आजच्या व्यंगचित्रकारांमध्ये प्रखर सामाजिक जाणिवांचे भान असलेले व्यंगचित्रकार म्हणून प्रशांत कुलकर्णी ओळखले जातात. त्यांच्या व्यंगचित्रांतून समाजातील आíथक विषमतेवर भेदक टिप्पणी झाल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. लोकसत्ता (३१ डिसेंबर) मधील ‘काय चाललंय काय!’ सदरातील व्यंगचित्रातून त्याचा पुन:प्रत्यय येतो.
   उच्चभ्रूंच्या सोसायटीची कम्पाऊंड वॉल. त्या भिंतीपलीकडे श्रीमंतवर्गाकडून साजरा होत असलेला वर्षअखेरीचा सोहळा. कंपाऊंडच्या बाहेर भिकारी. त्याच्या खांद्यावर उभे राहून हा धमाका बघण्याचा प्रयत्न करणारा त्या भिकाऱ्याचा मुलगा. भविष्यात तूही या धमक्यात सामील होशील अशी (भाबडी) आशा मुलाला दाखवणारा भिकारी. चित्र तसे साधेच, पण अनेक प्रतीकांनी भरलेले.
   सोसायटीच्या भिंतीची कड म्हणजे दारिद्रय़रेषा. भिंतीवरून कोणी प्रवेश करू नये म्हणून त्यावर लावलेल्या काचा म्हणजे दारिद्रय़रेषेच्या वर जाण्याच्या मार्गातले काटेच. पुढच्या पिढीची प्रगती ही आधीच्या पिढीच्या मदतीवर होते हे सूचित करणारा भिकाऱ्याच्या खांद्यावर उभा राहिलेला मुलगा. परंतु फुटपाथवरच राहणाऱ्या भिकाऱ्याने आपल्या मुलाचं स्वत:चं घर असण्याची आशा बाळगणं म्हणजे मृगजळच. ते सूचित होतंय भिंतीच्या उंचीने!
इतक्या हृदयस्पर्शी व्यंगचित्राने वर्षअखेर केल्याबद्दल प्रशांत कुलकर्णी यांचे अभिनंदन!

‘पीके’: विनाकारण गहजबही नकोच!
‘‘पीके’ या चित्रपटाचा उल्लेखही नको !’ (३१ डिसेंबर) हे पत्र वाचले. त्या पत्रातून आमिर खान यांच्यावर ते फक्त एका विशिष्ट धर्माचे असल्यामुळेच ओढून-ताणून आणि अताíकक अशी टीका झाल्याचे दिसते. पत्रलेखकाने या पत्रातून स्वत:च्या पूर्वग्रहदूषित दृष्टिकोनाचा परिचय करून दिला आहे, असे म्हणण्यास वाव आहे.
कुणी कुणाशी लग्न करायचे, हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. आमिर खान यांनी जर त्यांच्या पहिल्या पत्नी रीना दत्त यांच्याशी रीतसर फारकत घेऊन जर किरण राव यांच्याशी दुसरा विवाह केला असेल आणि काही जीवशास्त्रीय दोषांमुळे जर त्यांनी सरोगसीद्वारे अपत्यप्राप्ती केली असेल तर त्यात गर काय? हा हक्क जसा या देशातील सर्वाना आहे तसा तो आमिर खान यांना नाही का? पण त्यांनी एखादे अनाथ बालकच दत्तक घ्यावयास हवे होते, हा अट्टहास विनाकारणच नव्हे का?
आमिर खान हे काही फार मोठे समाजसुधारक वगरे आहेत असे मला म्हणायचे नाही; पण एक सामाजिक जबाबदारी म्हणून किंवा मग स्वत:च्या कुठल्या तरी फायद्यासाठी (मोबदला) त्यांनी ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमात जर सामाजिक समस्यांवर काही सामाजिक कार्यकत्रे, तज्ज्ञ आणि अत्याचारपीडित यांना व्यासपीठ उपलब्ध करून देऊन जर काही समाजोपयोगी चर्चा घडवून आणली तर ते समाजहिताचे नाही का?
आणि मुळात कुणात किती सामाजिक बांधीलकी आहे हे मोजायचे तरी कसे? आणि तिचे परिमाण तरी कोणते?
आणि समजा, त्यांनी तुमच्या म्हणण्याप्रमाणेच केले असते तरच तुम्ही त्यांना सामाजिक बांधीलकीचे प्रमाणपत्र दिले असते का?      
राहिला प्रश्न ‘पीके’ या चित्रपटाविषयी –
नग्नदृश्य – त्या चित्रपटाच्या पटकथेची तशी गरज आहे म्हणूनच जर त्यांनी त्या दृश्याचे चित्रीकरण केले असेल तर त्यात गर काय?
विशिष्ट धर्मावर टीका –  त्यात कुठल्याही एका(च) धर्मावर जाणूनबुजून टीका केलेली नाही. उलट त्यात प्रत्येक धर्मामधील काही दोषांवरच बोट ठेवले आहे. पटकथेच्या ओघात एका विशिष्ट धर्मामधील दोषांवरच जास्त भाष्य केले आहे, असे त्या धर्माच्या काही स्वयंघोषित रक्षकांना वाटत आहे. त्या ‘रक्षकां’नी अंतर्मुख होऊन आपल्या धर्मातील दोषांचा विचार करायचा सोडून ते दुसऱ्या विशिष्ट धर्मातील दोष का नाही दाखवले म्हणून विनाकारण गहजब माजवून फक्त आपल्या बौद्धिक दिवाळखोरीचा प्रत्यय देत आहेत.  
विशाल भगत, नाशिक

प्रबोधनाचा इतिहास असाच जिवंत राहो!
‘प्रबोधनपर्व’ हे अतिशय उपयुक्त सदर नेटाने व परिणामकारक रीतीने चालविले याविषयी ‘लोकसत्ता’ अभिनंदनास पात्र आहे, तसेच आम्हा जिज्ञासू वाचकांच्या धन्यवादासही.
मागील सुमारे दीडशे वर्षांच महाराष्ट्रात होऊन केलेल्या  विविधांगी विचारवंतांच्या व समाजसुधारकांच्या विचारांचा व कार्याचा अभ्यासपूर्ण व पूर्वग्रहविरहित आढावा घेणे सोपे काम नव्हते परंतु तो घेऊन विचारांचा एक विविधांगी खजिनाच वाचकांसमोर उघडा केला आहे.
 हे सदर असेच सुरू रहावे असे कितीही वाटत असले तरी ‘लोकसत्ता’ने त्याचा अंतही योग्य वेळी करून औचित्य साधले आहे. या सदरातील समारोपात्मक स्फुटलेखसुद्धा समर्पक व चिंतनीय होते. वर्तमानाला वळण लावण्याकरिता इतिहासासारखा दुसरा शिक्षक नाही या आशयाचे विधान फारच मार्मिक वाटले.
नवीन वर्षांपासून असेच एखादे उद्बोधक सदर वरील सदराची जागा घेईल असा विश्वास आहे.
भालचंद्र कालीकर

सारेच ‘प्लेअर्स’ खेळाडू नसतात!
‘खासगी समभाग खेळाडूंकडून ११ अब्जांचे व्यवहार’ ही बातमी (लोकसत्ता, ३० डिसेंबर) वाचली. बातमीचा मथळा क्षणभर कळलाच नाही! थोडा विचार केल्यानंतर लक्षात आले, की हा ‘प्रायव्हेट इक्विटी प्लेअर्स’ करता वापरलेला पर्यायी शब्द आहे! ‘लोकसत्ता’ जाणीवपूर्वक मराठी शब्दांचाच वापर करतो आणि अन्य काही वृत्तपत्रांप्रमाणे सर्रास इंग्लिश शब्दांची घुसखोरी होऊ देत नाही हे खरोखरीच स्तुत्य आहे. असे करताना रुळलेल्या इंग्लिश शब्दांना समानार्थी म्हणून वापरले जाणारे मराठी प्रतिशब्द हे बोजड होणार नाहीत, याची विशेष काळजी घेतल्याचेही वेळोवेळी बातम्या वाचताना जाणवत असते. पण ‘प्रायव्हेट इक्विटी प्लेअर्स’चे शब्दश: भाषांतर ‘खासगी समभाग खेळाडू’ असे करणे हे मात्र जरा अतीच झाले. एकतर ‘इक्विटी’चा मराठी अर्थ ‘समभाग’ असा होत नसून ‘शेअर’साठीचा तो समानार्थी शब्द आहे. इक्विटी हा शब्द शेअर्ससाठी वापरताना ‘एक शेअर-एक मत’ या समानतेच्या तत्त्वाचा भाव त्यात अध्याहृत आहे. तेव्हा ‘प्रायव्हेट इक्विटी प्लेअर्स’साठी ‘खासगी बडे गुंतवणूकदार’ (कारण प्लेअर्स हा शब्द इंग्लिशमध्ये विविध संदर्भात विविध अर्थाने वापरला जातो, पण ‘खेळाडू’ तसे नाही) असा पर्यायी शब्द योजला असता, तर ते अधिक सयुक्तिक ठरले असते.
यश पांडुरंग ठाकूर, विलेपाल्रे पूर्व  (मुंबई)

वाढते ‘लोकमानस’..
‘लोकसत्ता’कडे येणारा वाचक-पत्रांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन २०१५ मध्ये दर शुक्रवारी, ‘लोकमानस’साठी वाढीव जागा मिळणार आहे!
मुद्दे- मते आणि मतांतरेही- लोकांपर्यंत पोहोचणे महत्त्वाचे, या कळकळीतून लिहिल्या गेलेल्या पत्रांना या सदरात नेहमीच प्राधान्य मिळते, तसे ते यंदाही मिळेलच. एका पत्र-लेखकाचे एकच पत्र दर आठवडय़ास छापण्याची रीतही पाळली जाईल.
मात्र, विशेषत ई-मेल पाठविताना काही काळजी लेखकांनीही घ्यावी. पत्राच्या मजकुराखाली स्वतचे नाव – आडनाव, ठिकाण आणि संपर्क क्रमांक (तो गोपनीयच ठेवला जाईल) लिहावे.
ईमेलमधील मराठी मजकूर युनिकोड मध्ये नसल्यास, त्यासाठी वेगळी फाइल ‘आरटीएफ’ अथवा ‘डॉक’ स्वरूपात जोडावी.
हाती लिहिलेल्या पत्रांचेही स्वागत आहेच, परंतु ही पत्रे महापे कार्यालयात थेट पाठविल्यास बरे. त्यासाठीचा पत्ता :
‘लोकमानस’
द्वारा लोकसत्ता, ई एल- १३८, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, एमआयडीसी महापे, नवी मुंबई- ४००७१०.
फॅक्स क्रमांक : ०२२- २७६३३००८