गौतमीपुत्र सातकर्णीपासून महाराष्ट्राची भूमी फुलू लागली. या भूमीने यादवकाळात भरभराटीची केवळ स्वप्नेच पाहिली नाहीत तर मार्गही शोधले. परकीय आक्रमणांनी महाराष्ट्र झाकोळत असतानाही संतपरंपरेने इथल्या लोकांना स्व-भान दिले आणि त्यातून छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य उभे राहिले. हा इतिहास आपल्याला- साऱ्याच महाराष्ट्रीय, मराठीप्रेमींना जसा माहीत असतो, तसा तो अन्यभाषकांना माहीत असतो का? का नसावा? या इतिहासाचे संचित हे देशाचेही आहे की नाही? मग त्या इतिहासाचा धागाच पुढे पहिल्या बाजीरावांच्या दिल्लीविजयापर्यंत आणि पेशवाई बुडाल्यानंतर इंग्रजांच्या काळात सुरू झालेल्या आत्मशोधापर्यंत- त्यातून देशात रुजलेल्या नव-विचारांपर्यंत कसा पोहोचतो, हे सर्वांना माहीत असायला हवे. महात्मा जोतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, लोकमान्य टिळक, गोपाळराव आगरकर, महाराजा सयाजीराव गायकवाड, गोपाळ कृष्ण गोखले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ते सी. डी. देशमुख किंवा यशवंतराव चव्हाण ही नुसती नावे नसून आजचा महाराष्ट्र यांच्यामुळे विचारसमृद्ध झाला; चित्रपटकार फाळके, सर्कसकारछत्रे, नाटककार भावे-किर्लोस्कर ते वैज्ञानिक शंकर आबाजी भिसे अशा अनेकांनी ही समृद्धी वाढवली. हे ‘माहीतच नसणे’ हे महाराष्ट्राच्या उपेक्षेचे लक्षण नव्हे का? मग, ही उपेक्षा राजकारणापासून अर्थकारणापर्यंतच्या (हल्ली लसीकरणापर्यंतच्या!) क्षेत्रांत सुरूच राहिली, तर नवल काय? . हे नवल राहू नये, महाराष्ट्राची थोरवी सटीकपणे लोकांपर्यंत पोहोचावी, या हेतूने भारतीय प्रबोधनात अग्रणी असलेल्या या राज्याचा इतिहास ते वर्तमान यांविषयीचे ‘रेनेसाँ स्टेट’ हे पुस्तक ‘हार्पर कॉलिन्स’कडून प्रकाशित झाले आहे. गिरीश कुबेर यांच्या या इंग्रजी पुस्तकाची १८ प्रकरणे इतिहासाच्या टप्प्यांतून वर्तमानाचे भान देणारी असल्याचा जाणकारांचा अभिप्राय आहे.