसाठी हाक देण्यासाठी वाव मिळतो, त्यासाठी पुढील व्यवहार्य कार्यवाही सुचवीत आहे. देशातल्या एसएमएस सेवा देणाऱ्या सर्व मोबाइल फोन कंपन्यांनी, आपापल्या सर्व मोबाइलधारक ग्राहकांना वेळोवेळी एसएमएस पाठवून, त्यांना त्यांच्या विभागातील पोलीस स्टेशनचे नंबर, फायर ब्रिगेडचे नंबर, अ‍ॅम्ब्युलन्स सर्विसचे नंबर स्वत:हून कळवून आपापल्या हॅन्डसेटच्या फोनबुकमध्ये रजिस्टर करावयास सांगावे. सर्वसाधारणपणे १०० नंबरचा प्रतिसाद   मिळतच नाही म्हणून मोबाइलधारकाने आपल्या घराजवळच्या पोलीस स्टेशनचा नंबर आवर्जून ठेवावा. संबंध बरे-वाईट कसेही असोत, प्रत्येकाने आपल्या दोन तरी शेजाऱ्यांचे नंबर आपल्या फोनबुकमध्ये नोंदवावेत. झोपतानाही आपला मोबाइल हॅन्डसेट जवळ बाळगावा. दारात कोणी परका वा कुरीअरवाला आल्यास, दार उघडण्यापूर्वी शेजाऱ्यास फोन करावा. नातवंडे-भाचरे-पुतणे मंडळी आल्यास शेजारी ‘मिस कॉल’ देऊन ठेवावा, केवळ सावधगिरी म्हणून.
– सुप्रिया जुन्नरकर,  (शिवाजी पार्क)

पण काय करणार?
जाधव यांची साहित्यसेवा हा अग्रलेख नेहमीप्रमाणे छान. (१० डिसें.) राजकारणी मंडळींना यामुळे काही फरक पडतो का? परंतु आपण प्रत्येकाचे माप (पाप?) ज्याच्या त्याच्या पदरात घातले आहे. सहन करायला शिकविते ते साहित्य असे कुठे तरी वाचल्याचे स्मरते. सम्मेलनात सहमीलन असावे असे म्हणतात. चिपळूणच्या सम्मेलनापूर्वीच, (अध्यक्षपदाची निवडणूकही त्यात आली) जे काही पाहावे ऐकावे लागते आहे त्यामुळे सदसद्विवेक बुद्धी असणाऱ्या कोणालाही चीड, राग, संताप न आला तरच नवल! पण काय करणार? आमचेच दगड, आमच्याच विटा, आमचीच वाळू आमचेच लोखंड (सळ्या वगरे) आणि आमचेच सगळे भाईबंद! फक्त रसिकांच्याच उपस्थितीत निखळ आनंदमयी संमेलन केव्हा होईल न कळे.
– मधुकर घारपुरे, सावंतवाडी

प्रकाशकांचे व्यावसायिक कौशल्य !
मराठीला नोबेल कसे मिळणार हे सागर पाटील यांचे पत्र मराठी साहित्य क्षेत्राचे वास्तव दाखवणारे आहे.  (१० डिसें.) राजकारण, समाजकारण यासारखेच साहित्य संस्कृती या क्षेत्रातही भ्रष्टाचार आहे आणि आपली देशाची ती प्रकृतीच. त्यात धक्कादायक काही नाही . प्रकाशकांच्या व्यावसायिक कौशल्याचे एक उदाहरण सध्या ताजे आहे . झिम्मा या पुस्तकाची जाहिरात आहे त्यात या पुस्तकाची तिसरी आवृत्ती असा उल्लेख आहे .आता एका महिन्यात तिसरी आवृत्ती म्हणजे जरा जास्तच झाले नाही का ? कदाचित प्रकाशकांना तिसरे पुनर्मुद्रण असे म्हणायचे असावे. कारण आवृत्ती या शव्दात पुर्नसपादन, काही भर, काही काटछाट अभिप्रेत आहे असे मला वाटते. तसे काही नसेल तर त्याला आवृत्ती कसे म्हणता येईल .
– शिरीष धारवाडकर, औरंगाबाद</strong>

विक्रमपथावरील नवा तारा  
केवळ वयाच्या २७ व्या वर्षी ७ हजार धावांचा टप्पा पार आणि २३ कसोटी शतके करणाऱ्या इंग्लंड कप्तान कुकमध्ये भविष्यात १५ हजार धावा आणि ५० शतके करण्याची धमक असल्याचे सुनील गावसकर यांचे प्रतिपादन योग्यच व त्याचा हा आवेग तमाम ‘विक्रम’वीरांच्या ‘विक्रमांना’ हादरवणाराच होय! मुख्य म्हणजे त्याच्या या बहुतांशी धावा व शतके प्रतिकूल परिस्थितीतून संघाला तारणारी, व प्रसंगी विजयपथाकडे नेणारी होती. कुकच्या प्रदीर्घ खेळीतील गावसकर यांनी उल्लेखलेली ‘लक्षवेधी क्षमता’ कोणत्याही क्रीडा प्रकारातील युवा खेळाडूंनी आत्मसात करण्यायोग्यच!      
– किरण चौधरी, वसई.