मासाताका ताकेसुरू हा तरुण १९१८ साली स्कॉटलंडहून जपानला परतला तो डोळ्यात एका उत्पादनाचं स्वप्न घेऊन. पाच र्वष लागली त्याला या स्वप्नाच्या परिपूर्तीसाठी.. आणि आता ९० वर्षांनी ते उत्पादन जगात सर्वश्रेष्ठ म्हणून निवडल्या गेलं. खऱ्या अर्थानं मासाताका यांच्या कष्टाचं चीज झालं.

जपान म्हटलं की काय काय गोष्टी डोळ्यांपुढे येतात? हिरोशिमा. नागासाकी. जपानी लोकांची अमर्याद कष्टाची तयारी. गोलगप्प सुमो पहेलवान. आणि सुझुकी, कावासाकी, मित्सुबिशी, सोनी, पॅनासोनिक, टोयोटा, लेक्सस, निकॉन, कॅनन, रिको, ऑलिंपस, तोशिबा, शार्प, माझदा, नोमुरा वगरे वगरे वगरे.
आता त्यात आणखी एका नावाची भर पडेल. ते म्हणजे यामाझाकी. हे नाव वरच्या सगळ्या नावांपेक्षा वेगळं आहे. हा कॅमेरा नाही. मोटार नाही. दूरचित्रवाणी संच नाही की काही स्वयंचलित उपकरण नाही की आर्थिक कंपनी नाही.

यामाझाकी नाव आहे एका व्हिस्कीचं. साधीसुधी व्हिस्की नाही तर यंदाच्या वर्षांत जगात सर्वोत्तम ठरलेली व्हिस्की. घराणेदाज, कुलीन, शालीन अशी सिंगल माल्ट व्हिस्की. आपल्याकडे याबाबत अगदी साग्रसंगीत sam02अज्ञान आहे. आपल्याकडच्या रासायनिक पिवळसर पेयालाही स्कॉच म्हणतो आपण. आता स्कॉच म्हणजे जी फक्त स्कॉटलंडमध्ये बनते तीच. खानदानी पठणी जशी फक्त पठणमध्येच बनलेली हवी, तसं आहे हे. पण आपण कोणत्याही व्हिस्कीला सहजपणे स्कॉच म्हणतो. केवढा अपमान. असो. तर या स्कॉचपेक्षा आपली सिंगल माल्ट वेगळ्या घराण्याची असते. खरंतर जी एकाच घराण्याची, एकाच डिस्टिलरीत माल्टेड बार्लीपासून बनलेली, अन्य कोणत्याही स्वादाच्या व्हिस्कीची भर न पडलेली आणि जी किमान ओक लाकडाच्या बुंध्यापासून बनलेल्या पिंपात किमान तीन वर्षे साठवली गेलीये (त्यातही एक मेख आहे. ती म्हणजे या िपपांची क्षमता ७०० लिटरपेक्षा अधिक असता नये.) तिलाच सिंगल माल्ट व्हिस्की म्हणवून घेण्याचा अधिकार आहे. स्कॉचपेक्षा ती जरा वरच्या पायरीवर असते. म्हणजे ती पिणारे तसं मानतात. खरंतर स्कॉचदेखील बठकीचंच गायन. पण ख्याल गायकी. सिंगल माल्ट म्हणजे धृपद धमार. सर्वानाच ते गाणं आवडेल असं नाही. तसंच सिंगल माल्टचंही. या सर्व प्रांतात अगदी अलीकडेपर्यंत ती इंग्लंडची मक्तेदारी होती. ग्लेन कुलातील सर्व भगिनी (म्हणजे ग्लेन फिडिच, ग्लेन लिवेट, ग्लेन मोरांजी), सिंगलटन, स्पेसाइड या आणि अशा अनेक मातबर व्हिस्कीज या सगळ्या साहेबाच्याच अंगणातल्या.
त्यामुळे अभियांत्रिकी, पोलादी उत्पादनांत रस घेणाऱ्या जपाननं व्हिस्कीनिमिर्तीत घेतलेली उडी खरोखरच कौतुकास्पद. पोलाद ते पेय हा जपानचा प्रवास त्यासाठीच अभिनंदनीय ठरतो. अर्थात हे एवढं अंतर जपाननं काही एका दिवसात कापलेलं नाही. जपानचा हा व्हिस्की ध्यास सुरू झाला साधारण नव्वदेक वर्षांपूर्वी. मासाताका ताकेसुरू हा बरीच र्वष स्कॉटलंडला होता. तो १९१८ साली जपानला परतला तो येताना डोळ्यांत जपानी व्हिस्कीची स्वप्नं घेऊनच. पाच र्वष लागली त्याला या स्वप्नांच्या परिपूर्तीसाठी. जपानची जुनी राजधानी क्योटोजवळच्या यामाझाकी इथं त्यानं आपली पहिली व्हिस्कीची ब्रुअरी काढली. तिथंच का? तर त्यामागेही काही कारणं आहेत. त्यातलं सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाणी. तिथं काही त्याला नदी वगरे मिळाली नाही. पण तिथल्या नजीकच्या डोंगरातल्या विहिरींना जे काही पाणी होतं त्याची चवच वेगळी होती. म्हणजे त्यात काही खनिजं वगरे होती. आपण नाही का म्हणत, अमुक गावचं पाणी जड आहे वगरे. तसं या यामाझाकीचं पाणी जड होतं. मद्यगुणांच्या विस्तारासाठी पाणी हा घटक अत्यंत महत्त्वाचा. नंतर भले त्या पाण्यात तुम्ही ढीगभर काही घालाल. पण पाण्यातच मुळात काही पाणी नसलं तर काय करणार? इथं हे सांगायलाच हवं की स्कॉटलंडमध्ये बनलेल्या व्हिस्कीची किंमत ठरवण्यात महत्त्वाचा वाटा असतो तो या पाण्याचा. या पाण्याची चिकित्सा किती केली जाते? तर या पाण्याला उगवतीचं ऊन मिळतंय की मावळतीचं, ज्या बार्लीला मुरवून व्हिस्की बनवली जाणार आहे त्या बार्लीला नदीच्या वरच्या अंगाचं पाणी जातं की खालच्या अंगाचं. अगदी हे मुद्देसुद्धा विचारात घेतले जातात. म्हणजे व्हिस्कीच्या मोहक सोनपिवळ्या रंगाच्या मुळाशी त्या आकाशातल्या.. रविकर का तो गोजिरवाणाच्या तेजाचा अंश असावा लागतो, ही बाब खूप महत्त्वाची. याबाबत एक दाखला द्यायलाच हवा. तो म्हणजे स्कॉटलंडमधल्या स्पे नावाच्या नदीचा. तिचं पाणी बरंच पुण्यवान. या नदीनं अनेक व्हिस्कीजना जन्म देऊन अनेकांना मुक्तीचा आनंद दिला. स्पे रॉयल, ग्रँट, ग्लेन घराण्याच्या अनेक व्हिस्कीज, झालंच तर क्रॅगमोर, मॅकलन अशा एक नाही, दोन नाही तर तब्बल ८० मद्यशाला या एकाच नदीच्या पाण्यानं पावन झाल्यात. तेव्हा मुद्दा हा की हे पाणी महत्त्वाचं. तर यामाझाकीच्या परिसरात हे पाणी सापडल्यामुळे जपानमध्ये व्हिस्की बनणं सुरू झालं.

पण पाणी हा एक घटक झाला. व्हिस्की बनल्यानंतर ती साठवणं हे तितकंच महत्त्वाचं असतं. तिचं रूप आणि अर्थातच चव किती झळाळणार ते अवलंबून असतं व्हिस्कीच्या साठवणीवर. स्कॉटलंडमध्ये अनेक वायनरीज त्यासाठी फ्रान्सच्या बोर्दोक्समधून वाइन साठवण्यासाठी वापरलेले जुने जुने बुधले विकत आणतात. हे खरेदी करणं हे वाटतं तितकं सोपं नाही. त्यांचा लिलाव होतो. दरवर्षी. बुधला जितका जास्त जुना तितकी त्याची किंमत अधिक. हे असे बुधले आणायचे, जमिनीखाली तळघरात एकसमान तापमानात ते आडवे ठेवायची व्यवस्था करायची आणि मग त्यात व्हिस्की साठवायची असं हे सगळं साग्रसंगीत करावं लागतं. जपानमध्येही ते तसंच करायचं होतं. पण ओकच्या लाकडापासून बनलेले बुधले काही मासाताका याला मिळाले नाहीत. मग त्यानं ते कुठे बनू शकतात ती जागा हुडकली. उत्तर स्पेनमध्ये ते बनतात, असं आढळल्यावर मासाताका यांनी ते आणायची व्यवस्था केली. आता दरवर्षी हे बुधले खास युरोपातल्या स्पेनमधून आशियातल्या जपानमध्ये आणले जातात. आता हे सगळं सहज सोपं वाटेल. पण या उद्योगाची सुरुवात मासाताका यांनी १९२३ मध्ये केली होती, हे ऐकल्यावर त्याचा नक्कीच अचंबा वाटेल आणि त्यांच्या दूरदृष्टीविषयी कौतुकही मनात (की ग्लासात) दाटून येईल.

दूरदृष्टी अशासाठी की त्यांनी व्हिस्कीनिर्मिती सुरू केल्यानंतर साधारण ५० वर्षांनी जपानच्या उच्चभ्रूंमध्ये व्हिस्की पिणं चांगलंच रुजलं. त्या सोनेरी द्रवाला साध्या पाण्याच्या साहाय्यानं चवीचवीनं, घुटके घेत घेणं हा जपानमधल्या मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीयांचा छंद बनला.

आणि आता त्यानंतर ९० वर्षांनी मासाताका यांच्या कष्टाचं चीज झालं. कोणतंही क्षेत्रं असो कष्टाला यश येतंच. व्हिस्की असली म्हणून काय झालं. आज जगातली सर्वोत्तम व्हिस्की म्हणून यामाझाकी व्हिस्कीची निवड झाली. अगदी स्कॉटलंडमधल्या व्हिस्कींच्या नाकावर टिच्चून. हे दु:ख सहन करायला स्कॉटिशांना पुन्हा त्या व्हिस्कीनेच आधार दिला असणार. असो.

‘करांतुनी तव खिदळत आले, स्तनाकार प्याले..’ अशी थरारून टाकणारी ओळ बाकीबाब बा. भ. बोरकर यांनी ज्या कवितेत लिहिली, त्या कवितेचं नाव आहे : जपानी रमलाची रात्र.
ही कविता त्यांनी जेव्हा लिहिली तेव्हा जपानी व्हिस्कीचा वेलु गगनावरी (की गगनाकडे?) निघालेला नव्हता. तसा तो असता तर बाकीबाबनी आपल्या कवितेचं शीर्षक नक्कीच ‘जपानी अमलाची रात्र’ असं केलं असतं.
या रात्रीचा परिचय आताच करून द्यायचं कारण म्हणजे चार दिवसांवर येऊन ठेपलेला वर्षांन्त. त्यासाठी कोणाला हवं असलं तर मार्गदर्शन व्हावं, इतकाच यामागचा हेतू.

(सहज जाता जाता. जपान्यांच्या तुलनेत भारतीयांनी स्वत:ला कमी मानायचं काहीच कारण नाही. या भरतभूत तयार झालेल्या, शुद्ध आपल्या अशा एका व्हिस्कीनं जपानच्याही आधी आपलं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर कोरून भारताची मान उंचावली आहे. तिच्याविषयी परत कधीतरी. एकाच बैठकीत ही अशी दोन मिश्रणं करायची नसतात म्हणून.)
(समाप्त)