रामलीला मैदानावरील गेल्या वर्षीच्या अण्णा हजारे यांच्या आंदोलनानंतर देशभरात प्रचंड मोठी संतापाची लाट उठली. ही लाट इतर कोणत्याही ठिकाणी फुटण्याऐवजी ती सोशल नेटवर्किंग साइट्सवर जास्त प्रमाणात फुटली. याच दरम्यान इजिप्तमध्ये झालेल्या क्रांतीत सोशल नेटवर्किंग साइट्सचा, त्यातही फेसबुकचा फार मोठा हातभार असल्याचे वृत्त आले. त्यामुळे ही लाट अधिकच तीव्र झाली. यात ‘जनआंदोलन’ कसे बरोबर आणि सरकार कसे कुचकामी, हे दाखवण्याची प्रचंड अहमहमिका लागली. यातूनच एका ‘निर्भय’ समाजाचे चित्र पुढे आले. याचे पर्यवसान अलीकडेच शाहीन धाडा फेसबुक प्रकरणात झाले. पालघरमधील या महाविद्यालयीन तरुणीने ‘उत्स्फूर्त बंद’बद्दल फेसबुकवर एक पोस्ट टाकली आणि त्या एका पोस्टवरून गदारोळ उडाला. भरीस भर म्हणून शाहीनला अटक करणाऱ्या पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यापर्यंत हे प्रकरण पोहोचले. त्यानंतर चर्चा सुरू झाली ती अशा प्रकारच्या ‘व्हच्र्युअल जगातील’ अभिव्यक्तिस्वातंत्र्याची आणि त्याला असलेल्या मर्यादांची. शाहीन धाडा प्रकरणानंतर फेसबुक आणि त्यावरील पोस्ट यांच्या बाबतीत प्रत्येक माणूस सजग झाला आहे. त्यानंतर पालघरमधील एका अल्पवयीन मुलाने राज ठाकरे आणि मराठी माणूस यांबाबत केलेल्या कमेंटमुळेही गदारोळ उडाला. संविधानाने देशाच्या प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा हक्कदिला असला, तरी तो निदान फेसबुकवर तरी कशा प्रकारे वापरावा, याचा विचार आता होत आहे. याबाबत शाळा-महाविद्यालय यांतील विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनीही खबरदारी घेण्याची गरज आहे.  
फेसबुक स्टेटस- सुहाग रात है, घूंघट उठा रहा हूँ मैं..
त्याखालील क्षणातच भरपूर सारे ‘लाइक्स्’..
खाली काही जणांचे अपडेट्स- ‘अपडेट्स टाकत राहा, आम्ही अजून जागेच आहोत.’
..गेले काही दिवस हा विनोद एसएमएस किंवा मेसेंजर अ‍ॅप्समधून देशभर फिरतोय. त्यावर मोठा हंशाही पिकतो. पण यातील अतिशयोक्ती ही प्रत्यक्षात आली तरी आश्चर्य वाटण्याचे कारण नाही, अशीच स्थिती सध्या आपल्याकडे आहे. फेसबुक स्टेटसमध्ये आजवर आलेला नाही, असा एकही विषय आता जगभरात शिल्लकनाही. आपण सकाळी उठल्यापासून काय काय करतो, काय खातो, काय पितो, या साऱ्याची सचित्र जंत्रीच अनेकांनी फेसबुकवर शेअर केलेली दिसते.. अगदी सकाळी उठल्यानंतर चूळही फेसबुकचे तोंड पाहूनच भरली जाते, हे अलीकडे झालेल्या एका सर्वेक्षणात समोर आले आहे. हे सारे केवळ धक्कादायक तर आहेच, पण त्याच पलीकडे ते चिंताजनकही आहे. फेसबुक हे केवळ व्यक्त होण्याचे साधन नव्हे तर ते आता एका पिढीचे व्यसन होऊ पाहते आहे.

प्रायव्हसी स्टेटमेंट वाचण्याचे कष्ट घेणार कोण?
 फेसबुकचे होमपेज ही आपली मालमत्ता असली तरी एकाच वेळेस खासगी आणि त्याच वेळेस सार्वजनिकही आहे, हे आपण लक्षात घ्यायला हवे. आज नेमके हेच भान हरवले आहे आणि म्हणून आपल्याला पालघरसारख्या प्रसंगाला सामोरे जावे लागले. हे भान भविष्यात बाळगणे हे सर्वासाठीच सर्वाधिक महत्त्वाचे असणार आहे. फेसबुकवर असणारी पिढी आणि त्यांचे पालक या सर्वानाच याचे भान बाळगावे लागणार. मुळात फेसबुक हे सार्वजनिक माध्यम आहे. त्याचे स्वरूपच कायद्यानेदेखील आणि ढोबळमानानेही ‘सार्वजनिक’ याच प्रकारात मोडते. ते खासगी नाही. खासगी असू शकते ते आपले ‘होमपेज’, पण तेही केवळ आपल्यापुरती आपली डिजिटल मालमत्ता म्हणून. पण त्याच्यावर आपले नाव असले तरी त्याचे स्वरूप हे कायद्याने सार्वजनिकच असते. पण अर्थात हे सारे समजून घेण्यासाठी आपल्याला फेसबुकचे ‘प्रायव्हसी स्टेटमेंट’ वाचावे लागते. पण ते कष्ट कुणीच घेत नाहीत. प्रायव्हसी स्टेटमेंट बारीक शब्दांत असते हे त्याचे कारण नाही तर कायद्याशी संबंधित गोष्टी वाचायला आपल्याला कंटाळा येतो किंव्या त्या समजून घेऊन त्यानुसार वागण्याची आपली तयारी नसते, हे त्याचे खरे कारण आहे. त्यामुळे ते स्टेटमेंट वाचल्यास सार्वजनिक काय आणि खासगी काय, याचा सहज उलगडा होऊ शकतो. ते पुरेसे बोलके आहे. अलीकडच्या या दोन सर्वेक्षणांपैकी एकामध्ये असे लक्षात आले की, फेसबुकवर अकाऊंट उघडताना तब्बल २० हजारांमधील एखादाच प्रायव्हसी स्टेटमेंट वाचण्याचे कष्ट घेतो.
या प्रायव्हसी स्टेटमेंटमध्येच फेसबुक हे कसे सार्वजनिक आहे, त्याचा उल्लेख आहे. त्यामुळे कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी जाऊन एखादी कृती करताना आपण जेवढी काळजी घेतो तेवढीच काळजी आपल्याला फेसबुकवर घ्यावी लागेल. किंबहुना फेसबुक हे अधिक व्यापक व्यासपीठ आहे. त्यामुळे तुमची ‘कमेंट किंवा अपडेट’ हे ‘स्थानिक सार्वजनिक’ नव्हे तर ‘जागतिक’ असते. मध्यंतरी अण्णांच्या आंदोलनाच्या वेळेस भावनिक होऊन अनेकांनी ‘हा फुल्याफुल्यांचा देश आहे..’ अशा कमेंट्स लिहिल्या होत्या. त्या वेळेस एका जाणत्या व्यक्तीने या सर्वाची फेसबुकवरच चंपी करीत त्यांना ‘जागतिक भान’ आणून देण्याचे, खरे तर त्यांना ताळ्यावर आणण्याचे काम केले होते. कारण तुमची कमेंट हा तुमच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा भाग असला तरी ती जागतिक होत असल्याने तुमच्या देशाच्या प्रतिमेवरही त्याचा परिणाम होत असतो.. पण फेसबुकवर कमेंट्स करताना आपण फारच कमी वेळा गंभीर असतो, असा अनुभव आहे. शिवाय महत्त्वाचे म्हणजे राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तिस्वातंत्र्य तोपर्यंतच अबाधित असते, जोवर आपण इतरांच्या स्वातंत्र्यावर गदा आणत नाही, असे खुद्द घटनेमध्येच स्पष्ट करण्यात आले आहे. पण राज्यघटना किंवा त्याची उपलब्ध असलेली पूर्वपीठिका तरी कधी कुणी वाचलेली असते? खरे तर ज्या आदर्श नागरिक असल्याच्या गप्पा आपण फेसबुकवर करतो, त्या करताना प्रत्यक्षात तसे होण्यासाठी या बाबी वाचलेल्या असणे आणि जबाबदारीने वागणेही अपेक्षित आहे.
या लेखाचा हेतू अभिव्यक्तिस्वातंत्र्याला विरोध करणे हा नाही तर त्याचे भान आणून देणे हा आहे. फेसबुकच्या पालघर प्रकरणानंतर अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या बाजूनेही अनेकांनी मते मांडली आहेत. या प्रकरणी पोलिसांनी केलेली कारवाई ही अविचाराची असली तरी आपण करीत असलेले टेक्स्ट मेसेजेस किंवा मेसेंजर अ‍ॅपवर व्यक्त केलेली मते अथवा फेसबुक कमेंट्स या सर्व बाबी यांना आता कायद्यानेच ‘इलेक्ट्रॉनिक दस्तावेजा’चा दर्जा याची किती जणांना माहिती आहे? त्यासाठी तर जगभरातील सर्व देशांनी एकत्रितपणे तसा निर्णय घेतला आणि आपापल्या कायद्यांमध्ये सुधारणा केल्या. त्यानंतर भारतात माहिती तंत्रज्ञान कायद्यात २००९ साली सुधारणा करण्यात आली. जगातील सर्वच राष्ट्रांना हे करावे लागले. कारण सोशल नेटवर्किंग हे जागतिक आहे. त्यामुळे सर्व जगातील माहिती तंत्रज्ञान कायद्यांमध्ये कमी-अधिक फरकाने समानता आहे. कायदे माहिती तंत्रज्ञानासाठी जागतिक झाले, पण हे आपण नाही लक्षात घेतले. केवळ तरुणांनी किंवा फेसबुकवर असलेल्या पिढीनेच नव्हे तर सोशल नेटवर्किंगवर येऊ घातलेल्या पिढीच्या पालकांनीही ही बाब लक्षात घेतली पाहिजे. कारण अजाण मुलांची जबाबदारी कायद्याने पालकांची आहे. त्यासाठी पालकांना कायद्याने जबाबदार धरण्याची तरतूदही आपल्याकडच्या कायद्यांमध्ये आहे. शिवाय सर्वात महत्त्वाचे म्हणजे कायद्याचे सर्वमान्य तत्त्व असे सांगते की, कायद्याचे अज्ञान हा बचाव होऊ शकत नाही. या मुद्दय़ावर तर सर्वोच्च न्यायालयानेही शिक्कामोर्तबच केले आहे.

Slum Improvement Board, contract,
मुंबई : झोपडपट्टी सुधार मंडळातील ‘कंत्राटा’साठी गोळीबार!
Bhavesh Bhandari and his wife Jinal
Video: रथातून मिरवणूक, मौल्यवान वस्तू फेकल्या; जैन भिक्षूक होण्यासाठी २०० कोटी केले दान
Golden Jubilee of Mumbai grahak Panchayat fighting for consumer rights
ग्राहकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या जागल्याचा सुवर्णमहोत्सव…
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?

कायदा म्हणतो..
माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६ अ अन्वये संवादमाध्यमांचा वापर करून अपमानकारक संदेश प्रसृत करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला जाऊ शकतो.

संगणक किंवा संवाद उपकरणांचा वापर करून पाठविलेला संदेश ज्यात
* कोणतीही माहिती जी मोठय़ा प्रमाणावर अपमानास्पद आहे किंवा जी धमकीच्या स्वरूपात अथवा हानीकारक आहे किंवा
* कोणतीही माहिती जी खोटी आहे हे त्या व्यक्तीला ठाऊक आहे, मात्र आफत ओढविण्याच्या उद्देशानेच किंवा अडचण किंवा धोका निर्माण व्हावा, अडथळा निर्माण व्हावा, अपमान व्हावा, गुन्हेगारी प्रवृत्तीला खतपाणी मिळावे, तेढ निर्माण व्हावी या वाईट उद्देशानेच संगणकीय स्रोताचा किंवा संवाद उपकरणांचा वापर करण्यात करण्यात आलेला असेल किंवा
* कोणतेही इलेक्ट्रॉनिक मेल किंवा इलेक्ट्रॉनिक मेल संदेश ज्यामध्ये थेट आफत ओढविणे किंवा अडथळा निर्माण व्हावा हाच उद्देश आहे किंवा त्या माध्यमातून चुकीचा संदेश किंवा चुकीच्या (व्यक्ती किंवा संस्थेस) किंवा ज्याला तो संदेश मिळणार आहे अशा (व्यक्ती किंवा संस्थेस) पाठविणाऱ्यास  या कलमान्वये तीन वर्षांपर्यंत कारावास आणि दंड होऊ शकतो.

*  नोंद – इलेक्ट्रॉनिक संदेश यामध्ये मेल, टेक्स्ट मेसेज, इमेज म्हणजे चित्र किंवा फोटो, व्हिडीओ, ऑडिओ, इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड या साऱ्याचा समावेश होतो.
याशिवाय भारतीय दंड संहितेच्या कलम ५०५(२) चाही वापर केला जाऊ शकतो.
पालघर प्रकरणात प्रथम पोलिसांनी हे कलम लावले आणि नंतर काढून टाकले. यामध्येही समाजात तेढ निर्माण करण्याच्या संदर्भातील बाबींचा समावेश आहे.  हे कलम संगणकीय स्रोतांना थेट लागू होत नाही. मात्र त्याच्या अप्रत्यक्ष परिणामांना ते लागू केले जाऊ शकते. याचा वापर विषयानुरूप होऊ शकतो. मात्र ज्या बाबतीत ते लागू होणार आहे, त्या संदर्भात संबंधित व्यक्तीचा भावना दुखावण्याचा किंवा अपमानास्पद बाब प्रसृत करण्यामागचा हेतू ‘थेट’ असावा, असे कायद्याला तर अपेक्षित आहेच. पण सर्वोच्च न्यायालयानेही वेळोवेळी दिलेल्या निवाडय़ांमध्ये त्याचा तसा स्पष्ट उल्लेख आहे! पालघर प्रकरणात तसा थेट हेतू नव्हता म्हणून ते कलम वगळण्यात आले. या कलमान्वये तीन वर्षांंपर्यंत कारावास किंवा दंड किंवा दोन्हींची शिक्षा होऊ शकते.

फेसबुकसारख्या सोशल नेटवर्किंग साइट्सवर एखाद्या गोष्टीबाबत कमेंट करताना शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी काही गोष्टींचे भान बाळगणे आवश्यक असते. हे आहेत व्हच्र्युअल जगात वावरताना पाळण्याचे ‘डूज’ अ‍ॅण्ड ‘डोण्ट्स’.

हे करा..
० सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही व्यक्तीला ‘फ्रेंड’ बनवताना ती व्यक्ती ओळखीची    आहे की नाही, याची खातरजमा करून घ्या.
० एखाद्या सामाजिक किंवा राजकीय विषयावर आपली मते मांडताना त्या विषयाची पूर्ण माहिती करून घ्या. अर्धवट माहिती नेहमीच मारक ठरते.
० संविधानाने अभिव्यक्तिस्वातंत्र्य दिले असले, तरी व्यक्त होताना दुसऱ्याच्या भावना दुखावणार नाहीत, याचीही खबरदारी घ्या.
० फेसबुकवरील कमेंट म्हणजे एक सार्वजनिक विधान असल्याने कोणतीही कमेंट करताना सामाजिक आणि नैतिक भान बाळगा.
० कोणत्याही भारतीय नागरिकाने कोणताही फोटो शेअर करताना त्यात आपल्या राष्ट्रीय प्रतीकांचा अपमान होणार नाही, याचे भान बाळगणे आवश्यक आहे.
० कोणत्याही लिंक शेअर किंवा उघडण्यापूर्वी ती ‘स्पॅम’ आहे की नाही, याची खातरजमा करून घेणे आवश्यक आहे.
० फेसबुक या साइटला आयटी कायदा लागू होत असल्याने त्या कायद्याचे उल्लंघन होईल, अशी कोणतीही गोष्ट करणे टाळा.
० तुमचे अकाऊंट हॅक झाल्याचा संशय असल्यास ते डिलीट करा किंवा त्याबाबत रीतसर सायबर क्राइम सेलमध्ये तक्रार नोंदवा.

हे करू नका..
० कोणाच्याही भावना दुखावल्या जातील अशी विधाने करू नका.
० आपल्या मित्राने केलेल्या एखाद्या विधानाला ‘लाइक’ करणे, म्हणजे त्या विधानाला सहमती देणे. त्यामुळे पूर्ण विचार केल्याशिवाय एखाद्या विधानाला सहमती देऊ नका.
० अश्लील फोटो किंवा मजकूर असलेली पेजेस किंवा लिंक्स उघडू नका.
० नकली अकाऊंट उघडून त्याद्वारे कोणतीही कमेंट किंवा फोटो शेअर करू नका. अकाऊंटवर नाव तुमचे नसले, तरी पोलिसांना तुमच्यापर्यंत पोहोचणे सहजशक्य आहे.
० एखाद्या वादग्रस्त फोटोमध्ये विनाकारण कोणालाही टॅग करू नका.
० अनोळखी व्यक्तींच्या रिक्वेस्ट स्वीकारू नका. ती कदाचित नकली अकाउंट्स असू शकतात.
० स्वतचे फोटो शेअर करतानाही ते सर्वाना पाहता येतील, असा पर्याय निवडू नका. ते फक्त आपल्या मित्र-मैत्रिणींपुरतेच मर्यादित ठेवा.
० फेसबुक किंवा यासारख्या साइट्सवर आपला दूरध्वनी किंवा भ्रमणध्वनी क्रमांक टाकू नका.

अल्पवयीन मुलांनी फेसबुकवर कोणतीही कमेंट किंवा लाइक करताना काळजी घेणे आवश्यक आहेच. पण त्याचबरोबर त्यांच्या पालकांनाही याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. कारण त्यांच्या पाल्याने कोणतेही वादग्रस्त विधान फेसबुकसारख्या साइटवर केले, तर त्या मुलाची आणि पर्यायाने त्याच्या कृत्याची जबाबदारी ही पालकांवरही आहे.

पालकांनो, हे करा-
० तुम्हाला आवडो अगर न आवडो, फेसबुकवर अकाऊंट उघडा आणि सर्वप्रथम आपल्या पाल्याला ‘फ्रेंड’ बनवा.
० फेसबुकवर ‘फ्रेंड’ असलेला आपला मुलगा किंवा मुलगी प्रत्यक्ष आयुष्यातही तुमच्याबरोबर तेच नाते शेअर करेल, याची काळजी घ्या.
० मुलगा फेसबुकवर कोणाला मित्र बनवतोय, काय कमेंट करतोय, याकडे लक्ष ठेवा.
० फेसबुकवर तुमच्या पाल्याने केलेली एखादी गोष्ट तुम्हाला आक्षेपार्ह वाटली, तर तिथेच कमेंट न करता त्याच्याशी खासगीत बोलून तुमची मते मांडा.
० मुलाच्या मित्रांनाही फेसबुकवर तुमचे मित्र बनवून घ्या. त्यामुळे त्याचे मित्र कसे आहेत, याचा अंदाज तुम्हाला येऊ शकेल.
० आयटी कायदा समजून घेऊन आपल्या मुलालाही त्याची जाणीव करून द्या.

पालकांनो, हे करू नका..
० फेसबुकवर अकाऊंट उघडल्यावर पाल्यावर नजर ठेवण्याऐवजी स्वत:च कोणतीही वादग्रस्त विधाने करू नका.
० आपला मुलगा किंवा मुलगी शाळेत शिकत असेल, तर शक्यतो त्याच्यासमोर सामाजिक किंवा राजकीय विषयांवर चर्चा करताना जहाल मते व्यक्त करू नका. अशा मतांचा त्याच्यावर परिणाम होऊ शकतो.
० स्वत:च्या मुलाच्या फेसबुक अकाऊंटवर लक्ष ठेवताना तुम्ही अवास्तव नाक खुपसत आहात, असे मुलाला वाटू देऊ नका. त्यामुळे तो तुमच्यापासून दूर जाण्याची शक्यता आहे.
० मुलाला मित्र बनवताना पालक आणि पाल्य या नात्यातील आदर कमी होऊ देऊ नका.
० आपल्या मुलाबद्दल किंवा मुलीबद्दल त्यांच्या मित्रमैत्रिणींकडे अवास्तव चौकशी करू नका. शालेय किंवा महाविद्यालयीन वयात पालकांपेक्षा मित्र जवळचे असतात, असा अनुभव असल्याने तुम्ही काय विचारत होतात, हे तुमच्या मुलापर्यंत लगेचच पोहोचण्याची शक्यता असते.
० मुलगा चुकत असेल, तर त्याला दमदाटी करू नका. गोष्टीचे गांभीर्य पटवून देऊन त्याच्या कलाने घेऊन त्याला समजवा.

* मुक्तपणे आपली मतं, चर्चा, माहिती, छायाचित्रे, व्हिडीओ आणि ध्वनिफिती आपल्याला हव्या त्या व्यक्तींसोबत किंवा जगासोबत शेअर करण्यासाठी इंटरनेटवरील ज्या संकेतस्थळांचा वापर होतो त्यांना ‘सोशल मीडिया’ असे संबोधतात. व्यक्तिगत किंवा सार्वजनिक पातळीवर संवाद साधण्यासाठी ही संकेतस्थळं मोठय़ा प्रमाणात तयार करण्यात येत आहेत. फेसबुक, िलक्डइन, मायस्पेस, ट्विटर, यूटय़ूब, फ्लिकर, वर्ड प्रेस, ब्लॉगर, टाइपपॅड, लाइव्ह जर्नल, विकिपीडिया, वेटपेन्ट, विकिडॉट, सेकंड लाइफ ही काही सर्वश्रुत सोशल मीडिया संकेतस्थळं आहेत.

* भारतातील फेसबुक वापरावरील आकडय़ावर नजर टाकल्यास याचा वाढता प्रभाव थक्क करणारा आहे. फेसबुक वापरणाऱ्या देशांमध्ये भारताचा तिसरा क्रमांक लागत असून फेसबुक वापरणाऱ्यांची संख्या ६०६२०६२० इतकी आहे. भारतातील इंटरनेट वापरणाऱ्या एकूण लोकसंख्येपकी ७४.८४% लोकसंख्या फेसबुकचा वापर करते. तर १८-२४ वर्षे वयोगटातील फेसबुक वापरणाऱ्यांची संख्या सर्वाधिक म्हणजेच २९०९७८९८ आहे. भारतात एकूण फेसबुक वापरणाऱ्यांपकी ७४% पुरुष आणि २६% महिला आहेत.  

तुम्ही ‘जबाबदार इंटरनेट नागरिक’ कसे बनू शकता यासाठी संस्थेतर्फे  शाळा-कॉलेजमध्ये कार्यशाळा घेऊन त्यांना याबाबतचे मार्गदर्शन केले जाते. इंटरनेटबद्दल असूया न बाळगता त्याचा जबाबदारीने कसा वापर करता येईल याचा त्याच्या वयाच्या पातळीवर जाऊन उदाहरणाद्वारे मार्गदर्शन केले जाते. या कार्यशाळांमध्ये सांगितल्या जाणाऱ्या काही गोष्टी   ..

विचार करा – क्लिक करा आणि हसा
*  तुम्हाला आलेल्या फ्रेंड रिक्वेस्टची शहनिशा करा आणि मगच त्या व्यक्तीला
     तुमच्या मित्र-मत्रिणींच्या यादीमध्ये सामील करा.
*  इतरांचा स्वभाव आणि विचारांना नाहक बळी न पडता तुम्ही जसे
     आहात त्याबद्दल अभिमान बाळगा.

नियम आणि अटी विचारपूर्वक वाचा
* तुमचा पासवर्ड  सुरक्षित ठेवा. तो थोडा कठीण असल्यास उत्तम.
*  तुम्हाला सतत पाहिले जात असून पाठलाग केला जात आहे, याची जाणीव असू द्या.
*  तुम्ही सोशल नेटवर्किंग साइटवर टाकत असलेल्या माहितीबद्दल सतत
     जागरूक असायवा हवं.
*  तुमच्या परवानगीशिवाय कुणालाही तुमचे छायाचित्र पाहता नाही
    आले पाहिजे याची खबरदारी घ्या.
*  तुमच्या कॉम्प्युटरमध्ये अ‍ॅण्टी-व्हायरस टाकून घ्या आणि
    तुमचे अकाऊंट इतरांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी योग्य फिल्टर्सचा वापर करा.

* राज्य माहिती तंत्रज्ञान (आय.टी.) कायद्यानुसार खालील गोष्टी गुन्हा ठरू शकतात.
*  कलम ६६ (अ) अंतर्गत कुणाही व्यक्ती अथवा संस्थेच्या परवानगीशिवाय तुम्ही
     एखादी माहिती, फोटो किंवा संदेश वापरला अथवा सोशल नेटवर्किंग साइटवर टाकला.
*  तुम्ही एखाद्या व्यक्ती अथवा देशाचा अपमान केलात.
* तुम्ही एखाद्या व्यक्तीबद्दल अपशब्द वापरलात.
*  कुठल्याही सायबर घटनेचा शंभर टक्के शोध घेता येतो, ही अतिशय महत्त्वाची बाब सतत लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
अधिक माहितीसाठी www.responsiblenetism.org/ या संकेस्थळाला किंवा responsiblenetizm@gmail.com या ई-मेलवर अथवा ९८२०४४७८८७ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.
संकलन – रोहन टिल्लू आणि प्रशांत ननावरे