खाशाबा जाधवांच्या महाराष्ट्रात आणखी ऑलिम्पिक कुस्तीपटू का निर्माण झाले नाहीत, असा प्रश्न गेल्या शनिवारीच पुण्यात भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांनी विचारला होता. महाराष्ट्रातील कुस्ती धुरिणांना निरुत्तर केल्याचा क्षुल्लक आनंद त्या वेळी या महाशयांना मिळाला असेल. त्यांना असे विचारण्याचा अधिकार खरोखरच आहे का, याविषयी तेव्हाही येथील कुस्ती वर्तुळातून दबक्या आवाजात चर्चा झाली. आता अवघ्या आठवडाभरात त्यांच्या प्रतापांविषयी कुस्तीपटूंनीच जाहीर आवाज उठवल्यानंतर ब्रिजभूषण सिंह यांना तात्पुरते पायउतार व्हावे लागले. महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आले आहेत. तीन दिवसांपूर्वी याविषयी दिल्लीतील जंतरमंतर येथे कुस्तीपटूंनी बैठा सत्याग्रह सुरू केला, त्या वेळी ब्रिजभूषण यांच्या पठ्ठय़ांनी ‘पीडितां’ची नावे जाहीर करा, अशी उद्दाम आणि तितकीच निर्बुद्ध मागणी केली होती. हे आंदोलक साधेसुधे नव्हते. ऑलिम्पिक पदकविजेते बजरंग पुनिया, रविकुमार दाहिया आणि साक्षी मलिक; तसेच जागतिक पदकविजेते दीपक पुनिया, विनेश फोगाट असे नामांकित कुस्तीपटू होते. येथे विशेष लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे, ब्रिजभूषण सिंह हे उत्तर प्रदेशातील भाजपचे खासदार आहेत. त्यांच्यावर आरोप करणाऱ्या कुस्तीपटूंपैकी बहुतेक जण भाजपचेच समर्थक आहेत. यांतील बहुतेक जणांचे भाजपप्रेम समाजमाध्यमांवर वेळोवेळी व्यक्त होत असते. तेव्हा त्यांना ‘जंतरमंतरवरील आंदोलनजीवी’ ठरवण्याचा जो उद्योग सुरू झाला आहे, त्याला अजिबात आधार नाही. किंबहुना, नेमक्या आणि गंभीर प्रश्नांवर उत्तरे देता येत नाहीत, त्या वेळी व्यापक कटाचा सिद्धान्त मांडून वेळ मारून नेण्याचाच हा आणखी एक प्रयत्न दिसतो.

विश्लेषण: जंतरमंतर का बनले कुस्तीगिरांचा आखाडा? कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांवर आरोप नेमके काय?

Arvind Kejriwal
अरविंद केजरीवालांची शुगर लेव्हल ३२० वर, अखेर तुरुंगात पहिल्यांदाच दिलं इन्सुलिन
केजरीवाल तुरुंगात काय खातात? ईडीच्या आरोपानंतर वकिलांनी न्यायालयात दिला ४८ जेवणांचा तपशील; इन्सुलिनबाबत न्यायमूर्ती म्हणाले…
AAP MP Sanjay Singh
“केजरीवालांचा तुरुंगात छळ होतोय”, आप खासदार संजय सिंहांचा आरोप; म्हणाले, “त्यांच्या पत्नीलाही…”
nagpur crime news, suspicion of character nagpur
प्रेमविवाहानंतर पत्नीच्या चारित्र्यावर संशय; पतीने पत्नीला पाजले विष, पोलिसांनी…

आता थोडय़ाशा विलंबाने का होईना, पण भारतीय ऑलिम्पिक संघटना आणि क्रीडा मंत्रालयाने या प्रकरणात हस्तक्षेप करून दोन स्वतंत्र समित्या स्थापल्या आहेत. प्रकरणाची चौकशी चार आठवडय़ांत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. खुद्द ब्रिजभूषण सिंह यथावकाश पत्रपरिषद घेऊन आरोप फेटाळण्याचे सोपस्कार पार पाडतीलच. दंगलमस्ती डोक्यात भिनलेल्या या गृहस्थांनी एकदा एका मल्लाला भर स्पर्धेत कानशिलात वाजवून अपमानित केले होते. एकदा समाजवादी पक्षाकडून आणि पाच वेळा भाजपकडून निवडून आलेले ब्रिजभूषण सिंह यांना या मुद्दय़ावरून जाहीर आव्हान देणे, ही अजिबात साधारण बाब नाही. परंतु कित्येक वर्षे त्यांचा कारभार पाहून आणि त्यांचे वर्तन पाहून विटलेल्या कुस्तीपटूंनी अखेरीस संतापाला आणि दु:खाला वाट मोकळी करून दिली. कुस्ती हा आजही पुरुषांचे प्राबल्य असलेला खेळ. या खेळात स्वत:चे स्थान निर्माण करून एकेक पायरी वर चढत जाणे हेच मुळात विशेषत: हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश पट्टय़ातील मुलींसाठी स्वतंत्र आव्हान. या वाटचालीत शोषक मानसिकतेचे पुरुषही भेटत असतीलच. पण आपल्याकडील समाजमानसिक घडणच अशी आहे, की ज्यामुळे क्रीडा असो वा इतर कोणतेही क्षेत्र, पीडनाचा अतिरेक झाल्याखेरीज त्याविरुद्ध आवाज उठवला जात नाही. तेव्हा विनेश फोगाट आणि साक्षी मलिक पीडित मुलींविषयी बोलतात, त्या वेळी प्रत्यक्षात त्यापेक्षाही अधिक मुलींचा विनयभंग झालेला असू शकतो. विनेश फोगाट हिने केवळ ब्रिजभूषण सिंह यांच्यावरच नव्हे, तर काही अनाम प्रशिक्षकांवरही आरोप केले आहेत. प्रशिक्षण शिबिरांमध्ये मुलींचे वर्षांनुवर्षे शोषण केले जात असल्याचा अत्यंत गंभीर आरोप तिने केला. तो खरा असल्यास हा विकार किती खोलवर रुजला असेल याची केवळ कल्पनाच करता येईल.

Wrestler Protest: कुस्तीपटू सरकारच्या निरीक्षण समितीवर नाराज; म्हणाले, ‘आम्हाला आश्वासन देण्यात आले होती की…’

स्थैर्य आणि यशप्राप्तीसाठी काही वेळा पुरुषसत्ताक व्यवस्थेचे शोषणही मूकपणे सहन करण्याची वेळ या मुलींवर येणे हा व्यवस्थेचा पराभव ठरतो. गेल्या महिन्यात माजी हॉकीपटू आणि हरयाणा सरकारमध्ये मंत्री असलेल्या संदीप सिंगला लैंगिक शोषणाचे आरोप झाल्यामुळे क्रीडा मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. पण तो बाकीची खाती सांभाळतोच आहे. हीच ती ‘व्यवस्था’! त्याला सरसकट सर्वच पदांचा राजीनामा देण्यास भाग पाडावेसे तेथील नेतृत्वाला वाटले नाही. कुस्तीपटूंनी किमान अन्यायाला वाचा तरी फोडली. बाकीच्या खेळांमध्येही अशा प्रकारे मुलींना नको त्या तडजोडी करण्यास भाग पाडले जात असेल. उद्या त्यांच्यातीलही काही पुढे येतील. तेव्हा या पुढाकाराबद्दल विनेश, साक्षी, बजरंग यांचे अभिनंदन करणे समयोचित ठरते. परंतु केवळ या प्रकरणाचा निवाडा दोन स्वतंत्र समित्या स्थापून करणे हे सरकारसाठी पुरेसे ठरणार नाही. या शोषक मानसिकतेची लक्तरे वेशीवर टांगण्यासाठी सर्वागीण आणि सर्वंकष प्रयत्न करण्याची जबाबदारी सर्व संघटना आणि सरकारची आहे. त्या आघाडीवर अद्याप सामसूमच दिसते.