सहिष्णुतेच्या मूल्यापेक्षा आमचा धर्म मोठा, कायद्यापेक्षा आमचे म्हणणे मोठे, असे मानणाऱ्या समाजात व्यक्तीला सत्तेपुढे शरण जावे लागते. सत्ताधाऱ्यांना शरण गेल्याखेरीज बढत्या मिळत नाहीत किंवा स्थान टिकत नाही.. व्यक्ती कितीही प्रामाणिक, कितीही तत्त्वनिष्ठ असली तरीही झुकण्याची वेळ यावी, इतका हा समाज सत्ताधार्जिणा झालेला असतो. असा अनुभव भारताच्या शेजारी देशाने- पाकिस्तानने आजपासून कैक वर्षे आधीच घेतला होता; परंतु त्याही परिस्थितीत राणा भगवानदास यांनी पदाचे अधिकार टिकवता येतात, हे दाखवून दिले होते. इफ्तिकार अहमद चौधरी यांच्या अनुपस्थितीमुळे ‘हंगामी (प्रभारी) सरन्यायाधीश’ हे पद राणा यांना मिळाले, त्याच पदावरून त्यांनी ‘चौधरी यांना सरन्यायाधीशपदी पुनस्र्थापित होण्याचा पूर्ण अधिकार आहे’ असा निर्णयही दिला होता. राणा भगवानदास यांचे सोमवारी झालेले निधन, या प्रेरक प्रसंगाची आठवण करून देणारे आहे. राणा भगवानदास हे मुस्लीम नसून हिंदू (सिंधी राजपूत) आहेत आणि पाकिस्तान हा इस्लामी प्रजासत्ताक आहे, म्हणून राणा यांना कोणतेही न्यायालयीन पीठासन मिळणेच चूक, असे पाकिस्तानी झुंडींचे म्हणणे होते. अर्थात, या म्हणण्याला अन्य न्यायाधीशांनी आणि वकिलांच्या संघटनांनीही त्या वेळी विरोध केला होताच; परंतु राणा यांना २००० मध्ये सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशपद मिळाले. जनरल परवेझ मुशर्रफ यांनी २० जून २००१ रोजी स्वत:ला राष्ट्राध्यक्ष घोषित केल्यावर सर्वच न्यायमूर्तीना कमीअधिक प्रमाणात त्रास सुरू झाला, तो ‘हय़ुमन राइट्स वॉच’ या संस्थेपुढे राणा यांनी मांडला होता. त्यांना २००७ मध्ये मुदतपूर्व निवृत्ती घेणे भाग पडावे, असे प्रयत्नही मुशर्रफ राजवटीने केले. याचे कारण, त्या वर्षीच्या नोव्हेंबरात मुशर्रफ यांनी आणलेली आणीबाणी व नवी ‘हंगामी राज्यघटना’ राणा यांनी बेकायदा ठरविली होती. २० डिसेंबर १९४२ रोजी जन्मलेल्या भगवानदास यांनी १९६५ मध्ये वकिलीचे शिक्षण पूर्ण करून सिंध प्रांतातील लाडकाना येथे वकिली केली. १९६७ पासून ते सरकारी न्याय-सेवेत गेले. सत्र न्यायाधीशापासून सुरुवात करून १९९४ मध्ये सिंधच्या उच्च न्यायालयाचे न्यायाधीशही झाले; परंतु १९९९ मध्ये या नियुक्तीला आव्हान देण्यात आले. राणांचा सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा मार्ग रोखण्याची ही खेळी त्यांच्या परधर्मीयतेचा बाऊ करूनही खेळली गेली. अपयश विरोधकांनाच आले; परंतु अल्पसंख्याकांना कसे भाजीपाला समजले जाते, याचा थेट अनुभव राणांना मिळाला.