धर्माचा प्रसार प्रत्येक वेळी झाला तो केवळ राजसत्तेच्या पाठिंब्यामुळे हे वास्तव आहे. आता राजसत्ता बदलामुळे धर्मचक्राचा फेराही उलटय़ा दिशेने फिरला असून इतके दिवस धर्मातरे घडवणाऱ्यांवर स्वधर्मीयांचे धर्मातर पाहावयाची वेळ आली आहे. म्हणूनच आता तरी देशात सर्वच प्रकारच्या धर्मातरांवर बंदी घालणे योग्य ठरेल.

आग्रा येथील काही मुसलमानांचे धर्मातर केल्याचा मुद्दा अपेक्षेप्रमाणे गाजू लागला आहे. रास्व संघाशी निगडित बजरंग दलाने हे धर्मातर घडवून आणल्याचे बोलले जात असून आणखीही अशी काही धर्मातरे करविण्याचा संघाचा प्रयत्न असल्याचे सांगितले जाते. या धर्मातरांना अधिक गती यावी यासाठी संघाने काही स्वयंसेवकांची तुकडीच स्थापन केली असल्याचेही वृत्त आहे. घर वापसी असे या धर्मातर योजनेचे नाव आहे आणि ती राबविण्याची जबाबदारी ज्येष्ठ संघ प्रचारक मुकुंदराव पणशीकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहे. ते ती चोख पार पाडतील यात संदेह नाही. त्याचप्रमाणे या मुद्दय़ावर आवश्यक तो वादविवाद घातला जाईल याबाबतही कोणास संदेह असणार नाही. देशात नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर आल्यामुळे या धर्मातरांना अधिक गती येईल आणि त्यामुळे िहदू कार्यक्रम राबवीत असल्याबद्दल मोदी सरकारच्या विरोधात जमेल तितका मोठा गदारोळ केला जाईल, या प्रश्नावर जास्तीत जास्त प्रक्षोभ निर्माण कसा होईल याचीही काळजी घेतली जाईल आणि राजसत्तेने धर्माचा आधार घेणे कसे गर आहे यावर ठराविकांची ठरावीक पोपटपंचीदेखील सुरू होईल यातही काही शंका नाही. यात अर्थातच आघाडीवर असतील स्वत:ला सेक्युलर मानणारे. आणि या माध्यमस्नेही सेक्युलर बोलघेवडय़ांना तोंड देताना अजागळ संघीय यामागे आमचा हात कसा नाही हे सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न करतील. वस्तुत: वैचारिकतेच्या दोन ध्रुवांवर असलेले हे दोघेही थोडय़ाफार फरकाने तितकेच दांभिक आहेत, हे विसरून चालणार नाही.

याचे कारण असे की स्वघोषित सेक्युलरांना आवडो की न आवडो, धर्माचा प्रसार प्रत्येक वेळी झाला तो केवळ राजसत्तेच्या पाठिंब्यामुळे हे वास्तव आहे. ख्रिश्चन धर्मातील प्रमुख धर्मगुरूपद भूषविणाऱ्या पोप यांच्याकडेच एके काळी राजसत्तेची सूत्रे असत, याचे स्मरण यानिमित्ताने करून देणे गरजेचे आहे. किंबहुना पोप हाच राजा असल्यामुळे ख्रिश्चन धर्माचा प्रसार जोमाने झाला. पुढे रोमन साम्राज्याने पोपला पाठिंबा दिल्याचा फायदाही ख्रिश्चन धर्माने उठवला. इस्लामविषयीदेखील हेच सांगता येईल. आज अतिरेकी कडवेपणासाठी ओळखला जाणाऱ्या वहाबी पंथाचा संस्थापक मुहंमद इब्न अब्द अल वहाब याचे सौदी अरेबियाचा संस्थापक महंमद बिन इब्न सौद याच्याशी संगनमत होते. राजा होऊ पाहणाऱ्या सौद यास धर्मसत्तेच्या पाठिंब्याची गरज होती आणि साधा धर्मगुरू असलेल्या वहाब यास आपल्या शाखेच्या प्रचारासाठी समर्थ राजसत्ता आवश्यक होती. हा परस्पर संयोग उभयतांसाठी महत्त्वाचा ठरला. सौदने वहाब आणि त्या पंथाचे पालन करणारे इखवान यांच्या मदतीने आपले राज्य स्थापन केले. यातील महत्त्वाचा मुद्दा हा की पुढे हे इखवान वारंवार सौदच्या कारभारात धर्माच्या कारणांसाठी अडथळे आणू लागले असता सौदी राजाने त्यांची शब्दश: कत्तल केली. तेव्हा मुद्दा हा की जोपर्यंत वहाब यास सौदी राजाची साथ होती तोपर्यंत तो वेगाने पसरला. पुढे तो वेग मंदावला आणि अलीकडे पुन्हा सौदीकडून पािठबा मिळू लागल्यावर तो वाढला. त्याही आधी ख्रिस्तपूर्व अडीचशे-तीनशे वर्षांपूर्वी संपूर्ण भारतवर्षांवर राज्य करणारा सम्राट अशोक याच्या काळात बौद्ध धर्माचा प्रसार झाला तो राजसत्तेचा पाठिंबा असल्यामुळेच. आधुनिक काळातही ख्रिश्चन धर्मीय राजसत्तेकडून धर्मसत्तेस मिळालेल्या वा मिळत असलेल्या पाठिंब्याची उदाहरणे कमी नाहीत. यातील सर्वात ताजे म्हणावे असे उदाहरण अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉर्ज बुश यांचे. बुश हे स्वत: ख्रिश्चन धर्मातील शुभवर्तमानवादी (एव्हांजेलिकल) पंथाचे कडवे समर्थक. इतकेच काय, थेट व्हाइट हाऊसमध्येच त्यांनी बायबलच्या शिकवण्या सुरू केल्या होत्या. हा गृहस्थ इतका मागास होता की स्कंद पेशी (स्टेम सेल्स) सारख्या महत्त्वाच्या विज्ञान संशोधनास त्यांचा विरोध होता. का? तर चर्चच्या धर्मसंस्थेस ते मंजूर नाही म्हणून. त्याचप्रमाणे गर्भपातदेखील बुश यांच्या मते अधर्मकृत्य होते. त्यांच्याच काळात पेंटाकोस्टल ख्रिश्चन नावाने ओळखल्या जाणाऱ्या पंथाचा अफाट प्रसार झाला. आज जगात सर्वात वेगाने वाढणारा कोणता धर्मगट असेल तर तो पेंटाकोस्टल ख्रिश्चन हा आहे. जास्तीत जास्त अन्य धर्मीयांना ख्रिस्ताच्या पायाशी आणून त्यांचे धर्मातर घडवणे हे या पंथाचे जीवितकार्य आहे. या पंथीयांच्या मागे राजसत्ता नसती तर तिचा इतका प्रसार झाला असता काय? समाजसेवेसाठी म्हणून गौरवल्या जाणाऱ्या मदर तेरेसा या अगदी मरणासन्न असलेल्या व्यक्तीचेही धर्मातर करीत, हा इतिहास आहे. त्याच वेळी सर्व बोलघेवडय़ा सेक्युलरांनी मदर तेरेसा यांच्या धर्मातर मोहिमांविरोधात सामुदायिक मौन बाळगले होते, हादेखील इतिहास आहे आणि तो मदर तेरेसांच्या धर्मातर मोहिमांइतकाच वास्तव आहे. तेव्हा या सगळ्याचा अर्थ इतकाच की इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यावर राजसत्तेने सोयीस्करपणे धर्मसत्तेशी शय्यासोबत केली असून या दोघांत अंतर असावे ही आदर्श वाटावी अशी संकल्पना पाळली गेल्याची उदाहरणे हाताच्या बोटावर मोजावी इतकीच आहेत.

आपल्याकडे प्रश्न आहे तो या सगळ्याच्या विरोधातील निवडक निषेधाचा. कोणत्याही पक्षाच्या, कोणत्याही धर्मतत्त्व विचाराच्या सरकारने धर्मातरास उत्तेजन देता कामा नये. परंतु काँग्रेसच्या सत्ताकाळात ईशान्य भारतात ख्रिस्ती मिशनऱ्यांकडून होत असलेल्या धर्मातरांकडे सोयीस्कर दुर्लक्ष करीत पुरोगामी म्हणून मिरवायचे आणि भाजपच्या सत्ताकाळात हिंदू धर्मातरे वाढली की बोंब ठोकायची, ही लबाडी झाली आणि ती आपल्याकडे वर्षांनुवष्रे बिनबोभाट सुरू आहे. हिंदूंचे अन्य धर्मात होणाऱ्या स्थलांतराचे समर्थन करताना हिंदूंमधील जातव्यवस्थेला कंटाळून हे धर्मातर झाल्याचा दावा काही करतात. पण तो अगदीच फसवा आहे.

तो खरा असेल तर ही मंडळी धर्मातरानंतरदेखील जातव्यवस्था कशी काय कायम ठेवतात? गोव्यासारख्या राज्यात ख्रिश्चनांमधील जातव्यवस्था हे याचे उदाहरण. त्या धर्मात सर्वच समान असतील तर ख्रिश्चन ब्राह्मण वा ख्रिश्चन मागास या वर्गीकरणाचे समर्थन कसे करणार? ही असली लबाडी संस्कृतीच्या प्रत्येक क्षेत्रात सुरू आहे. काँग्रेसच्या सत्ताकाळात किती पुरोगाम्यांनी कोणकोणती पदे किती काळ उबवली आणि इतिहासलेखन आदी कार्य करीत असल्याचे सांगत किती सरकारी मलिदा उकळला याचा तपशील उपलब्ध नाही, असे नाही. याच वैचारिक लबाडीमुळे काँग्रेसच्या काळात दिल्लीस्थित जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयातील विद्वानांची सरकारी सोय होते आणि भाजप सत्तेवर आल्यावर बनारस हिंदू विश्वविद्यालयातील पंडितांसाठी सरकारी समित्यांची दारे आपोआप उघडू लागतात. तेव्हा आग्रा येथील ताज्या धर्मातरांमुळे जे काही वाद निर्माण झाले आहेत वा निर्माण केले जाणार आहेत, ते टाळायचे अथवा सोडवायचे असतील तर आधी मुदलात आपल्यात वैचारिक प्रामाणिकपणा निर्माण करावा लागेल.

तसा तो झाला तर हे सर्व टाळण्यासाठी एक सोपा उपाय निघू शकतो. तो म्हणजे सर्वच प्रकारच्या धर्मातरांवर बंदी घालण्याचा. त्यामुळे कोणीही कोणत्याही धर्माचा असला तरी धर्मातर करू शकणार नाही. परंतु अशा कायद्यास मुसलमान आणि ख्रिश्चनांनी इतके दिवस विरोध केला आहे. या विरोधातही पुरोगाम्यांनी कधी आपली बुद्धिमत्ता वापरल्याचे उदाहरण नाही. अन्य धर्मीयांचा अशा कायद्यास विरोध होता कारण तेव्हा धर्मातरासाठी हिंदू सहज गळाला लागत म्हणून. आता राजसत्ता बदलामुळे धर्मचक्राचा फेराही उलटय़ा दिशेने फिरला असून इतके दिवस धर्मातरे घडवणाऱ्यांवर स्वधर्मीयांचे धर्मातर पाहावयाची वेळ आली आहे. धर्मातरांची तलवार दुधारी असते आणि ती आपल्या धर्मावरही चालू शकते याची जाणीव आता त्यांना झाली आहे. अशा वेळी सर्वानीच धर्म घराच्या उंबरठय़ातच ठेवावा आणि सर्वच धर्मातरांना विरोध करावा. सार्वजनिक जीवनात धर्मा म्हणू नये आपुला असेच धोरण हवे.