समाजाच्या व्यंगावर भाष्य करणाऱ्याच्या अंगी एक नतिक तटस्थता असणे अत्यावश्यक असते. ती आरके लक्ष्मण यांच्या अंगी पुरेपूर होती. अन्यथा भाष्यकार गावगन्ना भाषणे देत वा मार्गदर्शन करत हिंडू लागला तर ज्यांचे व्यंग दाखवायचे ती माणसे खांद्यावर हात ठेवू लागतात. आरके लक्ष्मण यांच्याबाबत ही शक्यता दूरान्वयानेही नव्हती. कारण आपला बाज आणि भान त्यांनी कधीही सोडले नाही. एखाद्या  शल्यकाच्या डोळ्यावर शोभेल असा जाड, काळ्या काडय़ांचा मोठा चष्मा, कंबरेच्या वर दोन खिसे असलेला पांढराशुभ्र शर्ट, काळी पँट आणि चेहऱ्यावर भारदस्त धीरगंभीरता असे लक्ष्मण यांचे व्यक्तिमत्त्व मूíतमंत शुचिष्मंत भासे. आपल्याला संपादकाइतकेच, किंबहुना कांकणभर जास्तच महत्त्व आहे हे ते जाणून असत. असे महत्त्व असलेल्यांच्या अंगी एक प्रकारचा अहं आणि कमी महत्त्वाच्या लोकांप्रति क्षुद्रतेची भावना असे. ती लक्ष्मण यांच्या चेहऱ्यावर कधी नसे. त्यांच्या जवळपास येण्यासाठी राजकारणी धडपडत. कारण तेच त्यांच्या टीकेचा विषय असत. पण अशांना किती दूर ठेवावे याची एक लक्ष्मणरेषा लक्ष्मण यांच्या मनात असे. ती त्यांनी कधीही ओलांडली नाही. ते ज्या काळात पत्रकारिता करीत, त्या काळी तृतीयपानी संप्रदायाचा उदय झालेला नव्हता. परंतु हा वर्ग असता तरीही लक्ष्मण उडाणटप्पूपणा करीत हिंडले नसते. आपली जबाबदारी आणि कर्तव्ये यांची जाण असलेली एक पिढीच्या पिढी पत्रकारितेत नांदत होती त्या काळी लक्ष्मण या क्षेत्रात आले. या क्षेत्राचे पावित्र्य भंग होईल अशी एकही कृती त्यांच्याकडून कधी घडली नाही. याचे कारण म्हणजे आपल्या माध्यमाच्या मानमर्यादांचे पालन त्यांनी पुरेपूर केले. काळ्यापांढऱ्या रंगाच्या व्यंगचित्रांच्या चौकटी हेच आपले भाष्यमाध्यम आहे. त्याच्या आत राहूनच आपण व्यक्त व्हायला हवे याचे भान सतत त्यांच्या मनात असे. त्यामुळे ते कधी वाचाळपणा करीत हिंडले नाहीत. पण समाजापासून तुटले आहेत, असेही कधी झाले नाही. ही अशी राजस अलिप्तता फार लोभस असते. लक्ष्मण यांची ती तशी होती. त्यामुळे त्यांना पाहूनही प्रसन्न वाटत असे.

बाळासाहेब जेव्हा आर. के. लक्ष्मणना भेटतात..

Devendra Fadnavis criticizes Uddhav Thackeray in nagpur
फडणवीस यांची उध्दव ठाकरेंवर टीका; म्हणाले, “त्यांना तोंडाच्या…”
Kolhapur district, election campaign, caste and religion issues, kolhapur, hatkanangale constituency
कोल्हापूरच्या पुरोगामी भूमीत जाती धर्माच्या आधारातून मतांची जुळवाजुळव
drama review of Himalayachi sawali
‘ती’च्या भोवती..! हिमालयाएवढी खंबीर!
kolhapur, cracks on ambabai mahalaxmi idol
अंबाबाई – महालक्ष्मी मूर्तीवर तडे, तातडीने संवर्धन गरजेचे; पुरातत्व खात्याच्या निवृत्त अधिकाऱ्यांच्या पाहणी अहवालात निष्कर्ष

व्यंगचित्रकारास काकदृष्टी लागते. लक्ष्मण त्यापलीकडचे होते. त्यांना कावळेच आवडत. एरवी समाजाच्या प्रेमास पारखा झालेला हा नीरस पक्षी लक्ष्मण यांचा अत्यंत आवडता होता. त्यांनी कावळ्यांची केलेली रेखाटने ज्यांनी पाहिली त्यांची नजर कावळ्यांच्या बाबत बदलली नाही, असे झाले नसेल. माना वळवून र्कुेबाजपणे पाहणारे, विलक्षण संवादी भासणारे, अत्यंत चलाख कावळ्यांचे लक्ष्मण यांना भलतेच प्रेम. इतके की त्यांनी काकमुद्रांचे प्रदर्शनदेखील भरवले होते. कावळ्याचे पाहणे अत्यंत बोलके असते. कधी त्यात चाणाक्षपणा दिसतो तर कधी तारेवर वा झाडावर आपलाच कोणी सहकारी अडकलेला पाहून कावळे कासावीस होतात. कावळ्यांची ही बोलकी नजर हे आरके लक्ष्मण यांच्या कॉमन मॅनच्या डोळ्यात उतरत असे. राजकारण्यांसमोर असहाय भासणारा, पत्नीच्या युक्तिवादासमोर शहाणे मौन पाळणारा, परिस्थितीकडे बेरक्या नजरेने पाहणारा हा कॉमन मॅन ही आरके यांची भारताला देणगी. भारतास स्वातंत्र्य मिळाले त्या मुहूर्तावर आरके यांनी व्यंगचित्रकलेचा दैनंदिन शुभारंभ केला. या स्वतंत्र भारतातील कॉमन मॅन जवळपास आरकेंच्या व्यंगचित्रातून व्यक्त होत होता, हे त्यांचे श्रेष्ठत्व. देशातील खऱ्याखुऱ्या सामान्य माणसाला आरकेंची व्यंगचित्रे आवडत कारण त्या सामान्याच्या भावनांनाच त्यांच्या चित्रातून वाट फुटत असे. ‘धरणाचे बांधकाम उत्तम झाले आहे, परंतु छोटीशी चूक म्हणजे जवळपास कोठेही नदीच नाही’, असे जेव्हा त्यांच्या व्यंगचित्रातील अभियंता इंदिरा गांधी यांना सांगत असे तेव्हा अगदी यासारखेच काही तरी आपल्यालाही लक्षात आले होते, असेच ते व्यंगचित्र पाहणाऱ्या सामान्य वाचकास वाटत असे. पं. नेहरू यांना जग सतत गुलाबी रंगात रेखाटत असे. पण आरकेंच्या व्यंगचित्रातले पं. नेहरू हे अर्धटक्कलधारी असत आणि त्यांच्या चेहऱ्यावर मी (तुमच्यापेक्षा) शहाणा असा भाव असे. सामान्य माणसास ते आपलेच निरीक्षण वाटे. राजनारायण नावाची वल्ली आरकेंच्या व्यंगचित्रात पाहून उगाच उचापत्या करीत हिडणाऱ्या व्रात्य पोराची आठवण करून देत असे तेव्हा ते अर्कचित्र आपल्याही भावना व्यक्त करते असेच पाहणाऱ्यास वाटे. लालकृष्ण अडवाणी यांच्या केशरहित डोक्यावर आरकेंच्या व्यंगचित्रातून दिसणारा मुकुट अदृश्यपणे जनतेलाही दिसत असे किंवा वाजपेयींच्या दंताजीचे ठाणे उठलेल्या तोंडावरचे बालसुलभ खटय़ाळपण अनेकांना जाणवलेले असे. चेहऱ्यावर शिक्षकी किरकिरेपणा असणारे मोरारजी देसाई, तुच्छतावादी ठाकूर चरणसिंग, अत्यंत गरुडनाक्या पण विलक्षण तोऱ्यातल्या इंदिरा गांधी, नतिकतेचा आव आणत राजकारण करू पाहणारे पण ज्यांच्या डोक्यापेक्षा तीवरील टोपीच उत्तरोत्तर मोठी होत गेली असे विश्वनाथ प्रताप सिंग, चेहऱ्यावर सतत मी नाही बुवा त्यातला असा लब्बाड अलिप्तपणा वागवणारे शरद पवार आदी मंडळी आरकेंच्या व्यंगचित्रात पाहणे अव्यंग आनंददायी होते. त्यांच्या चित्रातल्या मेनका गांधींची उंची भातुकली खेळू पाहणाऱ्या मुलींपेक्षा मोठी कधीच झाली नाही. ते वास्तवच आहे. सोनिया गांधी यांच्या बॉबकटचे वळलेले केस आणि चेहऱ्यावरचा गोंधळ अद्यापही कमी झाला आहे, असे म्हणता येणार नाही. आरकेंची थोरवी दिसली ती राजीव गांधी यांच्या अर्कचित्रात. कोणतेही दृश्यवेगळेपण, लकब नसलेले राजिबडे राजीव गांधी व्यंगचित्रात रेखाटणे हे आव्हान होते. ते आरके यांनी इतक्या उत्तमपणे पेलले की सुरुवातीला व्यंगचित्रात न अडकणारे राजीव गांधी हे नंतर नंतर आरकेंनी रेखाटलेल्या व्यंगचित्रातल्या सारखेच दिसू लागले. चेहऱ्यावरची बालिश सात्त्विकता, शेंडय़ाशी सरळ होऊन मग मुडणारे नाक आणि डोक्यावर होते त्यापेक्षा अधिक टक्कल यामुळे आरकेंचे राजीव हे प्रत्यक्षाहुनि प्रतिमा उत्कट असे होऊन गेले. हे सर्व करताना आरकेंचा मोठेपणा असा की त्यांनी कोणत्याही टप्प्यावर राजकारण्यांना वा व्यंगविषयांना कधीही प्राणिरूपात दाखवले नाही की त्यांच्या शारीरिक व्यंगांवर बोट ठेवले नाही. एक सात्त्विक, संयत सभ्यता हे आरकेंच्या व्यंगचित्रांचे वैशिष्टय़ होते. त्यामुळे त्यांच्या एकाही व्यंगचित्राने कधीही वाद वगरे झाला नाही. आपल्याला जग बदलायचे आहे अशा त्वेषाने कधीही त्यांनी व्यंगचित्रे काढली नाहीत. जे काही आपल्याभोवती घडते आहे त्याचे आपण अदृश्य, तटस्थ निरीक्षक आहोत आणि आसपासच्या घटनांतील त्रुटी दाखवणे इतकेच आपले कर्तव्य आहे हे ते जाणून असत.

लक्ष्मणांच्या ब्रशला धरुनच व्यंगचित्रांच्या प्रांतात आलो!

ही प्रसन्न, सुजाण, सुसंस्कृतता ही त्यांच्याकडे उपजत होती. त्यांचे ज्येष्ठ बंधू आर के नारायण यांच्या लेखणीतून ती जाणवते तर लक्ष्मण यांच्या कुंचल्यातून. व्यक्तीच्या नुसत्या दृश्य लकबी रेखाटण्यास फक्त कलाकारी पुरे. परंतु त्या व्यक्तीचा संपूर्ण स्वभाव दोन-चार फटकाऱ्यांतून सादर करायचा तर ते प्रतिभेशिवाय शक्य होत नाही. शिवाय व्रतस्थ प्रतिभासाधन देखील लागते आणि राजकारण, समाजकारण, सामाजिक चालीरीती आदींचा सखोल अभ्यास लागतो. या गुणांचा समुच्चय असलेले लक्ष्मण यांचे वर्णन त्यामुळेच केवळ एक व्यंगचित्रकार या शब्दांत मावणारे नाही.
ते एक भाष्यकार होते. हा भाष्यकार आता आपल्यात नाही. माध्यमांचा अविवेकी, बेफाम एकांगीपणा वाढत असताना, व्यवस्था अधिकाधिक असहिष्णू होत असताना आणि आपल्या मर्यादांची जाणीव हरवून बसलेले शार्ली एब्दोसारखे प्रकार घडत असताना आरके लक्ष्मण यांच्यासारख्यांचे नसणे अधिक व्याकुळ करणारे आहे. त्यांचे ते दैनंदिन चित्रभाष्य पाहिल्यावर सकाळी सकाळी लाखोंच्या मनात उमटणारी ‘कसे बोललात, लक्ष्मण!’ ही प्रतिक्रिया यापुढे कधीच उमटणार नाही. त्यांच्या स्मृतींना ‘लोकसत्ता’चे अभिवादन.