रेश्मा भुजबळ

२०१३ सालच्या जूनमध्ये उत्तराखंड राज्यात झालेल्या जलप्रलयाची भयावहता दाखवून देत त्या प्रलयामागची कारणे आणि परिणामांची प्रत्यक्षदर्शी पत्रकाराने केलेली मीमांसा मांडणारे हे पुस्तक एका अनुत्तरित प्रश्नापाशी आणून सोडते..

Loksatta kutuhal Artificial intelligence that avoids potholes
कुतूहल: खड्डे चुकवणारी कृत्रिम बुद्धिमत्ता!
Navneet Rana nominated for Amravati Lok Sabha Constituency
नवनीत राणा हिंदुत्वाच्या राजकारणावर स्वार
viva
सफरनामा: होली खेले मसाने में..
Cooking Competition in Mumbai on the occasion of Loksatta Purnabraham publication Mumbai
‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’ प्रकाशनानिमित्त आज मुंबईत पाककला स्पर्धा

अनेक प्राचीन संस्कृती या नद्यांच्या खोऱ्यात आणि नद्यांच्या नावाने विकसित झाल्या आहेत. नद्यांनी लोकांचे जीवन समृद्ध केले. अनेक मोठमोठी शहरे ही नद्यांच्या काठी वसलेली दिसतात. प्राचीन समाजरचनांमध्ये नद्यांना मोठे महत्त्व होते. भारतीय संस्कृतीत नद्यांना पवित्र मानून त्यांची पूजा केली जात असे. तशी ती आजही अनेक ठिकाणी होतच असते. मात्र जसजसा काळ बदलत गेला तसतसा माणूस अधिक स्वार्थी झाला. त्याने निसर्गनियमांची पायमल्ली करत त्याच्या मुळावरच घाला घातला. मग तो नद्यांच्या बाबतीत तरी मागे कसा राहील? नद्यांवरची धरणे, पात्रांवर झालेली अतिक्रमणे, प्रदूषण आणि इतर अनेक गोष्टींनी नदीप्रवाहास हानी पोहोचवली. या हानीमुळे निसर्गाचाही उद्रेक होतो आणि मग त्या उद्रेकाचे परिणाम मोठय़ा प्रमाणात भोगावे लागतात. त्या उद्रेकात कित्येक संस्कृतींचा ऱ्हास झाल्याचा इतिहास आहे. असाच काहीसा उद्रेक २०१३ सालच्या जूनमध्ये उत्तराखंड, हिमालय पर्वतीय प्रदेशातील लोकांना अनुभवायला मिळाला. त्या उद्रेकाची भयावहता, त्यामागच्या कारणे आणि परिणामांची मीमांसा पत्रकार हृदयेश जोशी यांच्या ‘रेज ऑफ द रिव्हर’ या पुस्तकात वाचायला मिळते.

१६ जून २०१३ रोजी उत्तराखंडच्या चारधाम परिसरातील नद्यांनी अक्राळविक्राळ रूप धारण केले होते. केदारनाथ, बद्रिनाथ परिसरात मंदाकिनी, अलकनंदा नद्यांचे पाणी प्रचंड मोठे दगड, शिळा घेऊन वाट फुटेल तेथे वाहू लागले. केदारनाथ मंदिराभोवती तर मृत्यूचे थैमान सुरू झाले. ते आड येणाऱ्या अडथळ्यांना निसर्गाची ताकद दाखवू लागले. नदीचे पात्र मोठय़ा प्रमामात विस्तारले गेले. शेकडो दुकाने क्षणार्धात दिसेनाशी झाली. मोठमोठय़ा इमारती, हॉटेल्स बघता बघता नदीने गिळंकृत केल्या. अनेक गावे पाण्याखाली गेली. शेकडो स्थानिक आणि यात्रेकरूही बेपत्ता झाले. जे बचावले ते अडकून पडले.

उत्तराखंड परिसरातील या पूरस्थितीचे एका वृत्तवाहिनीसाठी वार्ताकन करण्यासाठी लेखकाने १७ जूनपासून दिल्लीहून प्रवास सुरू केला. केदारनाथ आणि परिसरात प्रलय स्थितीत पोहोचणारे ते पहिले पत्रकार होते. त्या प्रवासात आलेले अडथळे, त्यातून मार्गक्रमण करत गुप्तकाशी आणि पुढे केदारनाथपर्यंत केलेला प्रवास, बचावकार्य, बचावकार्यामुळे सुटका झालेले लोक, त्यांचे अनुभव लेखकाने सुरुवातीला मांडले आहेत. खचलेले, वाहून गेलेले, कापलेले रस्ते, पूल, अडकलेली वाहने, वाहनकोंडी आणि भकास चेहऱ्यांचे लोक अशी स्थिती. वार्ताकन करताना बचावलेल्या लोकांचे अनुभव आणि त्यांच्या हृदयद्रावक कहाण्या लेखकास ऐकायला मिळाल्या. त्यातून त्या वेळच्या भयानक स्थितीची कल्पना येते. एकाच कुटुंबातले १२ जण गमावलेले राधेशाम पंडय़ा, केदारनाथ मंदिराचे पुजारी रवींद्र भट, सगळे घरदार वाहून गेल्यावरही सरकारने दिलेली तुटपुंजी मदत पाहून प्रश्न करणारा मानव बिश्त, आपले सगळे सहकारी यात्रेकरू गमावलेल्या प्रीतीबेन, शिशुपाल, मुलांना वाचवायचे यासाठी सहा सहा दिवस उपाशी राहून केवळ गढूळ पाण्यावर दिवस काढत जंगलात प्रवास करणारे पालक, आपल्याच नातलगांच्या शवाजवळ बसून सुटकेची वाट पाहणारे लोक आणि प्राण गमावलेल्या प्रियजनांवर अंत्यसंस्कारही न करता येणारे हताश नातलग.. अशा अनेक जणांच्या कहाण्या अंगावर शहारे उभे करतात. या साऱ्यात वैमानिकांनी केलेल्या नि:स्वार्थ बचावकार्याचाही लेखक उल्लेख करतो. वैमानिकांनी केलेल्या धाडसाच्या वाखाणण्याजोग्या घटना त्यातून आकळतात.

एखादी आपत्ती उद्भवली की सरकारी मदत आणि आकडेवारी यांच्यात नेहमीच तफावत आढळते. अनेकदा प्रत्यक्षात स्थिती वेगळी असते आणि सरकारी अधिकारी व नेते मंडळी यांचा दावा सत्य परिस्थिती जाणून न घेता केलेला असतो. याचाच अनुभव लेखकाला या प्रवासात आला. हेलिकॉप्टरशिवाय गढवाल परिसरात मदतकार्य शक्यच नव्हते. शेकडो लोक अडकले असताना नेते मंडळी मात्र- ‘मोजकेचे लोक अडकले असून सगळी स्थिती आटोक्यात आहे आणि बचावकार्यही उत्तम सुरू’ असल्याचे प्रसारमाध्यमांवरील मुलाखतीत सांगत होते. प्रत्यक्षात बचावकार्य करण्यासाठी ना लष्कराला पाचारण करण्यात आले, ना मोठय़ा क्षमतेची एएलएच किंवा एमआय-१७ सारखी हेलिकॉप्टर्स तैनात होती. होती ती खासगी हेलिकॉप्टर्स. त्यांनीच अविरत बचावकार्यात स्वत:ला झोकून दिले होते. एवढेच नव्हे, तर संपूर्ण आयुष्यभराची पुंजी, सर्वस्व नदीच्या पुरात वाहून गेलेल्यांना दिली जाणारी मदत मात्र तुटपुंजीच होती. या सगळ्याचा सविस्तर ऊहापोह पुस्तकात वाचायला मिळतो आणि सरकारी कारभाराचे स्वरूपही ध्यानात येते.

एखादी नैसर्गिक आपत्ती आली, की लगेच त्याची कारणमीमांसा सुरू होते. २०१२ आणि २०१३ मध्ये सामान्य हिमवर्षांवापेक्षा चार ते पाच फूट अधिक हिमवर्षांव या परिसरात झाला होता. हा बर्फ २०१३ मध्ये पावसाळ्याच्या आधी वेगाने वितळायला सुरुवात झाली होती. त्यामुळे नद्यांची पातळी वाढली होती. त्यातच मोसमी पाऊसही या परिसरात दोन आठवडे लवकर सुरू झाला होता आणि त्या काळात झालेल्या ढगफुटीमुळे पर्वतीय जमीन भुसभुशीत होऊन भूस्खलन होत होते. या नैसर्गिक कारणांबरोबरच लेखकाने मानवनिर्मित अनेक कारणांचाही वेध घेतला आहे.

इथल्या नद्यांवर झालेली धरणे, १०-१५ वर्षांत वाढलेले पर्यटन, त्यामुळे नैसर्गिक साधनांवर वाढलेला ताण, त्या ओघाने नद्यांच्या पात्रांत झालेली हॉटेल्स आणि घरांची अतिक्रमणे, रस्ते व विद्युत प्रकल्पासाठी करण्यात आलेली प्रचंड जंगलतोड आणि वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी करण्यात आलेल्या स्फोटांमुळे ठिसूळ झालेल्या पर्वतरांगा.. या साऱ्या कारणांची सविस्तर चर्चा पुस्तकात आहे. शिवाय येथील जलविद्युत प्रकल्पाबद्दलची आकडेवारी आणि कोष्टकांमुळे पर्यावरणीय हानीचा आलेख चटकन् नजरेसमोर येतो. हे सर्व मांडताना या परिसरात १९८०च्या दशकात वन आंदोलन, चिपको आंदोलन यांसारख्या पर्यावरणाच्या रक्षणासाठी झालेल्या चळवळी, आंदोलने, त्यांचे कार्यकर्ते, या साऱ्याबद्दल त्या काळात झालेले वार्ताकन, त्यामुळे स्थानिक परिसरात आणि देशभरही वाढलेली पर्यावरणाविषयीची सजगता यांविषयी लेखकाने विस्तृतपणे लिहिले आहे. उत्तराखंडमधील पर्यावरणविषयक कार्यकर्त्यांची माहिती आणि त्यांचा दृष्टिकोनही देऊन लेखकाने पर्यावरण सांभाळून होणाऱ्या इथल्या विकासाला कुणाचाच विरोध नसल्याचे स्पष्ट केले आहे.

या प्रलयानंतरही नक्की बोध घेऊन उपाययोजना केल्या जाणार का, असा प्रश्न लेखकाने शेवटी विचारला आहे. त्याचे उत्तर काय आहे, हे देशभर गेल्या काही वर्षांत आलेल्या नैसर्गिक आपत्तींनंतर आपण पाहिले आहे. उदाहरणार्थ, मुंबई. केदारनाथ प्रलयाआधी काही वर्षे मुंबईने २६ जुलै २००५ रोजी अतिवृष्टीचे भयंकर परिणाम अनुभवले. पण त्यानंतरही अगदी त्या तीव्रतेच्या नाही, तरी जनजीवन विस्कळीत करणाऱ्या आपत्ती या शहराने वेळोवेळी अनुभवल्या. ते पाहता, लेखकाने विचारलेल्या प्रश्नास मुंबईकरांनी काय उत्तर द्यायचे? किंवा गतवर्षी आलेल्या महापुराने विस्कटलेल्या सांगली-कोल्हापूरसारख्या जिल्ह्य़ांनी काय उत्तर द्यायचे? लेखकाने विचारलेला प्रश्न देशातील अशी अनेक शहरे आणि जिल्हे दरवर्षी विचारत आहेत. त्यामुळे लेखकाचा प्रश्न हा शेवट नसून पर्यावरण बचावासाठी हव्या असणाऱ्या दृष्टिकोन बदलाचा प्रारंभच आहे, असे म्हणायला हरकत नाही.

लेखकाने केदारनाथ पुराचे वार्ताकन करताना काढलेली छायाचित्रे पुस्तकात दिली आहेत. त्यात एकोणिसाव्या शतकातील केदारनाथ मंदिर, २०१३ मधील पूरस्थितीनंतरचा मंदिर परिसर, नद्यांची विस्तारलेली पात्रे, नद्यांनी वाहून आणलेल्या गाळामुळे वाढलेली भू-पातळी, बचाव आणि मदतकार्य, हेलिकॉप्टर्सचे वैमानिक, अपघातग्रस्त हेलिकॉप्टर, पीडित लोक, त्यांचा प्रवास, पूरस्थितीनंतर तयार झालेले प्रकल्प पाहायला मिळतात. ही छायाचित्रे पूरस्थितीचे दर्शन घडवतातच, शिवाय त्या वेळच्या स्थितीची दाहकताही जाणवून देतात.

reshmavt@gmail.com