लोकसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळणार असा अंदाज वेगवेगळ्या सर्वेक्षणांमधून व्यक्त झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांच्या निर्वविाद नेतृत्वस्थानासाठी भाजपमध्ये जोरदार मोच्रेबांधणी सुरू झालेली दिसते. म्हणूनच, पक्षाच्या नेतृत्वाच्या फळीतील लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आदी वयोवृद्ध नेत्यांना लोकसभेची दारे बंद करण्याचे मनसुबे पक्षात शिजू लागले. पण आगामी निवडणुकीत मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपचा चेहरा तरुण असावा या दृष्टीने सुरू झालेल्या या आखणीच्या पहिल्याच टप्प्यात खुद्द अडवाणी आणि जोशी यांच्यासारख्या बुजुर्ग नेत्यांनी पाणी फिरविले आहे. अटलबिहारी वाजपेयी यांच्या उत्तुंग नेतृत्वाची सावली लाभलेल्या या पक्षावर आता सुषमा स्वराज, अरुण जेटली, राजनाथ आदी नेत्यांची पकड असली तरी त्यांना राष्ट्रव्यापी पािठबा नाही; तर अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढविण्याचा प्रयोग फारसा यशस्वी झालेला नाही. आता पक्षाला मोदी यांच्या रूपाने तरुणाईच्या पसंतीस उतरलेला चेहरा लाभला आहे. त्यातच, आम आदमी पार्टीचे एक नवे आव्हान पक्षासमोर उभे आहे. त्यामुळे तरुण मतदाराशी जवळीक साधणारे उमेदवार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवून मतदारांसमोर जाण्याचा भाजपचा प्रयत्न राहणार हे साहजिकच आहे. अशा वेळी, नवतरुण मतदारांमध्ये फारसा प्रभाव नसलेल्या नेत्यांना राज्यसभेच्या दरवाजातून संसदेत पाठविण्याचे मनसुबे पक्षात शिजत असल्याची कुणकुण लागताच अडवाणी आणि जोशी यांनी त्याला विरोध करून मोदी व राजनाथ यांचा पुन्हा मुखभंग केला आहे. या नेत्यांना राज्यसभेत पाठविण्याचा प्रस्ताव पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचाच असल्याचे बोलले जाते. पक्षाची मातृसंस्था असलेल्या रा. स्व. संघाचा आशीर्वाद असल्याखेरीज असा विचार पुढे येणे शक्य नाही हे स्पष्ट असल्याने, पक्षशिस्तीच्या एकचालकानुवíतत्व प्रथेप्रमाणे त्यावर शिक्कामोर्तब होणे हा केवळ उपचार असल्याचे मानले जात असताना, अडवाणी यांनी वाजविलेल्या नकारघंटेमुळे केवळ मोदी, राजनाथनाच नव्हे, तर संघालाच आव्हान दिले गेले आहे. मोदी हे पंतप्रधानपदाचे उमेदवार आणि पक्षाच्या निवडणूक प्रक्रियेचे सर्वेसर्वा असल्याने त्यांचा प्रस्ताव हा अलिखित आदेश ठरेल अशा समजुतीत वावरणाऱ्या पक्षधुरीणांना ही एक पक्षांतर्गत चपराकच आहे. विजयाचा फाजील आत्मविश्वास बाळगू नका असा सावधगिरीचा इशारा देत वडीलकीची भूमिका स्वीकारणाऱ्या अडवाणी यांनी पुन्हा एकदा पक्षाला धक्का दिला आहे. कदाचित, तरुणाईच्या मुद्दय़ावर लढविल्या जाणाऱ्या आगामी निवडणुकीत आपल्या वयाचा अडसर ठरेल हे वास्तव स्वीकारणे आणि पचविणे या बुजुर्ग नेत्यांना अवघड होत असावे. तरुणाईचा पुकारा करीत निवडणुकांचे रणिशग फुंकणाऱ्या मोदी यांच्या गुजरातमधील ज्या गांधीनगर मतदारसंघातून अडवाणी लोकसभेत गेले, तेथून आता मोदी यांच्या उमेदवारीसाठी चाचपणी सुरू असल्याचे बोलले जाते. शिवाय, मुरली मनोहर जोशी यांच्या वाराणसी मतदारसंघातही मोदी यांना उतरविण्याचा भाजपचा इरादा असल्याची चर्चा आहे. हे मतदारसंघ मोदी यांच्यासाठी मोकळे करून घेण्याकरिताच या नेत्यांना राज्यसभेत पाठविण्याची टूम निघाली असावी, अशा संशयाचा सूर पक्षात असला, तरी त्याला वाचा फुटण्याची सध्या तरी फारशी शक्यता नाही. अडवाणी व जोशी या नेत्यांनी आता निवडणुकीच्या राजकारणातून बाजूला व्हावे आणि नव्या नेतृत्वाच्या खांद्यावर पक्षाची पालखी द्यावी, ही अपेक्षा अशा धोरणांतून स्पष्टपणे ध्वनित होत असताना, त्याला खो देऊन निवडणुकीच्या राजकारणातील आपल्या भविष्यकाळालाच आव्हान देण्याची धाडसी खेळी अडवाणी आणि जोशी यांनी केली आहे.