रवींद्र महाजन

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अधिक विकास हवा असेल तर अधिक उपभोग हवा, त्यासाठी अधिक उत्पन्न हवे हे विकासाचे आधुनिक प्रतिमान आहे. भारतीय विचारसरणीतील विकास संकल्पना मात्र समग्रतेचा आग्रह धरते आणि तेच तिचे वेगळेपण आहे.

देशाची प्रगती योग्य रीतीने होते आहे का, ती सर्व वर्गात, सर्व क्षेत्रांत पोहोचते आहे का, तिची गुणवत्ता अपेक्षेप्रमाणे आहे का, याचा शोध सतत घेत राहिले पाहिजे. खरे तर देशाच्या विकासाचा विचार करताना आधारभूत तत्त्वज्ञान, त्यावर आधारित ध्येय व उद्दिष्टे, त्यासाठी सुयोग्य धोरणे, मग कार्ययोजना, तिची अंमलबजावणी, सतत आढावा व आवश्यक सुधारणा असा क्रम हवा. पण तत्त्वज्ञानाचा विचार होताना दिसत नाही.

विकास संकल्पना

व्यक्तीपासून जागतिक स्तरापर्यंत ‘विकास’ हा परवलीचा शब्द आहे. त्या विकासाचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी प्रगती करणे, पुढे जाणे, वाढ, उन्नत होणे अशी शब्दरचना करता येईल. इंग्रजीत प्रोग्रेस, ग्रोथ, डेव्हलपमेंट असे शब्द वापरले जातात. सामान्यत: ग्रोथ किंवा वाढ ही नैसर्गिक किंवा आपोआप होणारी गोष्ट आहे. उदा. माणसाच्या वयातील वाढ, झाडाची वाढ, इत्यादी. त्यासाठी प्रयत्न करण्याची खास आवश्यकता नसते. याउलट ‘विकास’ ही नियोजित वाढ असते. एका विशिष्ट, विहित उद्दिष्टाकडे ठरवून केलेली वाटचाल असते.

पश्चिमी प्रतिमान

माणसाच्या जगण्यामागच्या हेतूचा विकासाच्या प्रतिमानाशी अतूट संबंध आहे. ‘उपभोग’ या हेतूतून प्रचलित प्रतिमान आकाराले आहे. केवळ उपभोग हा पशूंच्या जीवनाचा अंतिम हेतू असू शकेल, मानवाच्या नाही, असे गांधीजींचे ठाम प्रतिपादन आहे. दुसऱ्या भाषेत सांगायचे तर विकास म्हणजे उपभोग, अधिक उपभोग म्हणजे अधिक विकास, अधिक उत्पन्न म्हणजे अधिक विकास. उपभोग, उत्पादन आणि उत्पन्न यांची रेखीय वाढ ही विकासाचे द्योतक मानली जाते. विकासाचे आजचे प्रतिमान हे आहे.

अपुरेपणा व नुकसान

जे विकसित आहेत, जे भरपूर उपभोग घेतात तेही दु:खी व समस्याग्रस्त का? विचारांती असे दिसते की, या समस्या ‘विकासाभावी’ निर्माण झालेल्या नसून ‘विकासामुळे’ निर्माण झालेल्या आहेत. त्यांच्या विकासाच्या संकल्पनेतच काही अंगभूत, अंतर्निहित अशा त्रुटी आहेत.   

या विकास संकल्पनेला कोणत्याही मानवी मूल्यांचे अधिष्ठान नाही. ज्यांच्यासाठी विकास हवा त्या सामान्य जनतेच्या मतांना व हितांना या संकल्पनेत फारसे स्थान नाही. हा विकास टिकाऊ, दीर्घकालीन असू शकत नाही, किंबहुना हा विकास मानवाला विनाशाच्या वाटेने घेऊन जात आहे हे सत्य आता जगातील अनेक विचारवंतांना जाणवू लागले आहे. यूएनडीपीच्या १९९६ च्या मानव विकास अहवालात अशी भीती व्यक्त करण्यात आली होती की, सध्याची विकास प्रक्रिया ही रोजगारविहीन, मुस्कटदाबी करणारी, क्रूर, मुळापासून उखडणारी आणि उज्ज्वल भविष्यविहीन होत चालली आहे, हे सध्या अनुभवासही येत आहे.

सम्यक विकास

विकासाचा विचार करताना प्रथम ध्येयनिश्चिती व ते साध्य करण्यासाठी सम्यक (सुयोग्य) मार्गाची निवड महत्त्वाची ठरते. यावरून ध्येयमार्गावरील समतोल प्रगती म्हणजे विकास असे ढोबळमानाने म्हणता येईल. भारतीय चिंतनात माणसाच्या जीवनाचा उद्देश नैतिक व आध्यात्मिक परिपूर्णता गाठणे हा आहे. आपल्या जीवनप्रणालीतही आर्थिक पैलूचा विचार आहेच. पण मानवी जीवनाच्या भवितव्याचा पूर्ण विचार हा अशा एखाद्याच विशिष्ट अंगाने करणे, त्यातच अडकून राहणे हे नाही. हिंदू जीवनदृष्टी ही समग्र जीवनाच्या एकात्मतेच्या जाणिवेवर आधारलेली आहे.

विकास सम्यक हवा

योगी अरिवद म्हणतात, ‘‘प्रगती करणे भारताला मान्य आहे, पण प्रगती आध्यात्मिक, आंतरिक असली पाहिजे, असा भारताचा आग्रह आहे; भौतिक विकासाची ही बाह्य प्रक्रिया भारताला प्रगती म्हणून पटत नाही.’’

प्राधान्याने पश्चिमी विचारसरणीच्या प्रभावाखाली अखंड वैज्ञानिक व तंत्रवैज्ञानिक प्रगतीचा ध्यास घेतलेले पं. नेहरू, मृत्यूपूर्वी अगदी दोनच दिवस, श्रीमन्नारायण यांच्या पुस्तकाला लिहिलेल्या पुरस्कारात म्हणतात – ‘..शेती आणि उद्योगधंदे या दोन्हीमध्ये अत्याधुनिक तंत्रप्रगतीच्या साहाय्याने आपले उत्पादन वाढवून आपला फायदा होणे ही आज भारतात आपल्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची बाब आहे. पण हे करीत असता आपण हे विसरता कामा नये की (आपल्या प्रगतीचे) मूलभूत उद्दिष्ट मात्र मानवी व्यक्तिमत्त्वाचा दर्जा व त्यात अंतर्भूत असलेली धर्म ही संकल्पना हे आहे.’

तत्त्वज्ञान आपल्यापुढे अपरोक्ष अनुभूती घेण्याचे उच्चतम ध्येय ठेवते. त्या दिशेतला प्रवास म्हणजे उत्तरोत्तर होत जाणारा मानवाचा विकास. अभ्युदय हवा, तसेच नि:श्रेयसही हवे.

सम्यक विकास : मूलसूत्रे

‘सम्यक-विकास-नीती’ व्यष्टी, समष्टी आणि सृष्टीच्या धारणक्षम विकासाची, संतुलित विकासाची, एकसामयिक विकासाची, एकात्म विकासाची नीती आहे. तिची महत्त्वपूर्ण सूत्रे :

१- पूर्ण मानवाचा विचार : शरीर, मन, बुद्धी, आत्मा या चारही मितींविषयी समन्वित विचार आवश्यक.

२- मानवाच्या चतुर्विध जीवनोद्देशांचा (धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे पुरुषार्थचतुष्टय़) समन्वित विचार.

३- सामाजिक दृष्टीने समाजातील सर्व घटकांना आपला जीवनोद्देश प्राप्त करण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा यांच्याबरोबरच शिक्षण, आरोग्य सेवा, स्वस्थ वातावरण, इ. त्यांच्या गरजा भागतील हे पाहणे तसेच त्यांना विकासाची सुयोग्य, सन्मानजनक, प्रगतीची शक्यता असलेली संधी मिळेल हे बघणे.

४- विकास प्रक्रियेत नेहमी समग्र आणि एकात्म दृष्टी ठेवणे.

५- जास्तीत जास्त उपभोग नव्हे तर कमीत कमी उपभोगातून जास्तीत जास्त आनंद मिळवणे हे ध्येय.

६- पर्यावरणाचे नुकसान टाळणारी धारणक्षम उत्पादन पद्धत. धारणक्षमतावृद्धीतून अधिक समृद्धीकडे वाटचाल.

७ – सर्वच क्षेत्रांत स्वदेशीला प्रोत्साहन. पारंपरिक व समुचित आधुनिक तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर.

८- अधिकार, निर्णय, प्रयत्न, उत्पादन तसेच मालकीहक्काचे विकेंद्रीकरण.

९- जनचेतनेच्या (जनमनाची अशी सुस्थिती जिच्या योगे सामान्य जनता स्वत:च्या विकासासाठी कंबर कसून काम करीत राहील) आधारे विकास. सरकार साधारणपणे मार्गदर्शक, प्रोत्साहनपर व सहकार्यतत्पर.

१०- कुटुंब, समाजातील संबंधित गट व समाजाचाही बाजार, सरकार, उद्योजक व कर्मचारीवर्ग यांच्याबरोबरीने या विकासामध्ये यथायोग्य हातभार.

११- स्वयंशासित व स्वायत्त व्यवस्थांना प्रोत्साहन.

१२- धर्म (नैतिकता, कर्तव्यशीलता, समाजपोषकता, न्यायोचितता) हे नियामक तत्त्व असावे.

१३- रोजगार हा उत्पादक, विकासकारी व उद्दिष्टपूर्ण असावा. स्वयंरोजगार हाही रोजगाराचा महत्त्वाचा प्रकार आहे. त्यावर अधिक भर.

१४- फुकट वा नाममात्र किमतीत सेवा देणे, समाजाला पंगू बनवणे व आर्थिक शिस्त बिघडवणे अशी सरकारांची चुकीची पावले देशहितासाठी पूर्णपणे थांबावीत. पुरुषार्थी बनण्याची, स्वप्रयत्नाने पुढे जाण्याची शिकवणच समाजाला द्यावी.

१५- समृद्धीचे शाश्वत केंद्र म्हणजे माणसाची स्वयंभू प्रेरणा होय. अर्थप्रेरणेबरोबरच इतर प्रेरणा व मूल्ये उदा. देशभक्ती, पूर्णत्वाची उत्कट इच्छा, सहकार्य, सामंजस्य, सामाजिक हिताची जपणूक, त्याग तसेच आत्मिक उन्नती यांना योग्य स्थान देऊन राष्ट्राच्या विकासासाठी सामाजिक उत्साह आणि कार्य यांना प्रोत्साहन.

१६- विकास मोजण्याच्या निकषांत सकल घरगुती उत्पादन (जीडीपी) पासून मानवी विकास सूचकांकापर्यंत सुधारणा झाली आहे. परंतु हेदेखील पुरेसे नाही. विकास योग्य रीतीने मोजण्यासाठी नवीन संख्यात्मक व गुणात्मक मापदंडांचा उपयोग करण्याची गरज.

१७- राष्ट्रीय सार्वभौमत्व, निर्णयस्वातंत्र्य, संरक्षण अशा बाबींमध्ये कसलीही तडजोड न करता आवश्यक राष्ट्रीय आर्थिक आणि लष्करी सामर्थ्य प्राप्त करणे.

१८ – व्यक्तिगत व सामाजिक विकासाबरोबरच सृष्टीचाही विचार.

परम वैभव

आपले अंतिम ध्येय प्रबल राष्ट्रनिर्माणाचे आहे. जे मानवसमाजाची उत्तम धारणा घेऊन चालेल, जे संपूर्ण मानवांमध्ये परिवर्तन करून भौतिकतेने भारलेल्या आदर्शाना आध्यात्मिक आधार देऊन वैभवशाली जीवनाचा अध्यात्माशी मेळ घालेल आणि अशा आदर्शाची पुनस्र्थापना सर्वत्र करेल.

आजकाल कारखाने, यंत्रसामग्री, सुविधा व एकूणच अर्थप्रधान समाजरचना जगात वाढत आहेत. आपण ज्या वैभवाची गोष्ट करतो त्यात ऐहिक समृद्धी राहावी, कोणीही असंतुष्ट राहू नये, अर्थ व काम यांचे नियंत्रण धर्माद्वारे आणि त्याचा परिपाक मोक्षप्राप्तीमध्ये व्हावयास हवा. या सद्गुणांसहित आपला समाज वैभवपूर्ण ऐहिक जीवन जगला पाहिजे.

पूर्वी आपल्या देशात विपुल धनसंपदा होती, पण तिचे रक्षण करण्याचा गुण नव्हता, म्हणून ती धनसंपदा गेली. देशाच्या वैभवाचे रक्षण करण्याचे सामर्थ्य आपल्यापाशी असणे आवश्यक आहे, तरच ते वैभव आपले असते.     

लेखक अभियांत्रिकी अधिस्नातक, व्यवस्थापन सल्लागार, तसेच स्वदेशी जागरण मंचाचे माजी अ. भा. सहसंयोजक आहेत

auraent@gmail.com

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Development thoughts in the indian context zws
First published on: 22-06-2022 at 03:35 IST