ख्यातिपाठोपाठ दोन सेवकही हातात बश्या आणि शीतपेयाचे पेले ठेवलेले ट्रे घेऊन आले..

ख्याति – हृदोयची रेसिपि आहे.. व्हेज पोहे..

प्रज्ञा – वा..

कर्मेद्र – अरे पण पोहे व्हेजच असतात ना?

सर्वच हसतात. मग खाण्यात गुंग होतात. सर्व तऱ्हेचे पदार्थ पोटात जावेत, अशी ही पाककृती. पोह्य़ांसारखेच पोहे करायचे, पण थोडे तिखट. मग त्यात मोड आलेली कडधान्य, किसलेला कोबी, किसलेलं गाजर,  किसलेलं बीट, चिरलेला बारीक टोमॅटो आणि खारे किंवा तळलेले शेंगदाणे टाकायचे. हृदयेंद्र फार प्रेमानं हे पोहे बनवायचा.

हृदयेंद्र – ही खरी पाककृती माईंची म्हणजे अचलदादांच्या पत्नीची बरं का! त्यांच्या घरी मी बरेच वेगवेगळे पदार्थ खाल्लेत.. (मग काहीसं आठवून मनाशीच हसतो.)

कर्मेद्र – हसायला काय झालं? ख्यातिच्या मेहनतीला हसू नकोस रे..

हृदयेंद्र – (हसत) नाही.. दुसऱ्याच गोष्टीनं हसू आलं.. एकदा असेच पोहे खात होतो. समोर गुरुजी बसले होते. त्यांनी एकदम विचारलं, ‘‘मन लगाके खा रहे हो?’’ मी म्हणालो, ‘‘हो!’’ तर हसून म्हणाले, ‘‘बेमन खाओ!’’ म्हणजे खाण्यात मन नको, भगवंताच्या चिंतनात मन हवं..

कर्मेद्र – मग दगड आणि मातीच खा की!

हृदयेंद्र – (काहीशा रागानं) भलता अर्थ घेऊ नकोस.. आपली भौतिकातली प्रत्येक कृती ही भगवंताच्या चिंतनात झाली तरच कित्येक गोष्टींची प्रतिक्रियात्मक अडगळ मनातून दूर होईल.. पण आपलं काय होतं? भौतिकातल्या लहानसहान गोष्टींतही आनंद शोधायची आपली धडपड असते.. जणू आनंद असा स्वस्तात सापडतोय! श्रीरामकृष्ण म्हणतात त्याप्रमाणे केवळ सद्गुरुंच्याच आधारानं खरा परमानंद लाभू शकतो..

कर्मेद्र – हृदू मला नेहमी असं वाटतं की तू नको इतक्या उंचीवर भिरभिरतोस त्यामुळे या जगातल्या सामान्य माणसांच्या आनंदाच्या कल्पनाच तुला कळत नाहीत.. आनन्दो ज्या प्रेमानं मला मिठी मारतो त्यात आनंद का असू नये? तुला सांगून काय उपयोग म्हणा! बापाचा आनंद तुला काय कळणार?

हृदूला चिडवण्याच्या नादात आपण हे बोललो, पण हे वाक्य तलवारीसारखं ज्ञानेंद्र आणि प्रज्ञाचं काळीज चिरून गेलं असणार, या जाणिवेनं कर्मेद्र एकदम वरमला.. त्या दोघांकडे पाहण्याचं त्याला धाडसच होईना.. खोलीत क्षणमात्र शांतता पसरली.. तोच गायत्रीचा पाठलाग चुकवत आनन्दो खोलीत धावत आला आणि प्रज्ञाला जाऊन बिलगला.. गायत्री त्याला ओढण्याचा प्रयत्न करू लागली तसतसा तो आणखीनच घट्ट बिलगत हसत होता.. त्याच्या कुरळ्या केसातून प्रज्ञा नकळत हात फिरवत होती..

हृदयेंद्र – पण भौतिकातला जो काही आनंद तुला वाटतो तो किती सापेक्ष असतो! बर्फी मिळाली की आनंद, पण मधुमेहाचं दु:खं.. प्रथम मूल नाही, म्हणून दु:ख, तो झाल्यावर तो ऐकत नाही म्हणून दु:ख, मग तो मोठा झाल्यावर सून आणि तो दोघं ऐकत नाहीत, याचं दु:ख.. भौतिक जगातल्या सुख-दु:खाला कायम द्वैताची आणि द्वंद्वाची जोड आहे.. खरा आनंद केवळ आणि केवळ सद्गुरूप्रदत्तच असतो.. तो याच जीवनात आहे त्याच परिस्थितीत गवसू शकतो.. मूल पैदा करण्यात असं काय वेगळं मानावं माणसानं.. खरी गर्भावस्था फार वेगळी असते.. केवळ साधकच ती अनुभवतो.. त्या गर्भावस्थेनं त्याचं जीवन धन्य होतं!

कर्मेद्र – हे राम! आता पुन्हा तू आध्यात्मिक अंतराळात भरकटतो तरी आहेस किंवा भोंदू बुवाबाजीच्या किश्श्यांची आठवण करून देतो आहेस..

हृदयेंद्र – (गंभीरपणे) नाही.. मी फक्त तुकाराम महाराजांचा दाखला देतो आहे.. आजवर अनेकदा ऐकलेला अभंग कान नीट देऊन ऐक..

आनंदाचे डोही आनंद तरंग।

आनंदची अंग आनंदासी।।

काय सांगू झाले कांहिचिया बाही।

पुढे चाली नाही आवडीने।।

गर्भाचे आवडी मातेसी डोहळा।

जेथीचा जिव्हाळा तेथे बिंबे।।

तुका म्हणे तैसा ओतलासे ठसा।

अनुभव सरिसा मुखा आला।।

आपली चर्चा आता याच अभंगावर आहे!!

चैतन्य प्रेम