जेथे मन असते तेथे मनुष्य असतो! माझं मन परमार्थ करतानाही प्रपंचातच गुरफटलेलं असेल तर माझा वास प्रपंचातच असणार. तेच प्रपंच करतानाही मन जर भगवंताच्या चिंतनात असेल तर माझा वास त्याच्या चरणीच असणार! ते कधी शक्य होईल? मनातून प्रपंच आधी आटोक्यात आला तर. माझा प्रपंच मला नीट करता आला तर माझा परमार्थ ढिला पडणार नाही. आता प्रश्न असा की प्रपंच थोडक्यात पण पूर्ण करणं कसं साधावं? या थोडक्यात प्रपंच करण्याची जी कला आहे, तीच आपण श्रीमहाराजांच्या बोधातून तपशिलात जाणून घेणार आहोत. त्यासाठी प्रथम श्रीमहाराजांची तीन वचने पाहू. ही वचने अशी : ज्या गोष्टीची आस लागते तिचा ध्यास लागतो. जसा अळीला भुंग्याचा ध्यास लागतो. ध्यास म्हणजे स्वतचा विसर. तो भगवंताच्या स्मरणातच झाला पाहिजे. (बोधवचने, क्र. २२३) व्यवहारात व्यसन म्हणून काही करू नये. जेथे ज्याची जितकी जरूर तितकेच केले पाहिजे. भगवंताचे व्यसन बिघडवीत नाही. बाकी कोणतेही व्यसन घात करते. व्यसन नेहमी वाढत्या प्रमाणावर असते. आजच्यापेक्षा उद्याचे प्रमाण अधिक हवेसे असते. ते घात करते. (बोधवचने, क्र. १२४) कर्तव्यात राहणे साधण्याकरता भगवंताचे स्मरण हवे व त्याकरता नाम हवे. मग प्रपंच व परमार्थ एकच होईल. (बोधवचने, क्र. ७९) ही तिन्ही बोधवचने त्यांचा क्रमांक पाहिला तर लक्षात येईल की एकापाठोपाठ एक अशी क्रमाने आलेली नाहीत. पण येथे ती साखळीप्रमाणे एकमेकांत गुंफली आहेत. कारण आपल्या या दुसऱ्या टप्प्याचे समग्र चिंतन या तीन वाक्यांतच सामावले आहे! ही वाक्ये दिसतात तशी नाहीत, त्यातून जो अर्थ पटकन जाणवतो तोच फक्त त्यांचा अर्थ नाही. मनाच्या ज्या ओढीमुळे माणूस स्थूल, दृश्य प्रपंचात गुंततो आणि वासना-विकार, ऊर्मी आणि अतृप्त इच्छांमुळे त्यातच गटांगळ्या खात, आघात सहन करीत सुखाच्या शोधात भिरभिरत राहातो त्या घातचक्रातून त्याला बाहेर कसे पडता येईल आणि मग त्याचं समग्र जगणंच परमार्थ कसा होईल, हे सारं काही या तीन वचनांतून अगदी स्पष्टपणे सांगितलं आहे. या प्रत्येक वाक्याचे दोन ठळक भाग आहेत. एक भाग धोका सांगणारा आहे तर दुसरा भाग त्या धोक्यातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखविणारा आहे. पहिल्या वाक्यात माणसाला प्रपंचाचा ध्यास लागून तो स्वतलादेखील विसरतो, हा धोका सांगितला आहे. त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग भगवंताचं स्मरण हाच सांगितला आहे. दुसऱ्या वाक्यात प्रपंच म्हणजे निव्वळ व्यवहार आहे. त्या व्यवहाराचं, प्रपंचाचंच व्यसन जडलं तर घात मोठा आहे, हा धोका सांगितला आहे. त्यावर उपाय केवळ भगवंताचंच व्यसन लागू द्या, हा सांगितला आहे. तिसऱ्या वाक्यात प्रपंच नेटका करण्यासाठीचा मुख्य आधार सांगितला आहे. तो आहे भगवंताचं स्मरण. आपल्याला वाटेल, व्यवहार न करता, प्रपंच न करता भगवंताचंच स्मरण करीत राहिलं तर काय उपयोग? ही निष्क्रियता नव्हे का? या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठीही या तीन वचनांच्याच अर्थसागरात आता खोल उडी घेऊ!