रवींद्र महाजन

धर्मविचार व राष्ट्रजीवनाच्या अध्यात्मीकरणाचा विचार पुढे नेला तरच वाटचाल सर्वजनसर्वहितकारी होईल.

indian model of secularism
संविधानभान : धर्मनिरपेक्षता : समज व गैरसमज
in china son in law service provide by agency
चिनी पुरुष श्रीमंत पत्नीच्या शोधात, घरजावई होण्यास इच्छुक; नेमके कारण काय?
loksatta kutuhal article about perfect artificial intelligence
कुतूहल : परिपूर्ण बुद्धिमत्तेचे धोके
singer suresh wadkar praises pm narendra modi
उलटा चष्मा : दिव्यत्वाची प्रचीती…

पूर्वलेखांमध्ये धर्माचा थोडक्यात उल्लेख होता. धर्म हा शब्द संपूर्ण मानवी अस्तित्वाला कवेत घेतो. शिक्षणातून धर्माच्या खऱ्या अर्थाची माहिती दिली जात नसल्याने सर्वसाधारण सुशिक्षितांतही याबाबतीत मतमतांतरे व भ्रम असतात. धर्म शब्दाला दुसऱ्या कोणत्याही भाषेत समर्पक प्रतिशब्द नाही. ‘रिलिजन’, ‘मजहब’ या शब्दांतील संकुचितता वा इतरांचा टोकाचा विरोध धर्मात नाही. ‘धर्म’ व ‘रिलिजन’- ‘मजहब’ यातील गल्लतीमुळे वा जडवादाच्या प्राबल्यामुळे काही लोक धर्मालाच विरोध करतात. तर अनेक पाश्चात्त्य व त्यांनाच मानणारे भारतीय बुद्धीवादी हेही धर्माला बाद करतात. कधी विविध सामाजिक दोषांबद्दल धर्मालाच विनाकारण जबाबदार धरले जाते. तेव्हा सर्व जीवनाला महत्त्वाच्या धर्मसंकल्पनेचा एकात्म मानव दर्शनाच्या संदर्भात काही विचार आवश्यक आहे.     

धर्माचे महत्त्व

स्वामी विवेकानंद म्हणतात, ‘धर्म हे आमच्या जीवनाचे सारभूत तत्त्व आहे.’ त्यांनी इहवादातील विसंगती आणि भौतिक बाजूवर अतिरिक्त भर देण्याचे हानिकारक परिणाम सांगितले. डॉ. आंबेडकरांनी म्हटले आहे, ‘नीतिमान आचरण ठेवण्याच्या जबाबदारीच्या दृष्टीने धर्मासाठी माणूस आहे. आणि एकंदर समाजाच्या हिताचा प्रश्न जेव्हा उपस्थित होतो तेव्हाही धर्मासाठी माणूस आहे,’ असे म्हणता येईल. माणसासाठी धर्म आहे, म्हणजे प्रत्येक मनुष्याला नीतिमार्गाने चालून आपली ऐहिक उन्नती संपादण्याला धर्माचे साहाय्य्य झाले पाहिजे.’ (आमचे टीकाकार २९.७.१९२७-४)

विनोबाजी म्हणतात ‘भारतात वेदकालापासून आजपर्यंत धर्म हा शब्द सतत चालत आला आहे. धर्म हा एक व्यापक शब्द आहे. आपले जीवन ज्या नीतिविचारावर आधारलेले असते, त्याला आपण धर्म म्हणतो. धर्म अविचल आहे. त्याची तत्त्वे पक्की असतात. ज्याप्रमाणे गणिताची तत्त्वे कुठल्याही देशात आणि कुठल्याही काळात स्थिर असतात त्याचप्रमाणे धर्माच्या तत्त्वांतही कधी बदल होत नाही. ज्या तत्त्वांच्या अभावामुळे जीवन छिन्न-विच्छिन्न होते, अशी पायाभूत तत्त्वे म्हणजे धर्म.’ (भारताचा धर्मविचार, पृ. ७)

धर्मसंकल्पना

मनुष्य व पशू यांना आहार, निद्रा, भय, मैथुन ही सारखीच प्राप्त आहेत. या सहजप्रेरणांना धर्माच्या म्हणजे नीतीच्या मर्यादा घालणे हाच दोघांत भेद आहे. धर्मप्रेरणेआधारे वासनांवर अंकुश ठेवणे मनुष्याला जसजसे सुचत व जमत गेले तशी त्याची प्रगती झाली.

भारताचा धर्म पोथीआधारित नसून जीवनमूल्यात्मक आहे. धर्म म्हणून मनुस्मृतीमध्ये १० जीवनमूल्ये, भागवतात ३० मूल्यांची यादी आहे. भगवद्गीतेत २६ सद्गुणांना दैवी संपदा म्हटले आहे. व्यवहार, तत्त्वविचारात वा आजची आणि प्राप्तव्य स्थिती यात धर्म पुलासारखे काम करतो. समाजाला सद्य:स्थितीतून आदर्शाकडे घेऊन जाणारा धर्मविचार आहे. समाजधारणेच्या राजकारण, आर्थिक प्रवृत्ती अशा सर्व अंगांमध्ये धर्माचे महत्त्व आहे. राजकारण हे धर्माधिष्ठितच असले पाहिजे असे महात्मा गांधीजींचेही मत होते. व्यावसायिक नीतिमत्ता ‘प्रोफेशनल एथिक्स’ हेही धर्माचेच एक रूप आहे. धर्म आणि व्यवहार यांची जोडी नेहमी अभेद्य असली पाहिजे.

धर्माची व्याख्या

निरुक्तकारांनी धर्माचा अर्थ नियम असा केला तर त्याचा धातुगत अर्थ धारण करणे. या दोन्ही अर्थाच्या समन्वयाने ‘ज्या नियमाने सृष्टीला धारण केले आहे तो धर्म’ अशी धर्म या शब्दाची व्याख्या होऊ शकते. हे नियम कुणा व्यक्तीने तयार केलेले नाहीत. प्राचीन महापुरुषांनी धर्माच्या व्याख्या अनेक प्रकारांनी केल्या आहेच, त्या एकमेकांशी मिळत्याजुळत्या आहेत. त्या सर्व व्याख्यांमध्ये सर्वाधिक मान्य आणि प्रचलित व्याख्या आहे:

‘यत: अभ्युदय नि:श्रेयससिद्धि: स धर्म:।’ (वैशेषिक दर्शन १.२) (ऐहिक आणि पारलौकिक कल्याण ज्याने साधते तो मार्ग).

जीवनाचा नियामक धर्म

मानवाच्या हिताची, उन्नत जीवनव्यवहाराची मार्गदर्शक तत्त्वे या दृष्टीने धर्म हेच समाजजीवनाचे नियामक तत्त्व असले पाहिजे. धर्मजीवनासाठी त्यानुसार वैयक्तिक व समाजजीवनाची आखणी केली पाहिजे, ती मूल्ये जीवनात उतरविली पाहिजेत. असे केल्याने समाज सुखी, समाधानी, समृद्ध, शुभशक्तिशाली होईल. ही वाट सोडल्यास अनिर्बंध भोगप्रवणता, पर्यावरणहानी, ढासळती कुटुंबव्यवस्था, अपराधवाढ, तणाववृद्धी, परात्मभाव, पिळवणूक, नैतिकताक्षरण, समरसताहानी असे दोष वाढतात हे पाश्चात्त्य समाजात दिसत आहे. आपल्याकडेही त्यांची लागण झाली आहे. सावरणे आवश्यक आहे.

धर्मरूपे

धर्म म्हणताना सामान्य व विशेष धर्म यांचा विचार होतो. सामान्य धर्म म्हणजे सर्वाना लागू असलेला उदा. यम (अिहसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह), नियम (शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वरप्रणिधान). विशेष धर्म म्हणजे भूमिकेच्या कर्तव्यानुसार धर्म उदा. पुत्रधर्म, पतिधर्म, आचार्यधर्म.

 स्वधर्म – म्हणजे मी माझ्या जीवनातील विशिष्ट अशा स्थानानुसार वागणे, म्हणजेच कर्तव्य. मी शिक्षक असेन तर मुलांना/ विद्यार्थ्यांना ‘घडविणे’ हे माझे कर्तव्य ठरते.

सनातन धर्म – योगी अरिवद म्हणतात ‘ज्याला आपण हिंदूधर्म म्हणतो तो खरे म्हणजे सनातन धर्म आहे. याचे कारण सर्व धर्माचे समावेशन करणारा तो विश्वधर्म आहे. जो धर्म विश्वाचा नसतो तो चिरंतन, सनातन कधीच होऊ शकत नाही.. सनातन धर्म हा एकच धर्म असा आहे की जो विज्ञानाचे शोध आणि तत्त्वज्ञानाच्या विचारधारा या आधीच वर्तवून आणि स्वत:त समाविष्ट करून घेऊन, जडवादावर विजय मिळवू शकेल.’

शाश्वतधर्म व युगधर्म –  धर्म म्हणजे समाजधारणेची वैश्विक शाश्वत तत्त्वे. युगधर्म म्हणजे कालसुसंगत आचारधर्म. आचारधर्म देश, काल परिस्थितीप्रमाणे परिवर्तनीय असा व्यवस्थेचा भाग आहे. समाजनेतृत्वाने (धर्मज्ञ, धर्माचार्य, विद्वान, जीवनव्यवहारतज्ज्ञ, इ.) सतत समीक्षा करून आचारधर्मात योग्य ते बदल केले पाहिजेत.

धर्मशास्त्रे, स्मृती, आचारधर्मसुधारणा

समाज मग तो जुन्या परंपरांना, रूढींना चिकटून बसणारा असो वा प्रागतिक मूल्यांचे स्वागत करणारा असो त्याला आचार-विचारांच्या नियमांची चौकट ही असावीच लागते. नाहीतर तो एकसंध राहणार नाही. धर्माधिष्ठित समाजासाठी कालसापेक्ष आचारसंहितांची रचना ही निरंतर चालू राहणारी प्रक्रिया असली पाहिजे. गेल्या सुमारे बाराशे वर्षांत असे सुयोग्य चिंतन, सुधारित स्मृती व कालसुसंगत कृती यांचे थांबणे हे आपल्या देशाच्या अवनतीचे एक प्रमुख कारण आहे.

जीवनोद्देशाला अनुकूल अशी कर्तव्यांची, नीतिनियमांची एक सुसंवादी रचना आमच्या जीवनात काही प्रमाणात आजही धर्मरूपाने आहे. धर्मतत्त्वांतून समाजाचे नीतिशास्त्र तयार होते व त्याचे आजचे व्यावहारिक रूप म्हणजे राज्यघटना. त्या दृष्टीने राज्यघटना ही आज समाजजीवनाला लागू असणारी आचारसंहिता (स्मृती) आहे आणि तीच राजधर्माची नियामक.

या पारंपरिक मूल्यांबरोबर राष्ट्रभक्ती, सार्वजनिक शिस्त, वैयक्तिक व सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, सामाजिक अभिसरण, भावंडभावना, समरसता, पर्यावरणस्नेह, आदर्श नागरिकत्व, श्रमनिष्ठा, स्वदेशी अशा कालानुरूप मूल्यांचेही संवर्धन करावे लागेल.

धर्म व विज्ञान

भारतात अध्यात्म व धर्म हे सत्यशोधनाच्या मार्गात अनिर्बंध, मुक्त विचारस्वातंत्र्य देतात. रिलिजन- मजहबासारखी ज्यासंबंधी कसलीही शंकाच घेता येत नाही अशी कुठलीही श्रद्धेय गृहीते ते आड येऊ देत नाहीत. अध्यात्म व विज्ञान यात मुळात विरोध नाही. आध्यात्मिक साधना करणारी व्यक्ती वैज्ञानिक पद्धतीनेच अंतिम तत्त्वाचा शोध घेत असते.

धर्मराज्य व मजहबी राज्य

म. गांधीजींचे रामराज्य आणि दीनदयाळजींचे धर्माधिष्ठित वा धर्मराज्य यात तत्त्वत: फरक नाही. धर्मराज्य कायद्याचे राज्य (रूल ऑफ लॉ) आहे. हिंदू जीवनात राजसत्ता सदैव पंथनिरपेक्ष राहिली आहे व आजही ती तशीच आहे. मोगलांचे साम्राज्य सांप्रदायिक तर शिवाजी महाराजांचे राज्य असांप्रदायिक होते. भारताने राजाला धर्मगुरूचे स्थान कधीच दिले नाही. राजाच धर्मगुरू होतो तेव्हा एका मजहबाला अनुकूल तर इतरांना विरोधी मजहबीराज्य निर्माण होते. भारतीय धर्मराज्य ‘राजा करील तो न्याय’ हे नाकारून ‘राजाने न्यायच केला पाहिजे’ असे मानते, तसेच न्यायाचा आधार राजमत नसून धर्मतत्त्वच असले पाहिजे. आजच्या परिभाषेत यालाच घटनात्मक शासन म्हणता येईल.

राष्ट्रजीवनाचे अध्यात्मीकरण

धर्माचे अधिष्ठान घेऊन समाजव्यवहार आपल्या आदर्शाकडे नेला पाहिजे. पुढे योगी अरिवद म्हणतात ‘धर्मजीवन हेंही भारतीय संस्कृतीचे अंतिम साध्य नाही. धर्मजीवन ही त्याहीपेक्षा श्रेष्ठ असलेल्या उच्चतम जीवनाची तयारी आहे, पाया आहे.. या धर्ममय जीवनाने स्वत:ची मर्यादा ओलांडून ‘मुक्ति’ गांठावी हे भारतीय संस्कृतीचे उच्चतम ध्येय होते.’’ (भारतीय संस्कृतीचा पाया, पृ. १२२)

भारतवासीयांनी तत्त्वज्ञानाच्या आधारावर सुखसमृद्धी आणि शांतिपूर्ण जीवन जगावं या उद्देशाने लालबहादूर शास्त्रीजींनी ‘सायन्स अँड स्पिरिच्युआलिटी फोरम’ची प्रस्थापना केली होती. या समितीतील तज्ज्ञ मंडळींमध्ये जयप्रकाश नारायण, ढेबरजी, स्वाध्याय परिवारजनक पांडुरंगशास्त्री आठवले, स्वत: शास्त्रीजी अशी मान्यवर मंडळी होती. (देह झाला चंदनाचा पृ. ४०४). सम्यक राष्ट्रीय विकासाच्या दृष्टीने एकंदरच धर्मविचार तसेच हा राष्ट्रजीवनाच्या अध्यात्मीकरणाचा विचार सातत्याने व नेटाने पुढे नेण्याची आवश्यकता आहे. तरच आपली वाटचाल सर्वजनसर्वहितकारी होईल.